- दुधानं तोंड पोळल्यामुळं ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळं जिभेवर नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक बोला, असा महत्त्वाचा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना नुकताच दिला. हा देताना त्यांनी स्पष्टपणे कबूली दिली की, जीभेवरचं नियंत्रण सुटल्यामुळेच माझं वाटोळं झालं. आपलं बार्शीचं भाषण शिराळ्यात खूप गाजलं. महाराष्ट्रभर भाषण गाजलं. आपण कधी कधी लोक हसायला लागल्यानंतर, बोलणर्यालाही वाटतं की, चला, लोक हसतायेत, तर अजून हसवावं. पण नंतर मग हसवता हसवता, त्यालाच रडायची पाळी येते. पण अजितदादांचे वक्तव्य हे काही फक्त त्यांच्याच कार्यकर्त्यांना लागू नाही तर सर्वच पक्षातील नेत्या कार्यकर्त्यांनी त्याचा बोध घेतला पाहिजे.
- आज अशीच रडायची पाळी आता एकनाथ खडसे यांच्यावर आली आहे. म्हणजे जिभेवर नियंत्रण नसेल तर त्याचा कधी कधी फटका लगेच बसतो तर कधी कधी उशिरा बसतो. पण बसतो हे नक्की. तसा खडसेंना थोडा उशिरा पण जोरका झटका धीरे से लगे असे झाले आहे. दीड वर्षांपूर्वी मंत्री झाल्यापासून त्यांनी आपली जीभ सैलच सोडली होती. कधी जातीवादाचा आधार घेत आपल्यावर अन्याय झाला म्हणून कांगावा केला तर कधी विठ्ठलाच्या दारात जाऊन पंढरपुरात त्याचा पंचनामा केला. पण या घसरलेल्या जिभेमुळे झालेल्या संचित कर्माचे हे फळ आहे हे लक्षात घेतलेच पाहिजे.
- मंत्रीपदाचा राजीनामा देऊन एकनाथ खडसे घरी गेले आहेत. त्यांचे जाणे ठरलेलेच होते. या कालच्या पोराला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय कळतेय! मी म्हणजेच सरकार असे जळगावच्या नाथाभाऊंना वाटत होते. डॉमिनेटइजम करून सतत मुख्यमंत्र्यांना कमी लेखण्याचा त्यांच सतत प्रयत्न राहिला. कधी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार केला. त्यामुळे अडचणीत आल्यावर खडसेंच्या पाठीशी राहण्यास कोणी तयार होईना.
- नितीन गडकरी यांनी दिल्लीचा निरोप नाथाभाऊंना देण्याचे काम तेवढे केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ खडसे निष्कलंक व निर्दोष असल्याचा राग आळवीत होते. पण दिल्लीश्वरांच्या निर्णयाने दानव्यांचे मतही उलटे पडले. प्रश्न इतकाच आहे की, रावसाहेब दानव्यांपासून संपूर्ण भारतीय जनता पक्षाला वाटत होते की, खडसे यांच्यावरील आरोप साफ खोटे आहेत. हा त्यांच्याविरुद्धचा बनाव आहे. त्यांचे सरळ सरळ चारित्र्यहनन आहे. खडसे यांच्या निर्दोषत्वाचा घंटानाद करण्यासाठी मुख्यमंत्री पुढे का सरसावले नाहीत या काही किरकोळ शंका राज्याच्या निष्कपट जनतेच्या मनात जरूर आहेत.
- खडसे यांचे तथाकथित ‘पीए’ गजानन पाटील यांना एका जमीन व्यवहारात ३० कोटींची लाच मागताना पकडले, तेही मंत्रालयाच्या दारात. सहा महिन्यांपासून हे गजाननराव एसीबीच्या रडारवर होते. त्याची साधी खबरही चाणाक्ष खडसेसाहेबांना नव्हती. यातून गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांची गोपनीय कार्यपद्धती लक्षात येते.
- म्हणजे विरोधी पक्षनेते असताना खडसे यांनी भल्याभल्यांवर पाळत ठेवून शिकार केली. पण स्वत: खडसे यांची शिकार कधी झाली ते त्यांना समजलेच नाही. एमआयडीसीची पुण्यातील जमीन रद्दीच्या भावात नातेवाईकांच्या नावावर खरेदी करण्याची ‘जादू’ खडसे यांनी करून दाखवली. याच काळात हप्तेबाजीचे आरोपही खडसेंवर झाले.
- ‘‘आरोप करणार्यांकडे पुरावे नाहीत, एकतरी पुरावा द्या, राजकारण सोडेन’’ अशी भाषा खडसे यांनी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात असलेले छगन भुजबळसुद्धा ओरडून ओरडून तेच सांगत आहेत. ‘आदर्श’ इमारतीच्या घोटाळ्यात गुन्हेगार ठरवलेल्या अशोक चव्हाण यांचे तेच सांगणे आहे. घरकुल घोटाळ्यात खडसेकृपेने तुरुंगात असलेले सुरेशदादा जैन हेसुद्धा निर्दोष असल्याचेच सांगत आहेत. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा हेदेखील त्यांच्यावरील आरोपांबाबत, ‘‘निर्दोष आहे; पुरावे द्या’’ असे ओरडून सांगत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप करून खडसे यांनी भल्याभल्यांना कायमचे घरी पाठवले. मात्र आपल्या बोबड्या मराठी बोलीतून इतरांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे फडकवणारे किरीट सोमय्या या सर्व प्रकरणात मौन बाळगून होते. निदान खडसे निर्दोष असल्याचे पुरावे तरी त्यांनी द्यायला हवे होते. म्हणजे या आरोपांचे पुरावे नाहीत हे सिद्ध करण्यासाठी भाजप आणि खडसे यांच्याकडे पुरावे नाहीत. पण तोंडातली जिभ मात्र घसरणे कायम सुरूच आहे. मीडिया ट्रायल झाल्याने जावे लागले असे खडसे यांना वाटते. हा त्यांच्या स्वभावानुसार जिभ घसरण्याचाच प्रकार आहे.
- दोन वर्षांपूर्वी शिवसेनेबरोबर युती तोडण्याचा निर्णय आपणच कसा हिमतीने कळवला या कृतीचा अभिमान खडसे यांच्या चेहर्यावर शेवटपर्यंत दिसत होता. असूरी आनंद म्हणतात तो प्रकार होता. केवळ मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून त्यांनी तेव्हा अशी वक्तव्ये केली होती. जिभ घसरली. दुसरे काय?
बुधवार, ८ जून, २०१६
जीभ घसरल्याचे संचित फळ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा