शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

बिगर काँग्रेस सरकारची परीक्षा


भारतीय लोकशाहीच्या इतिहासात जेव्हा जेव्हा बिगर काँगे्रेस सरकारला निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे तेव्हा त्यांना दुसरी टर्म मिळवता आलेली नाही. याला थोडा अपवाद अटलबिहारी वाजपेयी सरकारचा आहे, पण म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता ही परीक्षा देताना उत्तीर्ण होते का हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यासाठी मागील बिगर काँग्रेस सरकारला दुसºया परीक्षेत जनतेने का नाकारले असावे हे पाहणेही महत्वाचे आहे. या साºया इतिहासात भाजप आणि काँग्रेस यांचाच हात सरकार उभारणीत आणि पाडण्यात महत्वाचा असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळेच पूर्णबळावर आलेले हे भाजप सरकार आता दुसरी परीक्षा देताना काय खेळी खेळते याची साºयांना उत्सुकता आहे.आपल्याकडे सर्वात प्रथम बिगर काँग्रेस सरकार अस्तित्वात आले ते १९७७ साली. जयप्रकाश नारायण यांच्या कृपेने मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये डावे, समाजवादी आणि जनसंघातील नेत्यांची सरमिसळ होती. फक्त हे आपापले झेंडे घेऊन न येता नांगरधारी शेतकरी या एकाच जनता पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आलेले होते. तरीही त्यांचे आपापल्या परिवाराशी नाते तुटलेले नव्हते. हे न तुटलेले नातेच हे सरकार कोसळण्यास कारणीभूत झाले होते. या पक्षात एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले गांधीवादी नेते होते. या गांधीवादी नेत्यांमध्ये अर्थातच मोरारजीभाई देसाई यांचा समावेश होता. समाजवादी नेत्यांमध्ये मधू लिमये, कृृष्णकांत आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे नेते होते. त्यांच्यासमवेत जनसंघातील किंवा राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीतून तयार झालेले अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण  अडवाणी, सिकंदर बख्त असे काही नेते होते. हे सगळेच भिन्न विचारांचे आणि विचारसरणीचे नेते इंदिरा गांधींची आणिबाणी आणि हुकूमशाहीला विरोध यासाठी एकत्र आले होते. कारण एकटा कोणीच काँग्रेसला पराभूत करू शकणार नव्हता. हा हेतू साध्य झाल्यावर मात्र त्यांचे एकत्र असणे हे कठिणच होते. म्हणजे नेहमी स्वतंत्र टेंडर भरणारे ठेकेदार एखाद्या प्रोजेक्टसाठी जॉर्इंट व्हेंचर करतात आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्पर्धक होतात. तसेच नेमके समाजवादी आणि डाव्या विचारांच्या नेत्यांना वाटू लागले होते. त्यामुळे दोन ठिकाणी सदस्यत्व, निष्ठा ठेवण्याचा आक्षेप घेत सरकारमध्ये किंवा जनता पक्षात दोन ठिकाणी जाणारे नेते नकोत असा विरोधाचा सूर त्यांनी आळवला. यामध्ये मधू लिमये, कृष्णकांत आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा पुढाकार होता. जनता पक्षात जनसंघातून आलेल्यांनी संघाशी संबंध ठेऊ नये हा वाद निर्माण झाला आणि दोघा दोघा खासदारांनी राजीनामे देत हे सरकार कोसळले. काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यानंतर अल्पकाळासाठी चरणसिंग यांचे सरकार आले. चरणसिंग आधीपासूनच बाशिंग बांधून बसले होते. तो त्यांचा हव्यास काँग्रेसने पूर्ण केला. पण निवडणुकीसाठी योग्य परिस्थिती होईपर्यंतच ही तडजोड होती. त्यानंतर ज्या निवडणुका  झाल्या त्यामध्ये ही एकजूट नसल्याने अर्थातच इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. यावेळी काँग्रेसशिवाय दुसरा कोणी सरकार चालवूच शकत नाही असा समज ग्रामीण भागात आणि मतदारांमध्ये रुजवण्यात काँग्रेसला यश आले होते. त्यामुळे नंतरच्या परीक्षेत जनता पक्षाचा मानकरी नांगरधारी शेतकरी हा गटांगळ्या खात दूर फेकला गेला आणि त्या पक्षाचेही अनेक तुकडे झाले. पण बिगर काँग्रेस सरकारला दुसºयांदा सत्तेवर येणे शक्य होत नाही हे पहिल्याच बिगर काँग्रेस सरकारने दाखवून दिले. या बिगर काँग्रेस सरकारने २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ या काळात मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली काम केले, तर २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या कालावधीत चौधरी चरणसिंग हे पंतप्रधान होते. हे औटघटकेचे सरकार एकूण ३३ महिने २० दिवस सत्तेवर राहिले. हे सरकार पाडण्यासाठी संघ जनसंघाचा मुद्दा कारणीभूत होता.बिगर काँग्रेस सरकार दुसºयांदा सत्तेवर आले ते १९८९ साली. व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाचे. काँग्रेसमधून बंडखोरी करून राजीव गांधींना विरोध करून व्ही. पी. सिंग यांनी उभारलेल्या जनता दलाला पूर्ण बहुमत नसताना भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर हे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी लोकसभेतील सर्वाधिक जागा जिंकलेल्या राजीव गांधींच्या काँग्रेसने स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सरकार बनवले नव्हते. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारला भाजपच्या ८५ खासदारांचा बाहेरून पाठिंबा होता. हे सरकार स्थिर झाल्यावर भाजपने आपली ताकद दाखवण्यासाठी रामरथयात्रा काढली. ती अडवाणींची यात्रा अडवली आणि  रामजन्मभूमीला विरोध झाला. याचे निमित्त करून भाजपने पाठिंबा काढून घेतला आणि हे सरकार कोसळले. मागच्या प्रमाणेच काँग्रेसने निवडणुकांना लगेच सामोरे जावे लागू नये म्हणून जनता दलातील एक तुकडा पाडून चंद्रशेखर यांना पंतप्रधान करण्याची किमया केली. ज्याप्रमाणे मोरारजीभाई देसाई सरकारचा तुकडा पाडून चरणसिंगांना पंतप्रधान बनवण्याचे काम जसे काँग्रेसने केले तसेच इथे चंद्रशेखर यांच्याबाबतीत राजीव गांधींनी केले. आपल्यायोग्य वातावरण झाल्यावर या चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतला आणि हे सरकार कोसळले. निवडणुकांना सामोरे जावे लागले. या दुसºया परीक्षेत जनता दल पार दलदलीत फसले आणि त्या दलदलीत कमळ उमलायला सुरुवात झाली. पण बिगर काँग्रेस सरकारला दुसरी परीक्षा पास होता येत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले. यामध्येही संघ, भाजप आणि काँग्रेस यांच्या खेळात सरकारचा बळी गेलेला दिसून आले. जनता दलाची ही व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील दोन सरकारे मिळून एकूण २ डिसेंबर १९८९ ते २१ जून १९९१ इतका काळ टिकली. यात काळजीवाहू सरकारचा कालावधीही समाविष्ठ आहे. हा कालावधी साधारण १८ महिन्यांचा आहे. इथेही सरकार पाडण्यात भाजप आणि काँग्रेस या दोघांची आलटून पालटून सोयीची भूमिका कारणीभूत ठरल्याचे दिसते. यात दोन्ही पक्षांनी स्वत:ला मोठे करण्याचे तंत्र दाखवून दिले.तिसरे बिगर काँग्रेस सरकार अस्तित्वात आले ते १९९६ साली. लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ म्हणून भाजपला सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले गेले. पण मित्र पक्ष मिळवण्यात अपयश आलेल्या भाजपला १३ दिवसात पायउतार व्हावे लागले आणि एच. डी. देवेगौडा हे अपघाती पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आली. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी आणि अन्य नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून देवेगौडा सरकार काँग्रेसने कोसळवले. त्याच आघाडीचा पुन्हा एकदा तुकडा पाडून काँग्रेसच्या पाठिंब्यावर इंद्रकुमार गुजराल यांचे सरकार अस्तित्वात आले. नेहमीप्रमाणे आपल्याला योग्य परिस्थिती झाल्यावर काँग्रेसने याही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ आली. बिगर काँग्रेस सरकारचा हा कालावधी दोन्ही सरकार मिळून १ जून १९९६ ते १२ मार्च १९९८ पर्यंत म्हणजे सुमारे २१ महिन्यांचा होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत या सरकारला किंवा आघाडीला मतदारांनी नाकारले. १३ दिवसांत बहुमता अभावी सरकार सोडावे लागलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला मतदारांनी यावेळी थोडे झुकते माप दिले, पण भरभरून दिले नाही. त्यामुळे अनेक घटक पक्षांना जोडून हे सरकार वाजपेयींनी उभे केले. पण स्पष्ट बहुमत नसलेले हे सरकार एकमताने कोसळवण्यात काँग्रेसला यश आले. काँग्रेसमध्ये यावेळी ही करामत शरद पवारांनी केली होती. पण त्याचवेळी त्यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बिगर काँग्रेस असलेले हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्टÑीय लोकशाही आघाडीचे सरकार १३ महिने चालले. पण हाच एक अपवाद बिगर काँग्रेस सरकारने पुन्हा परीक्षेत पास होण्याचा होता. यामध्ये महत्वाचा भाग हा वाजपेयींबद्दल असलेल्या सहानुभूतीचा होता. दुसरा भाग म्हणजे काँग्रेस नेतृत्वहीन होती. सोनिया गांधी नवख्या होत्या. त्यामुळे भाजपला पुन्हा सत्तेवर येता आले. पण त्यानंतर १९९९ ते २००४ या कालावधीत राज्य केल्यानंतरच्या बिगर काँग्रेसच्या या सरकारला पुन्हा निवडणुका जिंकता आल्या नाहीत. ‘फिल गुड’मुळे सगळे ठप्प झाले आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील मनमोहन सिंग सरकार सलग दहा वर्षे राहिले.त्यानंतर पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत असलेले आणि आघाडीचे संख्याबळ चांगले असलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बिगर काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आले. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करते आहे. परंतु आता दुसरी परीक्षा देताना या सरकारला वाजपेयींप्रमाणे पास होता येते की नेहमीप्रमाणे बिगर काँग्रेस सरकारला दुसरी टर्म द्यायची नाही ही परंपरा मतदार कायम ठेवणार याचे उत्तर लवकरच दिसून येईल. अर्थात हे सगळे राजकीय खेळ काँग्रेस आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांभोवती खेळले जातात. बाकीचे छोटे घटक पक्ष कठपुतळीप्रमाणे नाचत राहतात. त्यामुळेच आता बिगर काँग्रेस किंवा बिगर भाजप तिसरी आघाडी करून त्यांचे सरकार बनवायचे झालेच, तर जनता पक्ष, जनता दल आणि युनायटेड फ्रंट या सरकारचा इतिहास पहावा लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: