सोमवार, १० ऑगस्ट, २०१५

पाक दहशतवादामागची शक्ती

  • ज्याप्रकारे अजमल कसाब हा आपल्या गँगसह मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यासाठी आला होता तसाच आणखी एक पाकीस्तानी अतिरेकी नुकताच हल्ला करण्याच्या हेतुने भारतात आला होता. परंतु कसाबला जशी संधी मिळाली तशी संधी मिळण्यापूर्वीच तो पकडला गेला. साधारणपणे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी असे महत्त्वाचे राष्ट्रीय सणाचे दिवस जवळ आले की अतिरेकी कारवायांमध्ये वाढ होते. त्यामुळेच असाच एखादा घातपात करण्यासाठी आलेला पाकीस्तानी पकडला गेला.
  •    जवळपास सात वर्षांनी पुन्हा एकदा एक पाकिस्तानी अतिरेकी भारताच्या ताब्यात आला. पाकिस्तानला त्यांचे दहशतवादी दात घशात घालण्यासाठी आता आणखी एक सज्जड पुरावा हाती आला आहे. परंतु तसे समजणे हा भाबडेपणा ठरेल. कारण दाउदसारखे अनेक दहशतवादी पाकीस्तानच्या आश्रयाला असताना त्याला ताब्यात देण्यास पाकीस्तानने सातत्याने नकार दिला आहे आणि अशा दहशतवाद्यांना पाठीशी घातले आहे. त्यामुळे पाकीस्तानला यापासून आपण पुरावे देवून जाब विचारू शकू असा भ्रम करून घेणे चुकीचे आहे. 
  •   पाकिस्तान लष्कर, विशेषत: आयएसआय, सातत्याने भारताविरुद्ध कारवाया करीत असते हे आपल्याला माहीत असले तरी पुरावा हाती नसतो. मुंबईवरील हल्ल्यात कसाब हाती लागला आणि प्रथमच पुरावा हाती आला होता. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या साह्यामुळे आणखी काही पुरावा देता आला होता. अमेरिकी नागरिकही या हल्ल्यात अडकल्यामुळे अमेरिकेला ही उपरती झाली नाहीतर अमेरिकेने सातत्याने पाकीस्ताची पाठराखण केली आहे. अमेरिकेच्या पाठराखणीमुळेच पाकीस्तानला चेव फुटत राहिला आहे. परंतु कसाबच्या बाबतीत त्या पुराव्याची पाकिस्तान कशी वासलात लावीत आहे हे आपण पाहत आहोत. त्यामुळेच हा नवा दहशतवादी पकडला तरी त्यामुळे पाकीस्तानचे कान उपटता येतील असे समजण्याचे कारण नाही.
  •  उधमपूरजवळ पकडलेला नावेद हा अतिरेकी तर केवळ नशिबानेच हाती आला आहे. त्याच्या एकंदर वर्तणुकीसह तो देत असलेल्या माहितीबद्दल संशय घेण्यास जागा आहे. अर्थात हे जे जेहादसाठी तयार झालेले पाकीस्तानी मुस्लिम अतिरेकी असतात ते नेहमीच असा सोज्वळपणा दाखवत असतात. कसाबही आपल्या चेहर्‍यावर सातत्याने इनोसंट असल्याचे भाव दाखवत होता. राखी पौर्णिमेला मला कोणीतरी राखी बांधा म्हणून जेलमध्ये हिंदू महिलांकडे त्याने मागणी केल्याचेही सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे नावेदच्या बाबतही गाफिल राहून चालणार नाही.
  •  कसाब आणि त्याच्या सहकार्‍यांच्या हालचालींवरून, भरपूर प्रशिक्षण घेऊन तयार झालेले हे अतिरेकी आहेत, असे सहज लक्षात येत होते. त्यांनी दिलेली कडवी झुंज सर्वांच्या लक्षात आहे. या तुलनेत नुकताच पकडलेला नावेद नवशिका व बावळट अतिरेकी वाटतो आहे. एके-४७ हातात असणार्‍या अतिरेक्याला जेवण मिळू नये व दोन नि:शस्त्र व सर्वसाधारण चणीच्या गावकर्‍यांनी जेरबंद करावे हे आश्चर्यकारक आहे. नावेद प्रशिक्षित नसावा, असा एक अर्थ यातून निघतो. पण परिस्थिती फार वेगळी असू शकते. नावेदकडे लक्ष वेधून आणखी कुठल्या मार्गाने दुसरे अतिरेकी भारतात १५ ऑगस्टच्या निमित्ताने पाठवलेले असू शकतात. गनिमी कावा म्हणतात तसा हा कावा करून भारतीय संरक्षण व्यवस्थेचे नावेदकडे लक्ष वेधून आणखी काही तयार कसाब सोडले नाहीत ना हे पहावे लागेल.
  •   नावेदचे एकूण वर्तन आणि त्याची शरणागती हे नाटक आहे. आयएसआय हे जाणीवपूर्वक करीत आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला भारताला इशारा द्यायचा आहे. ‘मी हिंदूंना मारायला आलो व मारण्यात मला मजा वाटते,’ असे नावेद म्हणाला. पाकचा भारताला हाच इशारा आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कश्मिरमधील पंडित हिंदूंचा संहार गेल्या तीन चार दशकात पाकीस्तानने केला आहे त्याप्रमाणे संपूर्ण भारतात दहशत माजवणे हे पाकीस्तानचे कायमचे ध्येय आहे. भारताला रक्तबंबाळ करीत राहण्याची योजना पाकने सोडून दिलेली नाही. ती अधिक जोरकसपणे सुरू राहणार आहे आणि कदाचित पुढील काळात काश्मीरबरोबर त्याला खलिस्तानची जोड मिळेल हे पाकिस्तानच्या लष्कराला सूचित करायचे आहे. कसाबप्रमाणे नावेद हा गरीब कुटुंबातील नाही. त्याचे कुटुंबीय उच्च मध्यमवर्गातील आहेत. त्याचे वागणे-बोलणे ठरवून दिल्याप्रमाणे वाटते. त्याची शरणागती हा भारतासाठी संदेश असू शकतो. असे हजारो मुस्लिम तरूण जेहादच्या नावाखाली भारतात घातपात करण्यासाठी येणार आहेत असा हा संदेश असू शकतो. हा संदेश धोकादायक आहे.
  •    पाकिस्तानला सरळ करण्याची भाषा आपल्याकडे अनेकदा होते. पाक कसा अडचणीत सापडला आहे याची चर्चा होते. वस्तुस्थिती तशी नाही. जगाच्या व्यासपीठावर पाकिस्तानने आपला जम पुन्हा बसवला आहे. चीनची भक्कम साथ मिळाल्यामुळे पाकची अर्थव्यवस्था सुधारत चालली आहे.  अफगाणिस्तानमधील सत्ताधारी पाकबरोबर जुळवून घेत आहेत. सौदी अरेबियाही पाकच्या पाठीशी आहे. भारताला छळणारे दहशतवादी पाक पोशीत असेल तर त्याबद्दल ही राष्ट्रे तक्रार करणार नाहीत. उद्या ‘इसिस’ला रोखण्यासाठी पाकची मदत होत असेल तर सर्व जग पाकिस्तानच्या मागे उभे राहील व भारताला कुणी विचारणार नाही. चीनची पाकमध्ये होणारी प्रचंड गुंतवणूक ही भारतासाठी मोठी डोकेदुखी आहे. भारताची कोंडी करण्यासाठी पाकसारखा उत्तम मित्र चीनला सापडला आहे. त्यामुळे नावेदसारखे एक दोन अतिरेकी सापडून आपण पाकीस्तानला धडा शिकवण्याचा विचार करत असू तर त्यासाठी भारताच्या राजनैतिक डावपेचांची कसोटी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: