- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौर्यावर विरोधकांकडून आणि सोशल मिडीयावरून टिका होत असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी भारतासाठी जे काम केले आहे ते गेल्या साठ वर्षात आजवर कोणाला करता आले नाही हे नाकारून चालणार नाही. यापैकीच एक काम म्हणजे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे. अमेरिकेसारख्या असंख्य मोठ्या देशांनी त्यासाठी पुढाकार घेणे आणि तो घेण्यासाठी मोदींनी घेतलेली मेहनत हे फार मोठे काम आहे. एका भारतीय शास्त्राला जागतीक पातळीवर यामुळे प्रतिष्ठा लाभली आहे.
- आजपर्यंत आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला प्रेरक ठरावं असं बरंच काही दिलं आहे. ‘हे विश्वची माझे घर’ हा वैश्विक एकतेचा संदेश याच भूमीतील संतांनी अखिल मानवजातीला दिला. आज निसर्गरक्षणाचं महत्त्व नव्यानं अधोरेखित होत आहे. परंतु हाच संदेश भारतातील विविध सण-उत्सवांमधून वर्षानुवर्षे दिला जात आहे. या भूमीत होणारे संस्कार अनेक परदेशवासियांसाठी अभ्यासाचा विषय ठरत आहेत. योगाभ्यास हीसुध्दा भारताने जगाला दिलेली अशीच अमूल्य देणगी आहे. आपण मात्र याची हेटाळणी करण्यात धन्यता मानतो, टिका करण्यात मोठेपण मानतो यातच विरोधकांचे कोतेपण दिसून येते. चांगल्याला चांगले म्हणण्याचे मोठेपण जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत इथली लोकशाही परिपक्व होणार नाही आणि घराणेशाहीतून बाहेर पडणार नाही. योगाभ्यासाचं महत्त्व आता सगळ्या जगाला पटलं आहे. त्यातूनच ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याचा विचार पुढे आला आणि त्यावर शिक्कामोर्तबही झालं. गेल्या वर्षी भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर या वर्षीचा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ही जय्यत तयारीनिशी साजरा केला आहे. विशेषता शाळांनी त्यासाठी दाखवलेला उत्साह महत्वाचा आहे. आज सातार्यातील सगळ्या शाळांनी सकाळच्या शाळा भरवून योग दिन साजरा केला.
- आज आपण चुकीची जीवनशैली अंगिकारत आहोत. प्रत्येक व्याधीवर पैसा आणि औषधांद्वारे उपाय शोधत आहोत. पण या दोन्ही माध्यमांच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या आहेत. म्हणूनच जगाला पुन्हा एकदा योगसाधनेचं महत्त्व पटू लागलं आहे. भारतातच नव्हे तर प्रगत देशांमध्येही योगाभ्यास केला जातो. चंद्रावर, मंगळावर पोहोचलेले देश; वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग प्रगती करणारे देश, तंत्रज्ञानात शिखर गाठणारे देश आरोग्य जपण्यासाठी योगसाधनेचं सहाय्य घेतात. या देशांमध्येच जाणीवपूर्वक योगसाधना केली जाते. आपला शेवट सुसह्य व्हावा, शेवटच्या श्वासापर्यंत कोणावर अवलंबून राहावं लागू नये अशी इच्छा असणार्या प्रत्येकाला योग मदत करतो.
- योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक आणि सामाजिक प्रवृत्ती लाभू शकते. योग अंगामध्ये नवचैतन्य निर्माण करतो. ईश्वरानं आपल्याला जन्माला कशासाठी घातलं, आपली ओळख काय, आपल्याकडून त्याला नेमकं काय अपेक्षित आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं योगामध्ये मिळतात. आपण केवळ हाडामासाचा गोळा नाही तर त्यापेक्षा आणखी कोणी आहोत ही जाणीव निर्माण होण्यासाठी योगसाधना हवीच. आपलं आयुष्य कुठल्या दर्जाचं असावं, आपली पात्रता काय असावी हे आपण ठरवावं, जगानं नव्हे. ही जाणीव करून देतो तो योग!
- योग्य आहार, योग्य विहार, योग्य विचार या माध्यमातून शिकवला जाणारा योग सर्व दुःखांवर उपाय सुचवतो. त्यामुळे रोगच नव्हे तर दुःखहरणही होतं. ही योगाची क्षमता आहे. आपण इतरांना दोष देण्यात वेळ वाया घालवतो. पण स्वतःमधले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत नाही. यासाठी पौष्टिक, संतुलित आणि सात्विक आहार पूरक ठरतो. अशा बलवान देहात आणि मनात विकार उत्पन्न होत नाही. असलेल्या विकारांची तीव्रता कमी होते आणि विनाऔषध व्याधीमुक्त होता येतं.
- माणसाचं मन हे मध्यस्थानी आहे. प्रत्येक कामामध्ये मनाचा प्रभाव असतो. योगशात्रामध्ये सर्वप्रथम या मनाचा विचार केला जातो. योग व्यक्तीला उन्नत अवस्था देतो त्याचप्रमाणे समाजाचीही उन्नती घडवतो. कारण योगाभ्यास हा एकटयानं करण्याचा अभ्यास आहे, त्याचप्रमाणे सामुदायिकरित्याही योगसाधना केली जाते. सर्वांनी एकत्र येऊन प्राणायाम, मेडिटेशन, मंत्रपठण केलं तर सहाजिकच बंधूभाव आणि एकी निर्माण होण्यास मदत होते. आपण दात घासतो, आंघोळ करतो, दोन वेळा जेवतो. तितक्याच नियमितपणे योगसाधनाही व्हायला हवी. योगामुळं बहिर्मुखता कमी होते आणि अंतर्मुखता वाढते. शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही अंगानं सक्षम झाल्यास कुठल्याही कामाचा ताण जाणवणार नाही हे त्रिवार सत्य आहे. यासाठीदेखील योग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हा योगा योग कसा येईल हे पाहिले पाहिजे.
शनिवार, २५ जून, २०१६
योगा योग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा