बुधवार, ८ जून, २०१६

स्वस्तातल्या प्रसिद्धीसाठी


 स्वस्तात आणि कमी वेळेत प्रसिद्धी मिळवून चर्चेत रहायचे असेल तर मोठ्या व्यक्तिंवर टिका करा किंवा काहीतरी अचरटासारखे करा असा ट्रेंड गेल्या पाच वर्षात अगदी यशस्वी झाला आहे. कॉंग्रेस आणि भाजपवर आणि आता सातत्याने मोदींवर टिका करणारा आप पक्ष हा त्यातील एक नमुना आहे. सुमार पत्रकारीता करून आपण खूप पुरोगामी आहोत असे दाखवून तत्ववेत्त्याचा आव आणणारे निखिल वागळे, केतकर यांनीही प्रसिद्धीसाठी तोच मार्ग निवडला. पूनम पांडेसारखी मॉडेल, राहूल महाजन अशा अनेकांनी वेगळ्या मार्गानेच हा प्रकार केला. त्याच मार्गाने नवा भटुरडा गेल्या काही दिवसांपासून वळवळत आहे. ‘टवाळा आवडे विनोद’ या समर्थांच्या वचनाची प्रचिती हल्ली सोशल मीडियाच्या जमान्यात जागोजागी येत असते. विनोदाचा वापर हा निखळ आनंदाऐवजी टवाळकी करण्यासाठी करण्याचा प्रकार होताना दिसत आहे. काही जण तर त्याही पुढे जात पातळी सोडून इतरांवर चिखलफेक करतात आणि ‘बदनाम हुए तो क्या, आखिर नाम तो हुआ’ अशा प्रकारचा विकृत आनंद मिळवितात.    स्वत:ला कॉमेडियन म्हणवून घेणार्‍या तन्मय भट्ट याने सोशल मीडियावर पसरवलेला लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या संदर्भातला सध्या चर्चेत असलेला ताजा व्हिडिओ नेमक्या याच मनोवृत्तीतून आलेला आहे. खरे तर अशा अत्यंत थिल्लर घडामोडी एरवी दखल घ्यायच्याही लायकीच्या नसतात. परंतु लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर अशा दोन भारतरत्नांमधल्या काल्पनिक संभाषणाच्या नावे तन्मयने केलेला उपद्व्याप हा अक्षम्य ठरतो. नावाचा उल्लेखदेखील जाहीरपणे पूर्णांशाने करता येऊ नये, असा एक ग्रुप एआयबी नामक आद्याक्षरांनी कार्यरत आहे. पातळी सोडून कुचाळक्या करणे हेच या मंडळींचे काय ते कार्य. या ग्रुपचा सदस्य असलेल्या तन्मयने सोशल मीडियावर टाकलेला हा वादग्रस्त व्हिडिओ लगोलग व्हायरल झाला आणि मग त्यावरून सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठू लागली. किळसवाणा एवढ्याच संज्ञेत मोडणारा हा व्हिडिओ टीकेचा धनी झाला नसता तरच नवल होते. फेस स्वॅप ऍपच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत सचिन आणि लतादीदी यांचे मुखवटे बनवून त्यावर उभयतांतील काल्पनिक संवादाचा बनविलेला व्हिडिओ तन्मयची बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करणारा आहे.      वर्षानुवर्षे प्रसिद्धीच्या शिखरावर राहूनही दीदी अथवा सचिन यांनी डोक्यात हवा जाऊ दिलेली नसल्याने त्यांच्या सुसंस्कृतपणाचे दाखले नेहमी दिले जातात. असे असताना उभयतांच्या संवादा दरम्यान अश्लीलता आणि कमरेखालच्या विनोदांची पेरणी करून तन्मयने केलेला वाह्यातपणा संतापजनकच.   गेल्या वर्षीदेखील याच एआयबीच्या एका कार्यक्रमादरम्यान रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि करण जोहर यांच्यावर टीकेची झोड उठून यंत्रणेला संबंधितांवर समन्स बजावण्याची वेळ आली होती. त्यानंतर हा व्हिडिओ गुगल, यूट्यूब वगैरेवरून काढून टाकण्यात आला होता. आताही नेमकी त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याने हा सगळा उपद्व्याप अधिकच गंभीर ठरतो. म्हणजे केवळ वादंग निर्माण करून त्याच्या आड येनकेन प्रकारे स्वत:ची प्रसिद्धी करून घ्यायचा हा डाव आहे. तेव्हा अशा प्रसंगी एकुणात समाजाने त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे असते. कारण अशा बाबतीत जेवढ्या अधिक आणि तीव्र प्रतिक्रिया उमटतात तेवढा ती कृती करण्यामागचा उद्देश सफल होत जातो. हे प्रकरणसुद्धा आता नेमक्या त्याच दिशेने चालले असल्याचे राजकीय पातळीवरून त्याला सुरू झालेल्या विरोधानंतर दिसून येते.    समाजात घडणार्‍या कोणत्याही घडामोडीचा आपल्या लाभासाठी कसा वापर करून घ्यायचा यावर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो. त्यानुसार तन्मयच्या या वादग्रस्त व्हिडिओच्या निमित्ताने भाजप, शिवसेना आणि मनसे हे पक्ष सरसावले आहेत. सध्या कोणताच मुद्दा हाती नसलेली मनसे त्यात अधिकच आक्रमक झाली आहे. अन्य काही नाही तरी किमान अशा प्रकरणांतून का होईना, चर्चेत तर राहू, असाच त्यामागचा आविर्भाव आहे. सेना आणि भाजपचेही काही फारसे वेगळे नाही. हे दोघे सत्ताधारी असल्याने त्यांनी निषेध वगैरेचे देखावे करण्यापेक्षा अशा प्रवृत्तींविरोधात शक्य तेवढी कठोर पावले उचलायला हवीत. तसे झाले तरच अगोदर प्रमाद करून वर घडल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यासदेखील खळखळ करणार्‍या तन्मयसारख्या प्रवृत्तींना काही प्रमाणात का होईना आळा बसू शकतो. लतादीदी आणि सचिन यांनी मात्र या सार्‍या प्रकाराला अनुल्लेखाने मारणेच पसंत केले आहे. त्यातून त्यांचा मोठेपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. तन्मय भटुरड्या सारख्यांच्या काही तद्दन फालतू प्रकारांनी विनोदाचे क्षेत्र अल्प काळ ढवळून निघत असले तरी अंतिमत: त्यामुळे उच्च दर्जाच्या विनोदाची निकड अधिकच तीव्रतेने जाणवू लागते हे निश्चित. पण हे सगळं सवंग आणि स्वस्तातल्या प्रसिद्धीसाठी आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: