शुक्रवार, २३ मे, २०२५

भासांचे नाट्यमय पंचरात्र


नाटक म्हटल्यावर आपल्याला सर्वात प्रथम आठवतात ते भास. संस्कृतमध्ये उत्तमोत्तम नाटकांची रचना ही भास यांनी केलेली आहे. प्रत्येक अभ्यासकाला भास यांच्या कलाकृती नेहमीच आकर्षित करतात. भासांच्या तेरा नाटकांपैकी एक तीन अंकी संस्कृत नाटक म्हणजे पंचरात्र. हे नाटक महाभारताच्या विराटपर्वावर आधारित नाटक आहे. आपल्याकडे संस्कृत आणि मराठीतही महाभारतावर विविध नाटके आलेली आहेत. मराठीत किचकवध, सौभद्र, मृत्युंजय अशी अनेक नाटके महाभारतातील कथानकांवर आली. सर्वच लेखकांना व्यासोच्छिष्ट असे लेखन करायला आणि त्यातील नाट्यमयता दाखवायची आवडत असते. भासांनी पण महाभारतावर आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यापैकी एक म्हणजे पंचरात्र.


या नाटकाची कथा म्हणजे द्युतात पराभूत झाल्यानंतर पांडव बारा वर्षांच्या वनवासाला गेले आहेत. तो संपल्यावर अज्ञातवासाचे एक वर्ष ते विराटाच्या नगरीत वेषांतर करून राहत आहेत. त्याच वेळी दुर्योधनाने यज्ञाला प्रारंभ केला आहे. यज्ञ संपल्यावर दुर्योधन यज्ञासाठी जमलेल्या राजांची भेट घेतो. या यज्ञात पृथ्वीवरील सर्व राजांनी कर आणून दिला आहे; परंतु एकट्या विराटाकडून मात्र काही आलेले नाही. तसेच तो यज्ञातही सहभागी झाला नाही. तेव्हा शकुनी त्याला सांगतो की, विराटाकडे दूत पाठवला आहे, तो परतीच्या वाटेवरच असेल. यावेळी दुर्योधन द्रोणाचार्यांना दक्षिणा मागण्याची विनंती करतो. बराच आग्रह केल्यावर ते म्हणतात की, मला स्वत:ला कशाचीही इच्छा नाही, पण तुला काही दक्षिणा द्यायचीच असेल तर बारा वर्षे वनात भटकणा‍ºया पांडवांना त्यांचा हिस्सा दे. यावर शकुनी रागावतो आणि हे होणार नाही असे सांगतो. मग द्रोणाचार्यही संतप्त होतात; परंतु भीष्म त्यांना शांत करतात. दुर्योधन, शकुनी व कर्ण यांच्याशी सल्ला मसलत करतो. शकुनी सल्ला देतो की, जर पाच रात्रींच्या आत पांडवांचा ठावठिकाणा लागला आणि ते समोर आले तर आम्ही त्यांना त्यांचा हिस्सा द्यायला तयार आहोत असे सांग. सुरुवातीला द्रोणाचार्य ही अट मान्य करायला तयार होत नाहीत; परंतु तेवढ्यात तिथे विराटाच्या नगरीला पाठवलेला दूत बातमी घेऊन येतो की, विराटाचे नातेवाईक असणा‍ºया शंभर कीचक भावांना कोणीतरी नुसत्या हातांच्या प्रहारांनी एका रात्रीत मारले म्हणून दु:खामुळे विराट राजा यज्ञप्रसंगी आला नाही. हे ऐकून भीष्मांना खात्री होते की हे भीमानेच केलेले आहे आणि ते द्रोणाचार्यांना दुर्योधनाची अट मान्य करायला सांगतात. यज्ञात न आल्यामुळे आणि अगोदरच असलेल्या शत्रुत्वामुळे विराटाचे गोधन पळवण्याचा सल्ला भीष्म कौरवांना देतात. द्रोण याला विरोध करतात पण भीष्म त्यांना समजावतात की, विराटाच्या बाबतीत कृतज्ञता म्हणून पांडव गोधनाच्या रक्षणासाठी पुढे येतील. कौरव भीष्मांचा सल्ला ऐकतात आणि विराटाच्या गोधनावर हल्ला करतात.

या नाटकात दुस‍ºया अंकाची सुरुवात होते, तेव्हा कौरवांनी गोधन पळवले आहे. त्याच दिवशी विराटाचा जन्मदिवसही आहे. स्वत: विराट गोधनाच्या रक्षणासाठी जायला तयार होतो. तेव्हा तो भगवान नावाच्या ब्राह्मणाला गोधन हरणाचा वृत्तांत सांगतो. भगवान ब्राह्मण म्हणजेच वेषांतर केलेला युधिष्ठिर आहे. विराट रथ तयार करण्याची आज्ञा देतो पण तेव्हा त्याला समजते की, राजकुमार उत्तर रथ घेऊन शत्रूला पराभूत करण्यासाठी गेला आहे आणि त्याचे सारथ्य बृहन्नला करत आहे. बृहन्नला म्हणजेच वेषांतर केलेला अर्जुन आहे. तेवढ्यात एक सैनिक येऊन बातमी देतो की, राजकुमार उत्तराने आपल्या बाणांनी शत्रूला पळवून लावले आहे; परंतु शत्रूंपैकी एकटा अभिमन्यू हार न मानता लढतो आहे. विराट बृहन्नलेच्या वेषातील अर्जुनाला सभेत बोलावतो आणि त्याला युद्धाचा वृत्तांत विचारतो. तेवढ्यात बल्लव आचारी बनून राहणारा भीम अभिमन्यूला पकडून आणतो. अभिमन्यू विराटाला म्हणतो की, तुम्ही जर मला पकडलेत तर माझे मध्यम-पिता भीम मला बाहुबलाने सोडवतील. तेवढ्यात राजकुमार उत्तर तेथे येतो व सांगतो की, हा विजय माझ्यामुळे नाही तर बृहन्नला बनलेल्या अर्जुनामुळे मिळाला आहे. अशाप्रकारे अर्जुन, भीम व युधिष्ठिर हे आपल्या ख‍ºया स्वरूपात येतात. विराट त्यांना पुन्हा गुप्त वेष घ्यायला सांगतो, तेव्हा युधिष्ठिर सांगतो की अज्ञातवासाचा कालावधी संपला आहे. विराट आपली मुलगी उत्तरा हिचा अर्जुनाशी विवाह करून देण्याची इच्छा व्यक्त करतो. मात्र अर्जुन तिचा विवाह मुलगा अभिमन्यूशी लावून देतो.


या नाटकातील तिस‍ºया अंकात सूत कौरवांकडे येतो आणि अभिमन्यू पकडला गेल्याची बातमी देतो. हे ऐकून भीष्म, द्रोण, कर्ण वगैरे अस्वस्थ होतात; परंतु शकुनी त्यांना सांगतो की, पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या भीतीने विराट त्याला सोडून देईल. सूत पुढे सांगतो की, कोणीतरी चालत येऊन अभिमन्यूला पकडून घेऊन गेला. आपल्या केवळ हातांनी घोड्यांचा वेग थांबवून तो रथात चढला आणि त्याने अभिमन्यूला पकडले. यावर भीष्म म्हणतो की, हे काम नक्कीच भीमाचे आहे. द्रोणांनाही तसेच वाटते. शकुनी चिडून म्हणतो की या जगात फक्त पांडवच तेवढे शक्तिशाली आहेत असे नाही, दुसरा कोणीतरी वीर असू शकेल. तेव्हा सूत ध्वजात अडकलेला बाण आणतो, त्यावरही अर्जुनाचे नाव आहे. शकुनी म्हणतो की हा कोणत्या तरी दुस‍ºया अर्जुनाचा बाण असेल. दुर्योधन म्हणतो, जर तुम्ही युधिष्ठिराला आणलेत तर मी त्यांचे राज्य त्यांना देईन. त्याच वेळी विराटनगराहून राजकुमार उत्तर येतो आणि सांगतो की, धर्मराजाने सांगितले आहे की, उत्तरा मला सून म्हणून लाभली आहे, तर तिचा आणि अभिमन्यूचा विवाह इथे करायचा की तिकडे? शकुनी लगेच उत्तर देतो की तिकडे. तेव्हा द्रोणाचार्य दुर्योधनाला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण करून देतात. पाच रात्री पूर्ण होण्याआधी त्यांचा ठावठिकाणा लागला आहे. त्यावर दुर्योधन पांडवांना त्यांचे राज्य देतो.

हे नाटक महाभारताच्या विराटपर्वावर आधारलेले आहे. कीचकाला मारण्याचे काम भीमाखेरीज इतर कोणालाही जमणार नाही या महाभारतातील कथेचा संदर्भ घेऊन भासाने पंचरात्र हे नाटक रचले आहे. असे असले तरी भासाने यात थोडे पण लक्षणीय बदल केले आहेत. महाभारतातील युधिष्ठिराचे अज्ञातवासातील नाव कंक असे आहे तर पंचरात्रातील त्याचे नाव भगवान असे ठेवले आहे. पंचरात्रमध्ये विराटाच्या गाई पळवण्यासाठी अभिमन्यू गेलेला दाखवला आहे; परंतु महाभारतात मात्र या प्रसंगाच्या वेळी अभिमन्यू द्वारकेत असल्याचा व युद्धात सहभागी झाला नसल्याचा उल्लेख आहे.


कथानकात गरजेप्रमाणे बदल करणे हे भासांचे वैशिष्ट्य या रुपकात विशेषत्वाने जाणवते. अर्थात हे त्या काळात केले म्हणून मान्य केले. आजकाल सिनेमेटीक लिबर्टीवर इतकी टीका होत असते की, असे कथानकातील बदल करण्याचे धाडस कोणी करू शकणार नाही. अर्थात पंचरात्रचे संपूर्ण कथानकच काल्पनिक आहे. युधिष्ठिरादी पांडव पाच दिवसांत समोर आल्यावर दुर्योधनाने त्यांना त्यांच्या वाट्याचे राज्य दिले हे पंचरात्रचे मुख्य कथानकच महाभारतात नाही. पंचरात्र हे समवकार किंवा व्यायोग या प्रकारचे रूपक आहे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. अर्थात नाटक हे खोटे असते. त्यामध्ये खºयाची अपेक्षा न करता नाटक म्हणूनच पाहायचे असते हे तर नाटकाचे खरे सूत्र आहे. त्यामुळे कथानकातील असा बदलही क्षम्य आहे असे नाही तर तो कौतुकास्पद आणि कल्पक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा


९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: