बुधवार, १५ जून, २०१६

ये रे बाबा लवकर ये


  • महाराष्ट्रातला मानसून लांबणीवर गेल्याची बातमी काल सर्वच वाहिन्यांवर झळकली आणि संतापाची लाट मस्तकात गेली. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून साधारण दर दोन दिवसांनी यंदा पाऊस भरपूर होणार, मानसून खूप लवकर धडकरणार, १७ मे रोजी दाखल होणार, १२७ टक्के होणार, नंतर १०९ टक्के आणि आता १०२ टक्के होणार असे अंदाज वर्तवत मानसून लांबणार अशी बातमी धडकली. इतके वर्षात अचूक अंदाज वर्तवणारे हवामान खाते आम्हाला निर्माण करता येत नसेल तर या खात्यावर होणारा लाखो कोटी रूपयांचा खर्च कशासाठी करायचा? अतिशय संतापाची बाब आहे ही.
  •      आज हवामान खात्याचे अंदाज पाहिल्यानंतर पाऊस ठरला खोटा.. असे म्हणायची वेळ आलेली आहे. देशाच्या हवामान खात्याने या देशातील ७० टक्के शेतकर्‍यांची आणि तसे पाहिले तर संपूर्ण देशाची फसवणूक केलेली आहे, असेच म्हणावे लागेल. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. कसले चुकीचे अंदाज काढून लोकांना फसवता?
  •    उपग्रह, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाल्यानंतरही अशी अवस्था कशी असू शकते? विज्ञान तुमच्या दाराशी आल्यानंतर हवामान खात्यातील अद्ययावत शास्त्रीय उपकरणे इतकी आधुनिक आहेत की, या खात्याचे अंदाज कोणत्याही परिस्थितीत चुकता कामा नयेत. ज्या काळात अद्ययावत उपकरणे नव्हती तेव्हा हवामान खात्याची टिंगल होत होती. आता ५० वर्षानीसुद्धा त्या हवामान खात्याची अशीची खिल्ली अजून उडवावी लागेल. 
  •  केंद्रीय विज्ञान मौसम विभाग नावाचे खाते मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. त्याला पूर्णवेळ कॅबिनेटमंत्री आहे. देशातील १४ प्रमुख वेधशाळांमध्ये ढगांची छायाचित्रे रोज संकलित केली जातात. त्यावर टिपण्णी तयार होते. त्या ढगांच्या छायाचित्रांवरून त्या ढगांमध्ये ‘पाण्याची घनता’ किती टक्के आहे, याचा अंदाज काढता येतो. सॅटेलाईटवरून येणारी ही छायाचित्रे असतात. त्यामुळे जगात कुठे कुठे पाऊस आहे, काळे ढग कुठे आहेत, हलके पांढुरके ढग कुठे आहेत, ही सगळी छायाचित्रे भल्या मोठया स्क्रिनवर हवामान खात्यात पाहता येतात. पुण्याची वेधशाळा किंवा मुंबईतील कुलाब्याची वेधशाळा इथे ही अद्ययावत यंत्रणा आहे. या दोन्ही वेधशाळांनी २५ मे २०१६ रोजी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘२८ मेपर्यंत अंदमानात पाऊस दाखल होईल आणि या वर्षीचा पावसाळा ३ जूनपासून सुरू होईल’. असे असताना का चुकला हा अंदाज?
  •  याच वेधशाळांनी आणखी एक महत्त्वाचे निवेदन केले की, ‘या वर्षी २७ ते ४१ टक्के पाऊस जास्त पडणार आहे’.  महाराष्ट्रातील तमाम जनतेने या अत्यंत महत्त्वाच्या आनंदी बातमीचे खूप मोठे स्वागत केले होते. महाराष्ट्रातील शेतकरी तर त्या पावसाकडे डोळे लाऊन बसलेला आहे.  ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण तर कल्पनेच्या पलीकडील आहे.  अशावेळी अत्याधुनिक वेधशाळांनी पाऊस जूनच्या पहिल्या आठवडयात येत असल्याचे जाहीर करून टाकले. एवढेच नव्हे तर १ जूनला असे जाहीर करण्यात आले की, ‘३ जूनपासून केरळात मान्सून दाखल होणार’. ३ जून रोजी केरळमध्ये येणारा पाऊस पुढे ५ जूनपर्यंत महाराष्ट्राकडे सरकायला हवा होता. ‘येणार येणार’ अशी या पावसाची प्रचंड जाहिरात झाली. प्रत्येक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर या ‘मान्सून’ला जागा मिळाली. आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या करून टाकल्या. या वेधशाळेच्या चुकीच्या अंदाजामुळे प्रसारमाध्यमांची विश्‍वासार्हता आणखी धोक्यात आली.
  •     ७ जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्राने घोर निराशा केली आहे. दुसरा आठवडा सुरू झाला. मृगाच्या सरींचा पत्ता नाही. पेरण्या तर होऊन गेल्या. पाणी पडले नाही. केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली. बियाणांच्या टंचाईचा प्रश्न पुन्हा होणार. वेधशाळांनी अंदाज केलेला तो पाऊस आहे कुठे? गेला कुठे? तो लांबला कसा?
  • वेधशाळांच्या सांगण्यामुळे अत्यंत अडचणीच्या स्थितीत असलेला शेतकरी निढाळाचा घाम गाळीत या कडक उन्हात पेरण्या उरकून घेतो. आता पाऊस येणार या भाबडया आशेने तो आकाशाकडे डोळे लावून बसतो. पण आजची स्थिती अशी आहे की, खरिपाच्या पेरण्या जवळजवळ फुकट गेलेल्या आहेत. मृग कोरडे जाते की काय अशी भीती आहे.
  •   वेधशाळांनी दिशाभूल करणार्‍या बातम्या सोडू नयेत. तुम्ही जो काय २७ ते ४१ टक्के जास्त पाऊस पडण्याचे सांगता आहात तो आम्हाला नको. नेहमी एवढाच पाऊस पडला तरी पुष्कळ झाले. आता विज्ञानावर नाही तर परमेश्‍वरावर भरोसा ठेवून राहावे लागणार असे दिसते. परमेश्वर करो आणि उशिरा का होईना धुवांधार पावसाची सुरुवात महाराष्ट्रभर होऊ दे. कारण या वर्षी जर पाऊस झाला नाही तर त्या भयाण संकटाची कल्पनासुद्धा करता येणार नाही. जनावरे तडफडून मरतीलच. माणसेही तडफडून मरतील. अंदाज चुकला असेल तरी परमेश्‍वराची कृपा चुकू नये आणि उशिराने का होईना भरपूर पाऊस पडू दे एवढीच अपेक्षा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: