चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३ व्या शतकात उदयाला आली. समतेवर आधारीत समाजव्यवस्था निर्माण करणे हे आपल्या संत परंपरेचे काम आणि ध्येय होते. परंतु त्यासाठी या संतांना अनेक टक्के टोणपे खावे लागले. त्यापैकीच एक म्हणजे संत चोखामेळा. संत चोखामेळ्याच्या जीवनावरून तेव्हाची परिस्थिती किती भयानक होती याचे दर्शन घडते. जातीपातीत अडकलेला समाज, स्पृश्य अस्पृश्यतेच्या विळख्यात अडकलेली संस्कृती ही ईश्वराला विठ्ठलाला मान्य आहे काय असा सवाल निर्माण करणारे चोखा मेळा हे खर्या अर्थाने क्रांतिकारी आणि सुधारणावादी संत होते. त्यांच्या अभंगांमुळेच तर आपल्याला तेव्हा कशी परिस्थिती होती हे ज्ञात होते. संत चोखामेळा ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, मात्र विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. दैन्य, दारिद्रय, वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. इतरांप्रमाणे आपणही श्रीविठ्ठलाला उराउरी भेटावे असे खूप वाटत होते परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती. चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३ व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे| दवंडी पिटीभावे डोळा|्|’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला. ‘हीन मज म्हणती देवा| कैसी घडो तुमची सेवा|’ असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. आपल्याला हीन दिन ठरवणारा नेमका कोणाला अधिकार कोणी दिला असा सवाल करणारे ते बंडखोर होते. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्या आहेत.‘धाव घाली विठू आता| चालू नको मंद्| बडवे मज मारिती| ऐसा काही तरी अपराध|्|’‘जोहार मायबाप जोहार्| तुमच्या महाराचा मी महार्| बहु भुकेला जाहलो| तुमच्या उष्ट्यासाठी आलो|्|’‘आमुची केली हीन याती| तुज कां न कळे श्रीपती| जन्म गेला उष्टे खाता| लाज न ये तुमचे चित्ता|्|’‘ऊस डोंगा परि | रस नोहे डोंगा| काय भुललासी वरलीया रंगा|्| चोखा डोंगा परि| भाव नोहे डोंगा|्|’‘विठ्ठल विठ्ठल गजरी| अवघी दुमदुमली पंढरी|’ हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्य साधारण प्रेम होते. संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत चिंता होती. त्यांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले. गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना भिंत पडून सर्व कामगारांचा अंत झाला. चोखोबाही त्यात होते. संत नामदेवांनी जेव्हा सर्व अस्थी गोळा केल्या तेव्हा ज्या अस्थीतून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद ऐकू आला. त्या अस्थी चोखोबाच्या होत्या असे म्हणतात. नामदेवांनी मात्र चोखोबांना विठठलाजवळच अढळ स्थान दिले. पंढरपूरच्या देवळाच्या महाद्वारात पायरी जवळ नामदेवांनी संत चोखोबांची समाधी बांधली आहे.
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५
चोखामेळा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा