बुधवार, ८ जून, २०१६

योनीसुचितेबाबत साशंकता घातकच

  •   
  • कौमार्य परीक्षेत विवाहित महिला उत्तीर्ण न झाल्याने तिला दोषी ठरवत पतीने तिला लग्नानंतर दोनच दिवसांत माहेरी पाठवून नांदवण्यास नकार दिला. ही घटना आहे, महाराष्ट्रातील संगमनेर येथील. पुरोगामीपणाचा टेंभा मिरवणार्‍या महाराष्ट्रात ही घटना घडल्याने त्याला अधिक महत्व येते. भारत विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करत आहे. तरीही अजूनही मंदिरात महिलांना प्रवेशासाठी संघर्ष करावा लागत आहे. पंचायतींकडून सहजच विवाह मोडले जातात. त्याला कारण तसे क्षुल्लकच असते. त्याचप्रमाणे योनीसुचितेबाबत शंका उत्पन्न करून लग्न मोडण्याचा प्रकार होणे, मुलीला माहेरी परत पाठविणे हा प्रकार अत्यंत क्लेशदायक आहे.
  •    संगमनेर येथील घटनेतील कारणही याच प्रकारात मोडणारे आहे. पण एका छोटयाशा कारणामुळे एका मुलीला पुन्हा माहेरी पाठवण्यात आले. तिचा दोष हाच होता की ती लग्नानंतरच्या कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण झाली नाही. किती भयंकर प्रकार आहे हा? ही परिक्षा कोणी घ्यायची आणि त्यावर कसा विश्‍वास ठेवायचा? त्याहीपेक्षा ही परिक्षा घ्यायचीच का? महिलांच्या चारित्र्याबाबत असा संशय घेण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला आहे? मग कौमार्य फक्त महिलांचे तपासायचे आणि पुरूष काय सगळीकडे शेण खाऊनही कुमार, पवित्र असतो का? अत्यंत चुकीचा प्रकार आहे हा.
  •        लग्न हा भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. विशिष्ट वय झाल्यानंतर उपवरांचे लग्न लावून देण्यात येते. मुलगी सुस्वरूप हवी, ती कामसू असावी, अशी अनेक मुलांची अपेक्षा असते. त्यातच ती ‘व्हर्जिन’(कुमारी) असावी ही मुख्य अट असते. त्यातूनच मग अशा घटना घडत असतात. मुळात वयात आल्यानंतर कौमार्य परीक्षा वगैरे अनिष्ठ नाहीतर धोकादायक प्रथा निर्माण होत आहेत. स्त्रीमधील स्त्री सुलभ अवयव विकसीत झाल्यानंतर ती विवाहयोग्य होते, असे आपल्याकडे मानले जाते. त्यानंतर यथाशक्ती तिचा विवाह योग्य वर पाहून लावून दिला जातो. अनेकदा स्पर्धेच्या युगात स्त्रीयाही पुरूषांसारखेच अंगमेहनतीचे, कसरतीचे कामे करतात. यात त्यांच्यात काही बदल झाल्यास त्यामुळे ती चारित्र्यहीन कशी ठरू शकते? हाच नियम पुरुषांना का लावला जात नाही, याचे कोडे अद्यापही सुटलेले नाही.
  •    रूपवान, चारित्र्यसंपन्न स्त्री आपली पत्नी म्हणून पाहिजे, असे म्हणणारे अनेक पुरूष विवाहापूर्वी व्हर्जिन असतात का? हा खरेतर संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण त्याकडे दुर्लक्ष करीत विशिष्ट भागांभोवतीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांमध्ये आपली मानसिकता अडकली जाते. ही मानसिकता आता बदलायला पाहिजे.
  •    योनीसुचिता या मानसिकतेभोवती समाजमन अजूनही रूंजी घालत असल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असतात. ग्रीक लोककथांमध्ये तरुणीचे कौमार्य भंग पावू नये म्हणून त्या विशिष्ट भागाभोवती संरक्षण जाळी लावली जायची. ही प्रथा तर रानटी स्वरूपाचीच होती. काही समाजात या विशिष्ट अवयवांवर ब्लेड फिरवण्याची अधोरी प्रथा सुरू होती. मध्यंतरी काही महिलांनी त्याविरोधात आवाजही उठवलेला होता. अशा पध्दतीने या रानटी प्रथा, परंपराविरोधात लढण्याची गरज आहे.
  • जातपंचायत हा प्रत्येक धर्मातील एक दुर्गुण ठरत आहे. या जात पंचायतींच्या साक्षीने हा कौमार्य परीक्षेचा घाट घालण्यात आला होता. एकेकाळी भारतात घटना अस्तित्वात नव्हती तेव्हा समाजात अनाचार माजू नये, यासाठी जात पंचायतीचे नियोजन करण्यात आले होते. पण काळानुरूप या जात पंचायती स्वत:ला श्रेष्ठ मानू लागल्या. त्यांच्याकडून येणारे निर्णयच ग्राह्य धरावे लागतील, अशी मानसिकता बळावू लागली. त्यातूनच मग दुसर्‍या जातीत लग्न करणार्‍या मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकणे असो, कौमार्य परीक्षा असे प्रकार वाढीस लागलेले आहेत. कुठेतरी हे प्रकार थांबणे गरजेचे आहे.
  •     काळ ज्या पध्दतीने बदलतो त्याप्रमाणे त्या त्या काळातील रूढी-परंपरा कालबाह्य होत जातात. पण त्याच रुढी,परंपरा यांना कुरवाळत राहिलो तर हाती काहीच येणार नाही. येईल तो मनस्ताप, दु:ख. कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण न झालेली ही महिला शिक्षित आहे. तिने नवर्‍या मुलाचे अगोदर लग्न झालेले असतानाही त्याला स्वीकारले. हा तिचा त्याग बाजूला ठेवत थेट कौमार्य परीक्षेत अनुतीर्ण झाल्यानंतर घरची वाट धरावी लागत असेल तर त्यासारखे दुर्दैव्य ते कोणते?  गुणवत्ता किंवा कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. अशावेळी योनीसुचितेच्या नावाखाली त्यांना कमी लेखणे हा प्रकारच विकृत मानसिकतेचा आहे. तो थांबलाच पाहिजे. अशा प्रकारचे कौमार्य परिक्षा घेणारे स्वत:ला धर्मराज म्हणवतात की धर्मराजाचे पुत्र की बाप? आपली होणारी पत्नी ही कुंतीसारखी आहे अशी शंका मनात येत असेल तर लग्न या प्रथेचाच अर्थ उरत नाही. लग्न म्हणजे सर्वोच्च पातळीवर टाकलेला विश्‍वास. असा विश्‍वास की ज्यामध्ये विश्‍वासघाताला थारा नसतो. असे असताना कौमार्याची परिक्षा देणे घेणे हे महिलांवर अन्याय करणारे आहे. काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसचे एक बडे नेते एन डी तिवारी यांच्यावर डीएनए चाचणी करून पितृत्व स्वीकारण्याची वेळ आली होती. सातार्‍यातील एका केमिस्टबाबतही असा प्रकार घडला होता. त्या घटनांमध्ये फसवणूक आणि परिस्थितीचा गैरफायदा घेतला गेल्याचे दिसून आले होते. पण त्यामुळे अनेक संसार अशा विचारातून उद्ध्वस्त होत असतात हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा अशा चुकीच्या प्रथांवर तातडीने बंदी घातली पाहिजे. नंतर त्या मुलाने माफी मागीतली असली तरी आता त्या मुलीने त्याला नाकारले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: