- डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे आणि त्यानंतर आता डॉ. मल्लेशप्पा कलबुर्गी या ज्येष्ठ पुरोगामी विचारवंतांची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली आहे. या देशात हा नवीन काय प्रकार रूजू लागला आहे आणि विचारवंतांचे विचार दडपण्याची ही कुठली नवी प्रथा रूजते आहे असा प्रश्न यामुळे पडला आहे.
- कलबुर्गी हे अत्यंत विद्वान, पंडित होते. कन्नड शीलालेख, तसेच वचन साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. ‘मार्ग-४’ या संशोधनात्मक लेखांच्या संग्रहासाठी त्यांना २००६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. थोर संशोधक म्हणून त्यांची ख्याती होती. डॉ. नरेंद्र दाभोळकरांप्रमाणेच तेही अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचे खंदे पाठीराखे होते. अशा व्यक्तीची भ्याडपणाने हत्या होणे ही बाब अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे. त्यामुळे विचारांचा लढा विचारांनी देण्याच्या काळात तो अविचाराने देण्याचा जो प्रकार या देशात रूजतो आहे, राज्यात रूजतो आहे तो अत्यंत घातक असा आहे. पुरोगामी विचारांमुळेच त्यांची हत्या झाली, ही संपूर्ण देशाला लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे प्रतिगाम्यांची दहशत या देशात वाढत असेल तर हा नवा तालिबानचा प्रकार घडताना दिसत आहे असेच म्हणावे लागेल. हा दहशतवाद रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
- डॉ. दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्याप्रमाणेच कलबुर्गी यांना खुनाबाबतच्या धमक्या देण्यात येत होत्या. त्यांना काही काळ पोलीस संरक्षणही होते. मात्र अलीकडेच त्यांनी हे संरक्षण नाकारले होते. नेमकी ही संधी साधून अत्यंत भेकडपणाने येऊन, आपण विद्यार्थी आहोत, असे सांगून घरात शिरून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अतिशय उद्वेगजनक आणि आश्चर्यकारक अशी ही घटना आहे. याचा संपूर्ण देशाने निषेध केला पाहिजे. मात्र, कलबुर्गी यांच्या हत्येमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे प्रतिगाम्यांशी सुरू असलेला लढा हा केवळ महाराष्ट्र या एका राज्यापुरता मर्यादित नसून पुरोगामी विचारवंतांवर होणारे हल्ले आता इतर राज्यीय प्रकरण बनलेले आहे. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येनंतर हे प्रकार फक्त महाराष्ट्रात घडत आहेत असे वाटत होते, तो समज आता खोटा ठरत आहे. हा रोग स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूपेक्षा भयंकर वेगाने सर्व देशभर पसरत आहे, ही चिंतेची बाब आहे.
- अशा घटनांच्या मागे कोणीतरी ‘मास्टर माईंड’ आहे. त्याने एक हिटलिस्ट तयार केली असून त्यानुसार या गोष्टी सुरू आहेत हे निश्चित. त्यामुळेच आता केंद्र सरकारने सीबीआयसारख्या संस्थांच्या हातात हे प्रकरण देऊन हल्लेखोरांचा आणि त्यामागच्या सूत्रधारांचा शीघ्रगतीने शोध घेतला पाहिजे. तसेच राष्ट्रीय दहशतवादविरोधी पथकाने हे प्रकरण हाती घेतले पाहिजे. कारण हे प्रकरण दहशतवाद्यांचेच आहे. हे प्रतिगामी दहशतवादी आहेत. तेव्हा त्याची चौकशी सीबीआयमार्फत व्हायला हवी. हे जर फार मोठे जाळे वा षड्यंत्र असेल तर अशा तर्हेच्या घटना भविष्यातही घडत राहण्याची शक्यता आहे.
- ही गोष्ट लोकशाही देशासाठी चिंताजनक आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आता याची जबाबदारी घेतली पाहिजे. यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे. कलबुर्गी हे वचन साहित्यावरील महापंडित होते. कवी, नाटककार, समीक्षक आणि साक्षेपी इतिहासकार अशी त्यांची कर्नाटकात ख्याती आहे. कलबुर्गी यांनी काहीकाळ कर्नाटकातील हंपी विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषवले होते. वीरशैव पंथाबद्दलचा त्यांचा अभ्यास हा अत्यंत गाजलेला आणि जागतिक दर्जाचा आहे. त्यांनी याबाबत केलेल्या प्रयत्नांना कर्नाटक आणि महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळू लागला होता. त्यामुळे त्या पंथातील जी जुनाट विचारांची मंडळी आहेत त्यांना असे विचार सहन होत नव्हते. त्यांनी यापूर्वीही कलबुर्गी यांना त्रास दिला होता. त्यावर ‘माझ्या कुटुंबियांच्या जीवित रक्षणासाठी मी यापुढे वचन साहित्यावर काही लिहिणार नाही’ असे कलबुर्गी यांनी जाहीर केले होते.
- म्हणजेच तामिळनाडूमधील पेरुमल मुरुगन यांच्याबाबत जे झाले तेच कलबुर्गी यांच्या साहित्याबाबत घडले होते. मुरुगन यांनी ज्याप्रमाणे साहित्यिक मरण पत्करले होते तसेच कलबुर्गी यांनी केले होते. त्यामुळे हा दहशतवाद पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा आहे. हा झगडा फार जुना आहे. इतिहासाच्या प्रत्येक निर्णायक वळणावर एक गोष्ट निदर्शनास येते की, ज्या-ज्यावेळी पुरोगामी विचार जनमानसाची पकड घेऊ लागतात तेव्हा प्रतिगामी शक्ती अधिक अस्वस्थ होतात आणि हिंसाचाराचा मार्ग स्वीकारतात. पुरोगामी विचार मांडणार्या व्यक्तींचा किंवा संबंधित समूहाचा नाश करणे हे त्यांचे उद्दिष्ट बनते. गेल्या तीन वर्षांपासून भारतातही या प्रतिगामी शक्ती पुरोगामी शक्तींच्या वाढत्या प्रभावामुळे चिडून हिंसाचाराचा मार्ग निवडत आहेत. याला आळा घालण्याचे काम सध्याचे सरकार कसे करेल याबद्दल साशंकता आहे. त्यामुळेच आता देशातील पुरोगामी विचारांच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन एकत्रितपणे, संघटितपणे याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे. विवेकशील विचारांकडे नैतिकतेचा आणि मानवतेचा पाया असतो म्हणूनच असे विचार कधीच नष्ट होत नाहीत. माणूस वा व्यक्ती मारून विचार मरत नाहीत, तर पुरोगामी विचार हे पसरतच असतात. उलट अशा घटनांनंतर या विचारांना अधिक बळ येते ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आपण माणसाबरोबर त्याच्या विचारांचीसुद्धा हत्या करू शकतो या भ्रमात प्रतिगामी प्रवृत्तींनी राहू नये.
मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५
व्यक्ति मारून विचार मरत नाहीत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा