- एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा राजिनामा देऊन प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या अपेक्षेइतका त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे बहुजन किंवा जातीयवादाचा विषय काढून आपल्यावर ही कारवाई करण्याचा प्रकार झाला हे बिंबवण्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. नारायण राणे यांनी थोडी पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तरी नंतर त्यांनी आपले वक्तव्य बदलून सारवासारव केली. पण राजीनामा देताना खडसेंनी पक्षाचे धोरण, अडवाणी प्रकरण, गडकरी प्रकरणांचा विषय काढून आपले चारित्र्य स्वच्छ असल्याचा जो देखावा केला तो केविलवाणा ठरला.
- खडसेंच्या राजिनाम्यानंतर त्यांच्या अटकेची व खटल्याची मागणीही जोर धरू लागली आहे. अर्थात कुठल्याही व्यक्तीवर खटला भरण्यासाठी तपास चौकशी व भरभक्कम पुरावेही हाताशी असावे लागतात. तितके सज्जड काही कोणाच्या हाती आलेले नाही. पण खडसेंच्या जाण्याने फार दु:ख किंवा आश्चर्य व्यक्त केले गेले नाही. किंबहुना छगन भुजबळ यांच्या दोन महिन्यांपूर्वीच्या अटकेनंतर ते सत्तेत नसतानाही खळबळ माजली. पण खडसे यांना तेवढा हंगामा करता आला नाही.
- राजकारण व न्यायप्रक्रिया दोन भिन्न गोष्टी आहेत. राजकारणात प्रतिमेला व प्रतिष्ठेला मोठी किंमत असते. म्हणूनच आरोपाचे पुरावे नसले तरी प्रतिष्ठा जपण्यासाठी तडकाफ़डकी राजिनामे दिले जातात. त्याला गुन्ह्याची कबुली ठरवून न्यायालयाचे दार ठोठावता येत नसते. तिथे कायद्याच्या कसोटीवर आरोप सिद्ध करून दोषी वा निर्दोष ठरवले जात असते. सहाजिकच ज्याच्याकडे पुरावे असतील, तोच न्यायालयात धाव घेऊ शकतो. छगन भुजबळ प्रकरणात असे पुरावे असतानाही चौकशीच्या पुढे काही हालचाल झाली नाही, तेव्हा अंजली दमानिया यांनी कोर्टात धाव घेतली होती आणि भुजबळांना कुठलेही सरकार संरक्षण देऊ शकले नाही. तशी कुठलीही वेळ खडसे यांच्यावर आज तरी आलेली नाही.
- या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहेच. परंतु राजिनामा देताना खडसेंनी अडवाणी आणि गडकरी यांचा केलेला उल्लेख फार महत्वाचा आहे. साधारणपणे निवडणुका जवळ आल्यावर वा नेत्यांच्या उच्च पदावर जाण्याच्या वेळी असे आरोप होत असतात. हे खडसेंनी अधोरेखीत करताना या दोघांचा उल्लेख केला आहे. २० वर्षांपूर्वी जैन डायरी नावाचा प्रकार गाजू लागला. तेव्हा १९९६ च्या लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजू लागले होते. अशावेळी ज्यांची नावे त्या डायरीत होती, त्यांना लाचखोर मानले गेले आणि गदारोळ सुरू झाला. अडवाणींचे नेतृत्व ऐन भरात होते आणि आपल्या चारित्र्याची ग्वाही देण्यासाठी त्यांनी त्यातून मुक्त होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही, अशी गर्जना करून टाकली होती. अखेरीस त्यात अडवाणी सफ़लही झाले. त्यांच्यासह इतरांनाही त्या आरोपातून मुक्त करण्यात आले. आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचा निर्वाळा कोर्टानेच दिलेला होता. त्यासाठी स्वत: अडवाणी कोर्टत गेलेले होते.
- अर्थात खडसे यांच्यावर नुसते आरोप झाले आहेत आणि कुठल्याही कोर्टात गुन्हा दाखल झालेला नाही. खुद्द खडसेही कुठल्या कोर्टात जाऊन आपली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी आग्रही होताना दिसलेले नाहीत. म्हणूनच अडवाणी यांच्यावरील आरोपाचा उल्लेख त्यांनी कशाला केला असा प्रश्न पडतो. पण त्यामुळे ते अधिकच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या स्वच्छ चारित्र्यासाठी दुसर्यांच्या प्रकरणाची तुलना करणे योग्न नव्हते.
- इथे फरक हा आहे की, अडवाणी यांना पद सोडण्याचा वा निवडणूकीपासून दुर रहाण्याचा आग्रह कोणी केला नव्हता. तो स्वयंभूपणे त्यांनीच घेतलेला निर्णय होता. उलट खडसे राजिनामा देण्यासाठी दबाव आला. या दबावातून वाचवण्यासाठी पक्षातूनही कोणी पाठीशी उभे राहिले नाही. त्यानंतर खडसेंनी नैतिकतेचा आव आणलेला आहे. म्हणून आपल्यावरील आरोपाची त्यांनी अडवाणींशी तुलना करण्यात अर्थ नाही.
- अडवाणींप्रमाणेच नितीन गडकरी यांच्यावरील आरोपांचाही उल्लेख खडसे यांनी केला आहे. योगायोग असा, की तोही आरोप करण्यात अंजली दमानियांचा पुढाकार होता. त्याविरुद्ध गडकरींचा बचाव करण्यात विरोधी नेता असलेले नाथाभाऊ आघाडीवर होते. गडकरींनी तेव्हा दमानियांसह केजरीवाल यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता. त्यात केजरीवाल यांना दोन रात्री तुरूंगात काढाव्या लागल्या होत्या. त्यानंतर गडकरींनी पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा दिलेला होता. अगदी कॉग्रेसच्या हाती सत्ता असतानाही गडकरींच्या विरोधात काहीही सिद्ध करण्यापर्यंत कोणी जाऊ शकले नाही. खडसे यांनी आरोप सुरू झाल्यावर त्याचे खुलासे देण्यापेक्षा नुसतेच इन्कार केले. कुठलाही आरोप खोडून काढण्याचा प्रयत्नही केलेला नाही. हेच खडसेंचे चुकत गेले. एक आरोप फ़ेटाळला मग नवा आरोप होत राहिला व आधीचा खुलासा खोटा पडत राहिला आहे. असे गडकरी यांच्या बाबतीत झालेले नव्हते. साहजीकच गडकरींबरोबरही त्यांनी तुलना करणे चुकीचे आहे. वास्तविक पाहता समोर येऊन खडसेंनी ठामपणे आरोपाचे खंडन करायला हवे होते. पुरावे खोटे पाडायला हवेत.
बुधवार, ८ जून, २०१६
केविलवाणा देखावा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा