मंगळवार, ६ मे, २०२५

माध्यमांचे भारतीयीकरण गरजेचे


सध्याचा काळ हा ‘शाब्दिक हिंसाचाराचा’ काळ आहे. खूप आक्रमक, खूप बेलगाम वक्तव्ये आपल्याला वाहिन्यांवर दिसतात. असे दिसते की, टीव्ही न्यूज मीडियाने हे शब्द हिंसाचारासाठी आहेत, असा समज करून घेतलेला आहे. आमचे अँकर, ओरडून आणि पक्षांच्या प्रवक्त्यांना कोंबड्यांसारखे लढायला लावून पडद्यावरच सर्वकाही ठरवू इच्छितात. त्यापेक्षा वास्तव हे फार वेगळे असते. कोणत्याही वाहिनीवरील कोणताही टॉक शो, चर्चा ही त्यातून कोणताही निष्कर्ष न काढता केली जाते. फक्त वाद, भांडणे आणि चिखलफेक करणाºया वाहिन्या ही वाईट अवस्था आहे. ही भारतीय संस्कृती नाही. येथे कोणताही संवाद नाही, संभाषणही नाही. वाद आणि वादविवाद आहेत. हा निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा संवाद नाही, ते आक्रमकतेचे भयानक प्रदर्शन आहे.


वैयक्तिक आयुष्यात खूप मैत्रीपूर्ण असलेले राजकारणी आणि एकाच गाडीत बसून चॅनेलच्या कार्यालयात येणारे प्रवक्ते यांनी पडद्यावर निर्माण केलेली दृश्ये आपले सार्वजनिक जीवन किती कटुता आणि द्वेषाने भरलेले आहे हे दर्शवितात. परंतु पडद्यामागील सत्य वेगळे आहे. असे असूनही भारतातील सामान्य माणूस पडद्यावरील या नाटकाला सत्य मानतो. भांडखोर भारत असे आपले चित्र दिसते. माध्यमांचे हे जाळे तोडण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. वस्तुनिष्ठतेपासून दूर जाणारे माध्यम खूप भयानक बनत चालले आहे. त्याला कुठे तरी आवर घातला पाहिजे. त्यावर काही बंधने असली पाहिजेत. भाषेबाबत जागृकता करून दिली पाहिजे.

प्रश्न पडतो की, आपल्या माध्यमांच्या प्रेरणा काय आहेत, याचा आपण विचार केला पाहिजे? आपल्याला शक्ती आणि ऊर्जा कुठून मिळते? आपले संप्रेषण क्षेत्र कोणत्या मानकांवर उभे आहे? पाश्चात्य माध्यमांच्या मानकांवर आधारित आपल्या माध्यमांसाठी, नकारात्मकता, संघर्ष आणि वादाचे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. तर संवादाच्या परंपरेत संवादाद्वारे संकटांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या परंपरेत योग्य प्रश्न विचारणे ही देखील एक पद्धत आहे. प्रश्न निषिद्ध नाहीत, सर्वात मोठ्या समस्येवर उपाय म्हणजे प्रश्नांद्वारे शोधणे, मग ती मनाची, जीवनाची किंवा समाजाची समस्या असो. अशाप्रकारे प्रश्न आपल्याला सामान्य माहितीपासून ज्ञानाकडे प्रवास करायला लावत आहेत. आज ‘माहिती’ आणि ‘ज्ञान’ हे समानार्थी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सत्य हे आहे की ‘माहिती’ हे बातम्यांचे समानार्थीही नाही. कोणीही माहिती देऊ शकते. ती कुठूनही येऊ शकते. आजकाल सोशल मीडिया माहितीने भरलेला आहे. परंतु लक्षात ठेवा की, बातमीशी जबाबदारी जोडलेली आहे. कोणतीही माहिती संपादकीय प्रक्रियेतून गेल्यानंतरच बातमी बनते. म्हणून, संपादक आणि रिपोर्टर सारख्या संस्था सामान्य नाहीत.


आजकाल असे म्हणणे खूप फॅशनेबल आहे की, या युगात प्रत्येक व्यक्ती पत्रकार आहे. प्रत्येक व्यक्ती छायाचित्रकार आहे. प्रत्येक व्यक्ती संवादक, माहिती देणारा असू शकतो, तो पत्रकार कसा होईल? माझ्याकडे कॅमेरा आहे, मी छायाचित्रकार कसा होऊ शकतो? विशेष कौशल्ये आणि प्रशिक्षण आवश्यक असलेल्या विषयांना तुच्छ लेखण्याच्या आपल्या प्रयत्नांमुळे आपल्या माध्यमांचे किंवा संवादाच्या जगाचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रशिक्षण आणि किमान शैक्षणिक पात्रतेशिवाय माध्यमांमध्ये येणाºया गर्दीमुळे अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, माधवराव सप्रे यांसारख्या उच्चशिक्षित लोकांनी सुरू केलेली आणि समाजासाठी समर्पित पत्रकारिता आज कुठे आहे? भारत सरकारच्या विनंतीवरून, प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाने पत्रकारांची किमान शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यासाठी एक समितीदेखील स्थापन केली होती, नंतर त्या अभ्यासाचे काय झाले हे कोणालाच माहीत नाही.


समाजाचे हित सुधारणे आणि रस निर्माण करणे ही देखील माध्यमांची जबाबदारी आहे. वाचकांना आणि प्रेक्षकांना त्या काळातील ज्वलंत समस्यांबद्दल अपडेट ठेवणे आणि त्यांची बौद्धिक आणि नागरी जाणीव जागृत करणे हे माध्यमांचे काम आहे. तथापि, वाचकांच्या पसंतीच्या नावाखाली लेखन सामग्री कमी करण्याची स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा कठीण काळात, माध्यमांच्या जबाबदाºया आणि चिंतांवर चर्चा करणे खूप महत्त्वाचे आहे. नामांकित म्हणवणाºया काही प्रिंट मीडियाने साहित्य, कला, मानवनिर्मितीच्या सर्व प्रकारांना वर्तमानपत्रांमधून हद्दपार केले आहे. वृत्तवाहिन्यांचा तर त्याच्याशी दुरान्वयानेही संबंध नाही. भाषेकडे कोणी लक्ष देत नाही. ज्या शब्दांचे अर्थ माहिती नाहीत ते सर्रास वापरले जातात. एवढे भाषिक दारिद्र्य कशाने निर्माण झाले आहे याचा विचार केला पाहिजे. माध्यमे केवळ टीआरपीसाठी वाटेल त्या थराला जात आहेत. खरे तर त्यांनी राष्ट्रीय भावना आणि लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

जर पाहिले तर, समाजात पसरलेल्या अशांतता, स्पर्धा, इच्छा आणि संघर्षाच्या दरम्यान सकारात्मक मुद्दे विचारात घ्यावे लागतील. माध्यमे स्वत: अस्वस्थ आहेत आणि तीव्र स्पर्धेमुळे ते योग्य आणि अयोग्य निवडू शकत नाहीत. अशा परिस्थितीत स्वत:ला शांत करणे आणि संवादाच्या शुद्धतेवर काम करणे ही माध्यम कर्मचाºयांची जबाबदारी आहे. आपण जबाबदार माध्यम आहोत याचे भान राखणे आवश्यक आहे. वाहिन्यांवर बोलताना सभ्यता हद्दपार केली जात आहे, त्यावर कुठेतरी वचक असला पाहिजे. आक्रमक मीडिया ठिक असेल, पण भांडखोर माध्यमे ही परिस्थिती चांगली नाही. भारतीय सभ्यतेची ओळख कुठेतरी असली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: