- आज भारतीय स्वातंत्र्याचा अडुसष्टावा वर्धापनदिन आहे. सध्या हयात असलेल्या लोकांपैकी ९० टक्के लोक हे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले आहेत. परंतु या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, ज्यांनी आपले रक्त सांडले आणि जे घरापासून दुरावले त्यांचे स्मरण करणे हा कृतज्ञताभाव आहे. आजच्या दिवशी त्या हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केल्याशिवाय खरा स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. आज आपण स्वतंत्र आहोत ते त्यांच्यामुळेच त्यामुळे त्यांच्या ऋणात राहणे हे आपले कर्तव्य आहे.
- भारतीय स्वातंत्र्यदिवस प्रतिवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणूका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
- १७७० पासून जवळपास दीडशे वर्ष भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची आणि कडक केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली. त्यापूर्वीच ब्रिटीशांपासून या भारतीयांचे स्वत:चे असे राज्य असले पाहिजे ही गर्जना लोकमान्य टिळकांनी केली होती. स्वराज्याची हाक लोकमान्यांनी दिली होती. त्यानंतर २० व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. परंतु अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीत बळी गेलेले हजारो क्रांतिकारक, त्यानंतर ब्रिटीशांना जेरीस आणणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, चापेकर, सावरकर यांनी स्वराज्यासाठी अतोनात यातना सोसल्या होत्या म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे लक्षात घेतले पाहिजे.
- आज अनेक ठिकाणी दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल अशी गाणी लावली जातात पण हातात शस्त्र घेवून सशस्त्र क्रांती झाली आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, लाला लजपतराय अशा अनेकांनी रक्त सांडले म्हणूनच ही स्वातंत्र्याची मजा आपल्याला उपभोगता येते आहे हे लक्षात घेतले पाहिजे. महात्मा गांधींनीही आपल्या परिने शांततेच्या मार्गाने ब्रिटीशांना विरोध केला. सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात कॉंग्रेसने संपूर्ण स्वराज्यची घोषणा केली, त्यामागे लोकमान्य टिळकांचा विचार होता. १९३० साली कॉंग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यसाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले आणि त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली. दुसर्या महायुद्धनंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य आणि युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसर्या बाजूला भारतीय क्रांतिकारींचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली.
- या असंख्य प्रयत्नांनंतर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण जाताजाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणार्या अनेक शिख माणसांना त्यांचे घरदार,पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. १९०५ साली इंग्रजांनी बंगालची फाळणी केली होती. तेव्हा लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, बाळ गंगाधर टिळक या लाल बाल पाल या त्रिकुटाने पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रातून कडाडून विरोध करून ही फाळणी मागे घेण्यास लावली होती. त्यामुळे ब्रिटीशांनी सूडबुद्धीने भारताचे तुकडे करायचेच हे धोरण ठरवले होते. त्याचाच एक भाग पाकीस्तानची निर्मिती आणि भारताची फाळणी हा होता. पंजाबचा काही भाग पाकीस्तानात गेला. बंगालचा काही भाग पाकीस्तानात गेला. या ब्रिटीशांच्या क्रूर आणि सूडाच्या सत्तेपासून भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले पण सुराज्य मात्र मिळाले नाही. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने देशात सुराज्य स्थापन होईल अशा अपेक्षा करण्याची वेळ आलेली आहे.
- स्वतंत्र भारत हा २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक राष्ट्र झाला. भारताचे संविधान तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले.
- पण आता ६८ वर्षांनंतर स्वातंत्र्याचा स्वैराचार सुरू असताना सुराज्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे. रोजगार, आरोग्य, किमान सुविधा आणि देशाची प्रगती यासाठी सार्वत्रिक प्रयत्न यशस्वी होण्यासाठी शासन आणि प्रशासनातील भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. दप्तरदिरंगाई थांबली पाहिजे हीच अपेक्षा यानिमित्ताने करावी लागेल.
शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५
आता सुराज्याची अपेक्षा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा