- वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. आद्यक्रांतिवीर म्हणून वासुदेव बळवंत फडके यांचे नाव घेतले जाते. याचे कारण १८५७ चे ब्रिटीशांविरोधातील बंड हे राजे रजवाडे, संस्थानिक यांचे होते. परंतु सामान्यांसाठी, शेतकर्यांसाठी केलेले बंड हे वासुदेव बळवंत फडके यांचे बंड होते. ते सर्वात पहिले बंड होते.
- रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच वासुदेवरावांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले आणि सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.
- त्यावेळी त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला होता. भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश सरकारची धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे महत्त्व फडक्यांना पटवले. त्यांनी मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करणे महत्त्वाचे असल्याचेही फडक्यांना पटवून दिले. त्यामुळेच वासुदेव बळवंत फडके यांचे बंड आणि लढा हा सर्वसामान्यांचा लढा होता.
- आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकार्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली. त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. १८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.
- यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले. पण त्यांनी ही वेळ नाही, असे सांगून त्यांना निराश केले. फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देउन आपल्या सैन्यात भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली.
- शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालिला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितूरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणार्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले. याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणार्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.
- या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियेल या अधिकार्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.
- त्यानंतर २० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाई झाली. त्यानंतर इंग्रज सरकारने वासुदेवरावांना जिवंत पकडले. तेथून त्यांना पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले आणि त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. वासुदेवरावांना अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या वासुदेवरावांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागर्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले. तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणूकीविरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी आमरण उपोषण केले. त्यामुळे त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यू आला.
- अशा क्रांतिकारकांच्या बलिदानाचा परिपाक म्हणजे आजचे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यासाठी अशा महान विभूतींनी रक्त सांडले आहे. अहिंसा आणि खडग बिना, ढाल बिना अशी आजादी मिळालेली नाही. एकदाच चले जाव म्हटल्याने इंग्रज इथून गेलेेले नाहीत.
शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५
ेजो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुरबानी-वासुदेव बळवंत फडके
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा