शुक्रवार, १० जून, २०१६

मोठेपणाने कौतुक करा


अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची आणि त्याला कॉंग्रेसच्या सदस्यांकडून, म्हणजे अमेरिकन कॉंग्रेसच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची केवळ भारतातच नव्हे तर जगभर चर्चा सुरु आहे. त्यानिमित्ताने मोदींच्या कर्तृत्वाचा आणि वर्क्तृत्वाचाही गुणगौरव होणे स्वाभाविक आहे. मोदींच्या या पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणावर हे सदस्य एवढे भारावून गेले की, त्यांनी तब्बल ६८ वेळा टाळ्यांनी मोदींना दाद दिली आणि नऊ वेळा उठून उभे राहत मोदींचा गौरव केला. या सगळ्याचा उल्लेख करत आपल्याकडे सामाजिक माध्यमांतून मोदींचा जो उदो उदो सुरु आहे तो इतक्यातच ओसरण्याची चिन्हे दिसत नाहीत. पण मोदी विरोधक माध्यमे आणि कॉंग्रेस यांच्या मात्र यामुळे पोटात दुखायला लागले आहे. त्यामुळे त्यांनी लगेच मोदी कसे वाईट आहेत, त्यांचे दौरे कसे चुकीचे आहेत, दुष्काळग्रस्त भागात ते कसे जात नाहीत या चर्चांना उत आला आहे. पण मोदी हे काम करणारे व्यक्तिमत्व आहे. जे काम नगरसेवकाचे आहे त्यासाठी मुख्यमंत्र्याने कशाला यायचे? त्याचप्रमाणे स्थानिक दुष्काळ दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री, पालकमंत्री यांनी सरकार दरबारी पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून, सरकारचे प्रतिनिधी म्हणून जायला हवे. प्रत्येक ठिकाणी मोदींनी कशाला जायला पाहिजे? पण अमेरिका दौर्‍याचा संबध मोदींची निष्क्रियता दाखवण्यासाठी माध्यमे या थराला पोहोचली खरी. साहजीकच नमो भक्त सोशल मिडीयावर प्रकटले तर आश्‍चर्य नाही. मोदींनी अमेरिकन कॉंग्रेस जिंकली यात काही वाद नाही. मात्र त्या सदस्यांच्या टाळ्यांचे रुपांतर भारताच्या बाजूने करार करण्यात आणि पाकिस्तानला लगाम घालण्यात किती होते यावर बरेच काही अवलंबून आहे. अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको अशा पाच देशांच्या मोदींच्या दौर्‍यात सगळ्यात गाजला तो अमेरिका दौरा. त्याला राजकीय आणि राजनैतिक महत्व सर्वाधिक होते. आण्विक पुरवठादार राष्ट्रांच्या गटात भारताला स्थान मिळावे यासाठी भारताला पाठिंबा देण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली ही महत्वाची राजनैतिक घडामोड समजावी लागेल. ओबामांनी पाठिंबा दिल्यामुळे लगेच भारताला या गटाचे सदस्यत्व मिळणार आहे काय आणि ज्याचे सदस्यत्व मिळाले आहे त्या तंत्रज्ञान विषयक गटाचे महत्व फार नाही असे म्हणून ओबामांच्या पाठिंब्याकडे आणि तो मिळवण्या मागच्या मोदींच्या कौशल्यामुळे काहीसे हेटाळणीच्या नजरेने बघितले जात आहे. चांगल्या कामाचे कौतुक करण्याचे मोठेपण असावे लागते, ते कॉंग्रेस आणि या तथाकथीत पुरोगाम्यांकडे नाही हे नक्की झाले. अटलबिहारी वाजपेयी यांनी बांग्लादेश युद्धानंतर इंदिरा गांधींचे कौतुक केले होते, त्यांचा दुर्गा म्हणून गौरव केला होता. याला दिलदार आणि परिपक्व विरोधक म्हणतात. पण केवळ सत्तेसाठी हपापलेली कॉंग्रेस असा मोठेपणा कसा दाखवेल?  पण म्हणून मोदींच्या अमेरिकन कॉंग्रेसपुढील भाषणाचे आणि त्याच्या प्रतिसादाचे महत्व कमी होणार नाही. मोदी उत्कृष्ट वक्ते आहेत. समोरचा प्रेक्षक कोण आहे आणि त्याच्याशी काय बोलायला हवे याची उत्तम जाण त्यांच्याकडे आहे. आवाजातील चढउतार आणि समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला हात घालणारे, त्याचे विश्लेषण आणि शेवटी त्याला केलेले आवाहन ही सर्व भट्टी जमविण्याचे कौशल्य मोदींना चांगलेच साधले आहे. त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील लोकशाहीचे विविध दाखले देत असे काही गुणगान केले की ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन गेले. महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची नावे घेत आणि लोकशाही व राज्यघटना रुजवण्यातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख मोदींनी एवढा दिलखुलासपणे केला की ऐकणारे प्रभावित झाले नसते तरच नवल होते.    उभय देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांचा हवाला देत मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मधील हल्ल्याच्या वेळी अमेरिकेने भारताला सहकार्य केल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत मोदींनी सध्याच्या महत्वाच्या विषयाला हात घातला. दहशतवाद हे जगापुढील सगळ्यात महत्वाचे आणि तेवढेच भयानक संकट आहे. त्याचा उल्लेख मोदींनी त्यांच्या परदेश दौर्यातील जवळपास प्रत्येक भाषणात केला आहे. वेम्ब्ली आणि मॅडिसन क्वेयर येथील मोदींची प्रसिध्द भाषणे गाजली ती याच मुद्यावर. परवाच्या भाषणातही केवळ भारत दहशतवादी हल्ल्यांचा बळी ठरत आहे म्हणून गळा काढण्यापेक्षा दहशतवाद हे जगापुढील आव्हान कसे आहे हे मोदींनी कॉंग्रेस सदस्यांना नेमक्या शब्दात पटवून दिले. दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित व्हायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये आधी ती निर्माण करावी लागेल हे मोदींचे निरीक्षण अफगाणिस्तानवर हल्ला करुन तो बेचिराख करणार्‍या अमेरिकेला पटावे असेच आहे. कारण तालिबानचा खात्मा करण्यासाठी बुश यांनी हे हल्ले केले. त्यात नाटोला बरोबर घेतले असले आणि संयुक्त राष्ट्रांची मंजुरी घेतली असली तरी त्यात प्रमुख भूमिका अमेरिकेचीच होती. अफगाणिस्तानात अमेरिका पर्यायी सरकार स्थापू शकली ना इराकमध्ये. उलट या दोन्ही देशांत आजही अराजकसदृश परिस्थिती असून अफगाणमध्ये उभारणीचे काही काम कोणी करत असेल तर तो फक्त भारत करत आहे. मोदींनी हे पटवून दिले. इराकमध्ये तर बहुतांश भागावर इसिसचाच कब्जा आहे. त्या दहशतवाद्यांनी युरोपला लक्ष्य केले आहे. परंतु अफगाणमधील तालिबान आणि अल काईदा हे पाकिस्तानच्या भूमीवरुन या संपूर्ण दक्षिण आशियाला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहेत. मोदींनी पाकमधील या दहशतवादाचा थेट उल्लेख करुन त्याचा राजकीय फायद्यांसाठी वापर करणार्यांना जो इशारा दिला तो अमेरिकेलाच लागू होतो. पण मोदींच्या या कृतीचे कौतुक केलेच पाहिजे. पंडित नेहरू वगळता कोणत्याही पंतप्रधानाने आजवर अमेरिकन कॉंग्रेसला संबोधले नव्हते. हे मोठेपणाने मान्य करावेच लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: