रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

ओरिजनल आणि बाटग्यांच्या गटात विभागलेले भाजपेयी

  • राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील पाच आमदार, पंधरा माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याला सुरवातही झाली आहे. सामान्यांमध्ये विश्‍वास मिळवल्यानेच लोक आमच्याकडे येत आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसा भाजप हा सध्या संधीसाधूंसाठी सुवर्णसंधी असलेल्यांचा पक्ष झालेला आहे. भाजपला आपला विचार सर्वदूर पोहोचवून संख्याबळ वाढवता येणे शक्य नसल्यामुळे निवडून येण्याचा आणि पैसा खर्च करण्याची कुवत या शक्यतांवर आधारीत उमेदवारी देण्याचे धोरण आखून भाजपने कॉंग्रेसच्या पावलावर पाउल टाकण्याचे काम केले. त्यामुळेच हा भाजप आता भविष्यात कालच्या शेअरबाजाराप्रमाणे एकदम कोसळल्यास आश्‍चर्य वाटायला नको.
  •   एखादा राजकीय पक्ष सत्तेच्या जवळ पोहोचू लागला, की त्यामध्ये आयारामांची गर्दी सुरू होते. वाजपेयी सरकारच्या रालोआला ओहोटी लागली आणि २००४ मध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआच्या सत्ताकाळात तो ओघ कॉंग्रेसकडे होता. आता तो पुन्हा भाजपच्या बाजूने वाहताना दिसत आहे. हा सगळा संधीसाधू लोकांचा प्रवाह आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीआधी अशा आयारामांचा ओघ भाजपकडे वळला. असे झाले, की कोणत्याही राजकीय पक्षात आपोआपच दोन तट तयार होतात.     आज भाजपमध्ये ओरीजनल आणि बाटगे असे दोन गट झाले आहेत. हे बाटगे केव्हाही धोका देवू शकतात याची भिती ओरीजनल भाजपेयींना वाटते. हाच प्रकार पूर्वी कॉंग्रेसमध्ये घडत होता. म्हणजे नारायण राणे जेव्हा कॉंग्रेसवासी झाले तेव्हा विलासराव देशमुख यांनी त्यांना नव्या सुनबाई आहेत, अजून चहा साखरेचे डबे कुठे ठेवले आहेत ते समजायचे आहे असे हिणावून राणेंचे वस्त्रहरण केले होते. त्या हिंटमुळे सामनाने नारायण राणे यांना साडी नेसवली होती. कारण कानामागून येऊन तिखट बनू पाहणार्‍या आयारामांना नेहमीच वेगळे पाडण्याचे प्रयत्न सुरू होतात. आपण पक्षातील मूल निवासी म्हणजे, निष्ठावंत आहोत, हे दाखविण्याची धडपड सुरू होते. असे सिद्ध करण्याची पक्षापक्षांतील निष्ठावंतांची तर्‍हा वेगवेगळी असली, तरी त्यामागील वेदना एकच असते. त्यामुळे पक्षनिष्ठा सिद्ध करणे हे एक राजकीय दिव्य असते.   कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये निष्ठा व्यक्त करण्याचा मार्ग काहीसा सोपा आहे. आपण पक्षाच्या मूळ प्रवाहाचाच एक भाग आहोत, हे सिद्ध करण्यासाठी पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जोडून ठेवली की झाले. परंतु २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपेयी झालेल्या नवहिंदुत्ववादी आमदारांपैकी अनेकांनी अजून संघ मैदानावर हजेरी लावलेली नाही. यामध्ये पनवेलच प्रशांत ठाकूर, चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांच्यासह मुळचे कॉंगी असलेल्या बबनराव पाचपुतेंसारख्या अनेकांनी चड्डी धारण केलेली नाही. भाजप निष्ठा दाखवण्यासाठी पक्ष सत्तेवर आल्यानंतर सत्तेपासून दूर असलेल्या निष्ठावंतांची ही आजकालची गरज झाली आहे. निवडणुकीपासून पक्षात सुरू झालेल्या आयारामांच्या बेसुमार लोंढयामुळे, खरा भाजपाई कोण आणि काल येऊन दाखल झालेला कोण यामध्ये मोठीच गल्लत सुरू झाली आहे. मूलनिवासी भाजपाईंची काहीशी कोंडीदेखील होऊ लागली आहे. अशा वेळी आपल्या जन्मदात्यांच्या पायाशी लोळण घेऊन,  बाबाजी लक्ष असुद्या बाबाजी अशी याचना करणे हा साहजिक उपाय उरतो.
  •  गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपमधील अनेक निष्ठावंतांच्या गळ्यात काहीशा अनपेक्षितपणे खासदारकीची माळ पडली. आपला विजय ही मोदी लाटेचीच किमया असून त्यामुळेच निवडून आल्याची कबुली अनेकांनी अगोदरच देऊन ठेवल्याने, स्वकर्तृत्वाच्या पाढयाचे पुस्तक अनेकांनी स्वत:हून अगोदरच बंद केलेले होते. सत्ता हाती आल्यानंतर सहजपणे तिची फळे चाखणार्‍या आयारामांच्या गर्दीत आपला निभाव लागण्याची उमेद आता वर्षभरानंतर मावळत चालल्याने अशा काही निष्ठावंतांच्या वेदना अलीकडे मात्र अधिकच वाढू लागल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे मूळच्या भाजपच्या नेत्यांचे खच्चीकरण होताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठांना दूर केले. आपल्या शर्यतीत असलेल्या सूषमा स्वराज यांच्यावर आलेल्या वादळात स्थितप्रज्ञाची भूमिका घेतली. तर महत्त्वाच्या खात्याच्या मंत्रीपदावर असलेल्या अरूण जेटली यांना जनाधार मिळू शकलेला नाही या दबावात टाकले गेले आहे.
  •    त्यामुळे ओरिजनल भाजपेयींना आता संघशाखेवर उपस्थिती लावून, ध्वजासमोर नतमस्तक होऊन फक्त स्वयंसेवकगिरी करावी लागणार असे दिसते. आयारामांनी आपला पक्ष हायजॅक केल्याने या पक्षात आता राम नाही याची जाणिव ओरिजनला भाजपेयींना झालेली दिसते. त्यामुळे आता संघाच्या शाखेवरील आपली दैनंदिन उपस्थिती हा आपल्या वेदनेवरील उपाय ठरेल असा विचार होत आहे. पण बाटग्या भाजपेयींचे ओरिजनल भाजपेयींपुढे असलेले आव्हान आणि ओरिजनल भाजपेयींकडून बाटग्यांना होणारा सासुरवास यामध्ये सध्याची भाजप सापडली आहे हे निश्‍चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: