- गेल्या काही दिवसांत आपल्याकडे पेट्रोलचे भाव कमी होताना दिसत आहेत. महिनाभरात जवळपास चार ते पाच रूपयांनी पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. परंतु त्याचा संबंध मोदी सरकारने अच्छे दिन आणले आणि स्वस्ताई केली आहे याच्याशी कोणीही लावू नये. नमो प्रेमी भाबडेपणाने तसा समज करून घेतील पण पेट्रोलच्या किमती कमी झाल्याचा फायदा हा सामान्य माणसांना कधीच मिळत नसतो. पेट्रोल डिझेलचे दर वाढले की ट्रान्स्पोर्टचे दर वाढतात पण दर कमी झाले म्हणून कधी सामान्यांसाठी आवश्यक बससेवा, रिक्षा, टॅक्सीचे सार्वजनिक वाहतुकीचे दर कमी झाल्याचे घडलेले नाहीत. त्यामुळे हे अच्छे दिन नाहीत. किंवा नरेंद्र मोदींच्या करीष्म्यानेही हा चमत्कार घडून दर उतरले असे समजण्याची आवश्यकता नाही.
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ४० डॉलर्सच्या खाली गेल्याने सगळीकडे त्याचे पडसाद उमटत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये प्रतिबॅरल ११५ डॉलर असे दर होते. शेअर बाजाराच्या निर्देशांकांवरही त्याचा दबाव कायम राहिला. या किमती आता इ. स. २००९ सालच्या पातळीवर गेल्या असून त्याच्याच जोडीला चीनच्या आर्थिक वेगाला ऑगस्टमध्येही अटकाव बसल्याने जागतिक आर्थिक मंदीचे संकट आले आहे. सोमवारची सकाळ सुरू झाली तीच मुळी शेअर बाजारात पडझड होवून झाली. शेअरबाजारातील पडझड ही प्रामुख्याने युआनच्या अवमूल्यनामुळे, चीनच्या अपेक्षाभंग करणार्या कामगिरीचे सावट पडल्याने झालेली आहे. परिणामी, शेअरबाजारातील महिन्याभराचे लाभ आठवड्यात पुसले गेले. मात्र, त्यावर तेलाच्या घसरत्या किमतीचाही प्रभाव आहे.
- आज जगातील प्रमुख तेलनिर्मिती सर्व कंपन्यांनी तेलाचे भाव पडत असतानाही तेलनिर्मितीचा वेग कायम ठेवला आहे. तेलाचा प्रचंड अतिरिक्त साठा निर्माण होतो आहे. त्यामुळे तेलाचे भाव सतत खालच्या पातळीवर आले आहेत. तेलाचे दर आणखी उतरण्याचीही शक्यता आहे. आता परिस्थिती अशी आहे की तेलाची आयात, साठवणूक आणि त्याच्या वाहतुकीचा खर्च जास्त आणि खरेदीचा खर्च कमी त्यामुळे आयातीवरच निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
- या अतिरिक्त तेलनिर्मितीत अमेरिकेतील तेलकंपन्या सर्वाधिक आघाडीवर आहेत. सौदी अरबस्तानच्या नेतृत्वाखालील तेल उत्पादक राष्ट्रे (ओपेक) तसेच रशिया हे अन्य मोठे तेलउत्पादक देश असून अमेरिकेच्या या तेलाच्या मार्यात त्यांना दीर्घकाळ नुकसान सोसावे लागणार आहे. साधारण प्रतिबॅरल ८० डॉलरचा दर सौदी अरबस्तान आणि रशिया आदी देशांना तारणारा व परवडणारा ठरू शकतो. मात्र, तेलाचे भाव त्याहूनही खाली जात असताना उत्पादक तेलनिर्मिती का वाढवत आहेत, या प्रश्नाचे उत्तर समजून घेणे आवश्यक आहे.
- अमेरिकेने २०१६ मध्ये कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ६० डॉलरच्या खालीच असतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसे त्यांचे नियोजन आहे. आज प्रतिबॅरल ४० डॉलरचा दर ६० डॉलरपर्यंत जायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत हे असेच सुरू राहील. डिसेंबरपर्यंत ६० डॉलरची पातळी गाठली जाणे कठीणच आहे. तेलाच्या किमती प्रदीर्घ काळ उतरत्या राहिल्या तरच तेलनिर्मिती कंपन्या उत्पादनावर नियंत्रण आणतील. त्यामुळे येत्या दीड दोन वर्षांपर्यंत त्या नियंत्रणात राहतील. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर आणखी कमी होतील. पण त्याचा अच्छे दिनशी काही संबंध नसेल हे लक्षात घेतले पाहिजे.
- आज जगातील दुसर्या क्रमांकाचा तेलग्राहक देश चीन आहे. त्याच्याही मागणीत घट होत आहे. भारतासाठी अर्थातच तेलाचे भाव पडणे, हे वरदान आहे. तेल आयातीवर खर्ची पडणारा पैसा आणि मौल्यवान डॉलरचे चलन वाचणार आहे. कारण भारत गरजेपेक्षाही अधिक तेल आयात करतो. तेलाच्या भावातील एक डॉलरची घसरणही आपल्या देशाला फार मोठी बचत करून देते. तेलाच्या घसरत्या किमतीमुळे डॉलर नेहमीच मजबूत होतो. रुपयाला ६५.८०च्याही खाली खेचण्यात त्याचाही वाटा आहे. मात्र, या कमी किमती अजून काही काळ स्थिरावणार असल्याचा दिलासा ग्राहकांना मिळणार असला तरी देशातील इंधनाचे भाव अजून खाली येण्याची आवश्यकता आहे.
- चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केले आहे. भारतीय रूपयाची अवस्थाही विक्रमी अशी आहे. त्यामुळे गेल्या वर्षी निवडणुकीत जाहीर सभांमधून पेट्रोल के भाव कम हुऐ के नही? हुए के नही असे विचारून सभा गाजवून सोडल्या होत्या. पण ते भाव काही नरेंद्र मोदी यांनी कमी केलेले नव्हते हे जनतेच्या लक्षात आले नव्हते. भोळी जनता त्यांच्या मागे गेली. पण प्रत्यक्षात चित्र फार वेगळे दिसू लागले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या बदलांचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर उमटत आहेत. चीनच्या मंदीचा फारसा परिणाम होणार नसला तरी निर्देशांक घसरला आहे. परंतु आपल्या देशात चिनी मालाची आयात मोठ्या प्रमाणात होते. चीनने भारतीय बाजारपेठ काबिज केलेली असल्यामुळे भारताला झाला तर त्याचा फायदाच होईल. त्यामध्ये चीनी उत्पादने आणखी स्वस्त उपलब्ध होतील हे लक्षात घेतले पाहिजे. पण ही स्वस्ताई म्हणजे अच्छे दिनची स्वस्ताई असणार नाही. आपल्याला स्वस्ताई हवी ती धान्य, दूध, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुंमधील दरवाढ कमी झाली पाहिजे. तरच अच्छे दिन आले असे म्हणता येईल.
रविवार, २३ ऑगस्ट, २०१५
हा परिणाम अच्छे दिनवाल्यांमुळे नाही झाला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा