यांना हाकलूनच अच्छे दिन येतील

- केंद्रिय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नुकतीच मुक्ताफळे उधळून आपल्या सरकारच्या प्रवृत्तीचा नमुना दाखवून दिला. ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवली नव्हती..’ असे तोमर सहजपणे बोलून गेले. म्हणजे या बोटावरची त्या बोटावर करणे म्हणजे नेमके काय हे या तोमर यांच्या बोलण्यावरून लक्षात यावे. भाजपची कार्यप्रणाली थापा मारणे, खोटी कुजबूज निर्माण करणे, स्वत:च्या मानगुटीवर बसण्याआधी ते भूत दुसर्याच्या मानगुटीवर बसवणे अशी आहे. पण ज्या जाहीराती देशातील नागरिकांना आजही तोंडपाठ आहेत आणि ज्या जाहीराती करून आपण सत्तेवर आलो हे स्पष्ट झाले आहे तरी तोमर म्हणतात आम्ही हे स्वप्न दाखवलेच नव्हते. याला काय म्हणावे?
- एवढे सांगूनच फक्त तोमर थांबलेले नाहीत. त्यांनी आपली अक्कल पाजळताना मोदींच्या जाहीरनाम्याचा पंचनामा केलेला आहे. तोमर म्हणतात, ‘परदेशातला काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये चढवू,’ असे प्रचारात मोदी म्हणालेच नाहीत. गुजरातमधून हद्दपार करण्यात आलेले भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी १४ जुलै २०१५ रोजी भोपाळ येथील एका सभेत असे जाहीर केले होते की, ‘अच्छे दिन येण्यासाठी २५ वर्षे लागणार आहेत.’ म्हणजे भाजप नेत्यांकडून देशभरातील जनतेचा किती विश्वासघात केला आहे हे आता समोर येवू लागले आहे. बहुदा या खोटे बोलण्यामुळे भाजपचे बुरखे एक्स्पोज होत असावेत. त्यामुळे भविष्यात जनता त्यांना नाकारेल. हेच अच्छे दिन पाच वर्षांनी येतील असे दिसते.
- खोटे बोलण्याची स्पर्धा घेतली तर भाजप नेते हे ऑलिंपिक गोल्डमेडल सतत आपल्याकडे राखतील असे वाटू लागले आहे. खोटे बोलण्यात ही मंडळी जगात सगळयात निष्णात आणि तरेबज आहेत. तोमर यांनी त्यावर कळस चढवला आहे.
- २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारकाळात मोदींनी देशभर ३४८ सभा घेतल्या. त्या प्रत्येक सभेत मोदी महाराज यांनी दोन घोषणा केल्या, ‘अब की बार भाजपा सरकार’, ‘अच्छे दिन की शुरुवात’ त्यानंतर भाजपाने घोषणा दिली की, ‘महंगाई की पडी मार, अब की बार मोदी सरकार..’ १ जानेवारी २०१४ रोजी बनारस येथे भाषण करताना मोदींनी ‘अच्छे दिन’चा पहिल्यांदा उल्लेख केला. त्यानंतर घरा-घरात ‘अच्छे दिन’चा पुकारा सुरू झाला. लोकांच्या अपेक्षा आकाशाला भिडल्या.
- वस्तुस्थिती अशी आहे की देशाचे सरकार चालवताना मोदींची दमछाक होऊ लागली आहे. पावसाळी अधिवेशनात मूठभर विरोधकांनी कामकाज होवू दिले नाही. त्यामुळे मोदींच्या आता लक्षात आले की, देश चालवणे सोपे काम नाही. ३२३ चे पूर्ण बहुमत मिळाले असताना संरक्षण आणि रेल्वे या दोन महत्त्वाच्या खात्यांसाठी मोदींना लोकसभेचे सदस्य नसलेल्या दोघांना आयात करावे लागले. मनोहर पर्रिकर आणि सुरेश प्रभू यांना राज्यसभेवर घेऊन या दोन मोठया खात्यांची जबाबदारी द्यावी लागली. आजही मोदींच्या मंत्रिमंडळात स्वत:चे खाते समर्थपणे पेलणारे कोणीही नाही.
- फक्त अंबानी, अदानी अशा भांडवलदारांना खूष करण्यापुरते मोदींचे सरकार आहे. भाजपच्या निवडणुकीतील अफाट खर्चाचे प्रायोजक हेच भांडवलदार होते. त्याबदल्यातच मोदींनी भूमिअधिग्रहण विधेयक आणण्याचा कट रचला होता. मोदींचा तो कट लोकसभेत विरोधी बाकावर बसलेल्या अवघ्या ४५ संख्येतल्या विरोधकांनी हाणून पाडला. बहुमत असूनही नरेंद्र मोदींना सरकार चालवता येत नाही हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे भयभीत झालेले भाजप नेते आता अच्छे दिन येण्याचे स्वप्न विसरून गेले आहेत. त्यामुळे हात वर करून मोकळे झाले आहेत.
- दुसरीकडे महागाईवर नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले नाही. जो व्यापारी वर्ग एक वर्षापूर्वी शंभर टक्के मोदींसोबत होता, त्या व्यापारी वर्गाचाही मोठया प्रमाणात भ्रमनिरास झाला. त्यामुळे १५ महिन्यांत मोदींचे अवसान गळून पडले आहे. पूर्वी जे लोक ‘मोदी-मोदी’ करत होते, जे लोक वाहिन्यांवर मोदी दिसले की, त्यांची भाषणे ऐकण्यात तल्लीन होत होते, त्याच लोकांनी महागाईने हैराण झाल्यामुळे मोदींचे नाव टाकले आहे. ज्यांनी मोदींना डोक्यावर घेतले होते, त्यांचा १५ महिन्यांत भ्रमनिरास झाला आहे.
- त्यामुळेच आता जेव्हा जनमत भाजपा आणि मोदींच्या विरुद्ध वेगाने जात आहे, असे लक्षात आल्यावर ‘अच्छे दिन’ची स्वप्ने आम्ही दाखवली नव्हती, असे हे नेते सांगू लागले आहेत. पण मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. बाजू उलटत चालली की, गप्प बसायचे हे मौनं सवार्थ साधते असे धोरण मोदींचे आहे. लंबीचौडी भाषणे करणारे मोदी आता ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून गप्प आहेत. जनतेने हेच लक्षात घेतले पाहिजे. अशा खोटारड्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या वळकट्या आता बांधायची वेळ आलेली आहे. त्याची सुरूवात आगामी काळात बिहारपासून सुरू झाली पाहिजे. तसेच शत प्रतिशत भाजप म्हणत जिल्हा परिषद, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे झुकू पहात असलेल्या भाजपला इथेच रोखून मतदारांनी आपली चूक आता सुधारली पाहिजे. यांना हाकलूनच आता अच्छे दिन येतील हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा