खडसेंनी महाराष्ट्राला केले दुष्काळमुक्त
- गेले पंधरा दिवस जोरदार चर्चेत असलेले खडसे प्रकरणावर शनिवारी पडदा पडला. कारण आपले निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत आपण पदावर राहणार नाही या भाजपच्या धोरणानुसार त्यांनी आपल्या पदाचा, मंत्रिपदांचा राजीनामा दिला. भाजपला आपण स्वच्छ आहोत हे दाखवण्यासाठी ही कारवाई करणे आवश्यक होतेच. परंतु हकालपट्टी करण्यापेक्षा मोठेपणाने दिलेला राजीनामा महत्वाचा आहे. एरवी अशा प्रकरणात कॉंग्रेसचे मंत्री हाकलेपर्यंत चिकटून रहात. त्यामुळे खडसे आणि भाजपची अब्रू शाबूत राहिली आहे. पण या सगळ्यात दुष्काळाचे चित्र पुसले गेले. त्यावरून सर्वांचेच लक्ष हटले.
- वास्तविक खा.रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर महसूलमंत्री एकनाथराव खडसे प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे असे दिसत होते. त्यांच्यावरील संभाव्य कारवाई काही दिवसांसाठी टळण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली होती. पण खडसेंनी तशी वेळ येऊ न देता स्वत:हून(?) राजीनामा दिले हे ठिक झाले.
- खडसेप्रकरणी गेले दोन दिवस मुंबई, दिल्लीत वेगवान घडामोडी घडल्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत खडसे हाच विषय चर्चेचा होता. मुंबईत अंजली दमानियांचे उपोषण सुरु झाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अल्पसंख्याक समुदायाने खडसेंच्या समर्थनार्थ आझाद मैदानावर रॅली केली. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींशी चर्चा केली. खडसेंवर ‘उचित कारवाई’चा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिल्ली सोडली. मुख्यमंत्र्यांनीच ‘कारवाई’ हा शब्दप्रयोग केल्याने खडसेंना आता अभय नाही हे स्पष्ट झाले होते. कारवाईचा निर्णय झाला फक्त मुहूर्त शोधणे सुरु होते. खडसेंचा राजीनामा घेण्यात येणार असल्याच्या बातम्याही झळकू लागल्या होत्या. पण शनिवारी खडसेंनी राजीनामा दिला आणि या प्रकरणाला आता काय वळण मिळते हे पाहण्यास मुक्त झाले.
- नाथाभाऊंच्या सुनबाई खा.रक्षा खडसे यांनी पंतप्रधानांना या कथित षडयंत्राविषयी माहिती दिली होती. राज्यातील काही मोठ्या जबाबदार घटकांनी ना. खडसेंना बदनाम करण्यासाठी मोहीम राबविली, असा रोख त्यात होता. त्यासाठी वारेमाप पैसा खर्च करुन खास यंत्रणाही वापरली गेली, असे खा.रक्षा खडसे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याचे बोलले जाते. आता त्यात कितपत तथ्य आहे हे भविष्यात समजेल. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी काही कागदपत्रेही पंतप्रधानांकडे सुपूर्द केली होती. ना.खडसेंवर कारवाई केल्यास पक्षात काय पडसाद उमटू शकतात याची माहितीही त्यांनी दिली. खा.रक्षा खडसेंच्या या भेटीमुळे खडसे प्रकरणाला कलाटणी मिळण्याची अपेक्षा असताना कारवाई पूर्वीच नाथाभाऊंना राजीनामा द्यावा लागला. यावरून रक्षा खडसे या नाथाभाऊंचे रक्षण करण्यास अपुर्या पडल्या हे दिसून आले.
- परंतु या खडसे प्रकरणामुळे भाजपलाही थोडा धक्का बसला आहे. चारित्र्यवानांचा पक्ष असलेल्या पक्षात असे लोक आहेत या चर्चेला थांबवणे भाजपला अशक्य आहे. मात्र एक गोष्ट त्या दरम्यान चांगली झाली. ती म्हणजे, दुष्काळाच्या झळांनी बेजार झालेल्या फडणवीस सरकारच्या मदतीसाठी अखेर महसूलमंत्री एकनाथराव खडसे धाऊन गेल्याचे चित्र आहे. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या चर्चा एकदम बंद झाल्या आणि खडसे चर्चेत आले.
- खडसेंवरील आरोपांच्या फैरी १८ मे पासून सुरु झाल्या. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत राज्यातील दुष्काळ जणू छुमंतर झाला आहे. यातून एकूणच राजकीय आणि माध्यम क्षेत्राच्या जाणिवा किती बोथट झाल्या आहेत, याचा प्रत्ययही येऊ लागला आहे. यावर्षी राज्य भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. हंगाम हातचा गेला, गुराढोरांना चारा, पाण्याची सोय नाही व डोक्यावर कर्जाचे ओझे यामुळे अनेक शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण स्थिती असल्याने तेथील जनजीवनावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. विहिरींचा तळ उघडा पडला, गावातील साठेही अटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. मराठवाड्यात तर दुष्काळाने कहरच केला. लातूर जिल्ह्यावासियांनी तर पाण्यासाठी टाहो फोडला. त्यांच्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की ओढवली. ही परिस्थिती नैसर्गिक की मानव निर्मित यावर माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्वण झाले. नाम सारख्या सेवाभावी संघटना पुढे आल्या. विरोधकांनी सरकारला धारेवार धरत पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन खर्ची घातले. सोशल मीडियातही या दुष्काळाचे गंभीर प्रतिबिंब उमटले होते. सरकारच्या नाकीनऊ आले होते. समाधानकारक पावसाचा अंदाज आल्याने सरकारने सुस्कारा सोडला असतांनाच मे च्या उत्तरार्धात दुष्काळ आणि पाणी टंचाईने परिसीमा गाठली. उष्णतेची लाट आली. परिस्थिती गंभीर असली तरी विरोधी पक्ष आणि बहुसंख्य माध्यमांना आता नवा विषय मिळाला होता. त्यामुळे दुष्काळाकडे पाठ करून सगळे खडसेंकडे सरसावले. ना. खडसेंवर ३०कोटींच्या लाचखोरीचा आरोप झाला, दाऊदच्या घरुन खडसेंच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे कथित प्रकरण समोर आले, पुण्याच्या भोसरीतील सरकारी जमिन लाटल्याचे आरोप झाले. खडसे चहुबाजुने घेरले गेले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खडसेंना लक्ष केले. माध्यमांत तर गेल्या पंधरवड्यापासून खडसे पुराण सुरु आहे. आता दुष्काळावर जाब विचारायला कोणीच तयार नाही, खडसे प्रकरण आणखी काही दिवस चालेल. तो पर्यंत पाऊस कोसळेल आणि दुष्काळाची भीषणताही त्यात वाहून जाईल. पण दुष्काळातून महाराष्ट्राला सोडवायला आणि सरकारला वाचवायला खडसेच कारणीभूत ठरले हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा