- स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर दोन दिवस नावेद नामक एक़ा दहशतवाद्याला पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. ही गोष्ट समाधानाची असली तरी देशात मोठ्या प्रमाणात दहशतवादी संघटना, कारवायांसाठी आक्रमक झाल्या असल्याचे दिसत आहे. दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा उचल खाल्लेली आहे. एकाच आठवडयात दोन वेळा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात घुसून हल्ला केला. उधमपूरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनीच हल्ला केला. त्यात दोन जवान शहीद झाले, एक दहशतवादी ठार झाला आणि महंमद नावेद नावाच्या ‘दुसर्या कसाब’ला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. या दहशतवाद्याला कसलीही दयामाया न दाखवता त्याला ‘बोलते’ करण्याची गरज आहे.
- ऑगस्ट महिन्याची सुरूवात झाली तीच गुरूदासपूरच्या हल्ल्याच्या बातमीने. गुरुदासपूरच्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दोघांना ठार केले. त्यात गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षकही शहीद झाले. त्यांचे वडीलही १९८४ साली दहशतवाद्यांशी सामना करतानाच शहीद झाले होते. गुरुदासपूरचा हल्ला अनपेक्षित होता. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याची ती पुनरावृत्तीच होती. आताही उधमपूरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनीच हल्ला केला. त्यात दोन जवान शहीद झाले, एक दहशतवादी ठार झाला आणि महंमद नावेद नावाच्या एकाला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. यावरून दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.
- अवघ्या २० वर्षाचा नावेद पाकिस्तानचा रहिवाशी आहे. गुरुदासपूर येथे हल्ला केलेले दहशतवादीही पाकिस्तानमधून आले होते आणि आता ‘भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी घुसलो,’ अशी कबुली देणारे ‘लष्कर-ए तोयबा’चे हे दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक आहेत. त्यांना १२ दिवस भारतात घुसण्यासाठी लागलेले आहेत. त्याची कबुलीसुद्धा त्यांनीच दिलेली आहे. जंगल भागातून लपून छपून ते भारतात येईपर्यंत सीमेवर पहारा करणार्यांना ही घुसखोरी समजू नये, ही अतिशय चिंतेची बाब आहे. भारतात असणारे पाकप्रेमी काही लोक अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहेत. या संकटाचा विचार करण्याची गरज आहे.
- खरं तर पाकिस्तान सीमेजवळ शेवटचे गाव ‘डेराबाबा नानक’ आहे. या गावाच्या पलीकडे पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि तारेच्या कुंपणांनी भारत-पाकिस्तानची हद्द सील केलेली आहे. या तारेच्या कुंपणांमध्ये विद्युतप्रवाह सोडलेला असतो. तारेला चुकून हात लागला तर माणसाचा कोळसा होईल. येथे २४ तास पहारा असतो. एका जवानाला सहा तासांची सेवा द्यायची असते. ती सीमा पार केल्याशिवाय दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसता येत नाही. प्रदेश डोंगराळ आहे. असे असूनही एकाच आठवडयात पाकिस्तानचे दहशतवादी सीमापार करून भारतात घुसतात, ही चिंतेची गोष्ट बनलेली आहे. हा पकडलेला नावेद सांगतो आहे की, त्यांना अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करायचा होता. जर हे यात्रेकरू या दहशतवाद्यांच्या तावडीत सापडले असते तर किती भयानक अनर्थ घडला असता. आता नावेदकडून याची सगळी कबुली मिळेल आणि ती मिळवण्याकरिता लष्कराला त्यांचा जो काही खाक्या वापरायचा तो त्यांनी सरळ वापरावा. आपल्याकडे काही महाहालकट असे मानवतेच्या नावाने बोंब मारणारे राजकीय नेते आहेत. काही डावे, समाजवादी, मानवतावादीही आहेत. याकूबच्या फाशी रद्द करण्याच्या हालचालींवरून या पाकधार्जिण्या राजकीय नेत्यांचा चेहरा समोर आला होता. परंतु त्यांची भिडभाड न बाळगता नावेदकडून या कटामागचे सूत्रधार शोधून काढले पाहिजे.
- याकूब मेमनला महान करणारे वैचारिक दारिद्य्र असलेले कुबेर पत्रकारही या देशात आहेत. पण अशा दरिद्री कुबेरांच्या विचारांकडे दुर्लक्षच केलेले बरे. दोन जवानांना शहीद करणारा हा दहशतवादी ताब्यात मिळाल्यानंतर त्याची गय करता कामा नये.
- नावेद हा ‘लष्कर-ए तोयबा’चा दहशतवादी आहे. त्यामुळे त्याच्याकडून तपशिलात माहिती मिळू शकते आणि त्या महितीच्या आधारावर अनेक हल्ल्यांच्या जो आराखडा दहशतवाद्यांनी ठरवला असेल त्याच्या मुळापर्यंत थेट पोहोचता येऊ शकते आणि म्हणून या दहशतवाद्याला कसलीही दयामाया न दाखवता त्याला बोलते केले पाहिजे.
- सीमेपलीकडे दहशतवाद्यांना रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. भाजप सरकारची काही पावले अत्यंत चुकीची पडत आहेत. याकूबच्या फाशीचा राजकीय बाजार भाजपाने केला. त्याला नको इतकी प्रसिद्धी देवून भाजपने कारण नसताना हा विषय चर्चेत आणला. देशातले सगळे विषय संपले असावेत असा आभास भाजपने निर्माण करून याकूबच्या फाशीची बाजार मांडला. त्यातून दहशतवाद्यांना डिवचण्याचा प्रकारही झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारने आता दहशतवादाला खतपाणी न घालता तो रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा जो कोणी नावेद पकडला आहे, तो भारताचा शत्रू आहे, त्याला शत्रूसारखीच वागणूक देण्याची गरज आहे. प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणार्या वाहिन्यांच्या समोर त्याला आणता कामा नये. नाहीतर याकूबबाबत जसा अनेकांना पान्हा फुटला तसा पुन्हा फुटेल आणि दहशतवाद्यांना चेव फुटेल. आज दहशतवादी कारवाया पुन्हा सक्रीय होण्यामागे जे अशा लोकांच्या फाशीला विरोध करतात, सह्यांची निवेदने देतात हे लोक आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५
दहशतवाद्यांसाठी पान्हा फुटू देवू नका
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा