शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी - भगतसिंग

  •  केवळ देशासाठी, भारतीय स्वातंत्र्यासाठी, ब्रिटीशांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणारे भगतसिंग. २३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांना शहीद-ए-आलम असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे. या देशाला फक्त अहिंसेने स्वातंत्र्य मिळालेले नाही. दे दी हमे आजादी बिना, खडग बिना ढाल हे गीत अशा क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच झूट ठरते. म्हणूनच स्वातंत्र्यदिनी भगतसिंगांच्या बलिदानाची आठवण ठेवणे गरजेचे आहे.
  • अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलां येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती.
  •    गुलामी आणि दारिद्र्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता आणि त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे तेे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.
  •    लाल बावटा वाले डाव्या विचारांचे पक्षांनी भगतसिंगांना आपले प्रेरणास्थान मानले आहे. इतकेच नाही तर अगदी नक्षलवादीही त्यांना देव मानतात हे विशेष. भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे बंदी जीवन हे त्यांना प्रभावित करणारे  पुस्तक होते. याशिवाय ऑस्कर वाइल्डचे वीरा-दी निहिलिस्ट, क्रोपोटकिनचे मेमॉयर्स, मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशना आधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.
  •    आपल्याकडे भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांची माहिती इतिहासात आणि प्रसारमाध्यमात, चित्रपटात फार कमी आणि मर्यादीत करून दिली गेली आहे. त्यांच्या क्रांतिकारक अंगाव्यतिरीक्त त्यांचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न कोणी फारसा केलेला नाही हे एक शल्य आहे. कारण भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॉंंग्रेस अधिवेशनास ते अकाली या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी वीर अर्जुन, प्रताप,इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी चंदच्या फाशी विशेषांकात निर्भय, बलवंत, व ब्रिजेश या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात नॅशनल कॉलेजतर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी राणा प्रताप, दुर्दशा, सम्राट चंद्रगुप्त या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.
  •       ९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर आर्मी हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे मुख्य सेनापती तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.
  •     खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होते.
  •     भगतसिंगांवर ब्रिटीशांनी ठेवलेले आरोप हे अत्यंत खोटे आणि भयानक होते. त्यामध्ये  बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.  हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बंब व स्फोटके यांची निर्मिती करणे. ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्या पोलिस वा इतर अधिकार्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणार्‍र्यातसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्या लोकांचे वध करणे. याशिवाय  आगगाड्या उडविणे, क्रांतिकारक आणि राजद्रोही वांङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे,  तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे असे आरोप होते. याशिवाय  कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे,  हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे असे आरोप होते. अर्थात हे आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला. अशा क्रांतिकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. ना खडग बिना ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळालेले नाही तर रक्त सांडूनच मिळाले आहे. 
  •    भगतसिंगांचा विचारच क्रांतिकारक आणि विज्ञानवादी होता. समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नयेत असा त्यांचा विचार होता. समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये, हे भगतसिंगांनी स्पष्टपणे सांगितले होते. 
  •     समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी म्हटलेे होते. 
  • हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. अशा क्रांतिकारकांच्या बलिदानानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. ते अहिंसेेने, असहकाराने किंवा एकदा चले जाव म्हटल्याने मिळालेले नाही. त्यामुळे या शहीदांचे बलिदान सतत स्मरणात असले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: