भारतात केवळ पैसे कमावण्यासाठी खासगी हॉस्पिटल हे महिलांची सिझेरियन प्रसूती करीत असल्याची धक्कादायक बाब एका सव्‍‌र्हेतून समोर आली आहे. एका वर्षात ७० लाख महिलांची प्रसूती झाली असून यातील ९ लाख महिलांची गरज नसताना सिझेरियन प्रसूती करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. आज-काल वैद्यक क्षेत्रातील पैसे कमावण्याचे नवनवे धंदे आणि फंडे सर्वसामान्यांची समस्या झालेली आहे. त्यामुळे जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत सतत वैद्यकीय उपचारांची सवय लावणे ही नवी जीवनशैली वैद्यक क्षेत्रातून रूढ झालेली आहे. माणसांची प्रतिकारशक्ती आणि सहनशक्ती कमी करण्याचाच हा व्यवसाय होताना दिसतो आहे. प्रसूतीच्या कळा या स्त्रीयांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. पण त्याची भीती घालून गर्भनिष्क्रमणाला प्रवृत्त करणे हा धंदा होतो आहे.त्यामुळे महिलांना प्रसूतीचा आनंद मिळत नाहीच, पण गर्भनिष्क्रमणाच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या पोटावर अनावश्यक टाक्यांचे विणकाम दिसते. हे चुकीचे आहे. अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटने केलेल्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. म्हणजे गरज नसताना महिलांची सिझेरियन प्रसूती (गर्भनिष्क्रमण) केल्याने लोकांच्या खिशाला नाहक भार पडला आहे. बाळाला स्तनपान करण्यास उशीर झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे नवजात बाळाचे वजन कमी झाले असून अनेकांना श्वास घेण्यास समस्या निर्माण झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. आयआयएम-एचे सदस्य अंबरिश डोंगरे आणि विद्यार्थी मितूल सुराणा यांनी हे सर्वेक्षण केले आहे. या अहवालातील निरीक्षणानुसार सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी महिला व त्यांचे नातेवाईक सरकारी हॉस्पिटलपेक्षा खासगी हॉस्पिटलांना प्राधान्य देतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस)च्या २०१५-१६च्या आकडेवारीनुसार, खासगी हॉस्पिटलमध्ये ४०.९ टक्के सिझेरियन प्रसूती, तर सरकारी हॉस्पिटलमध्ये केवळ ११.९ टक्के प्रसूती करण्यात आली आहे.अर्थात सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा नसल्यामुळे किंवा डॉक्टर जाग्यावर नसल्यामुळे गर्भवती महिलांना कळा देत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही ना याचाही विचार केला पाहिजे. कारण आपल्याकडे सरकारी दवाखान्यांमधील अंदाधुंदी हा प्रकार सातत्याने डोळय़ांपुढे येत आहे. त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयातील बालमृत्यूचे प्रमाणही खूप आहे. साहजिकच खासगी रुग्णालयांना पसंती देण्याचा विचार केला जातो. खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सिझेरियन प्रसूतीमागे डॉक्टरांचा आणि हॉस्पिटलांचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू होता, हे स्पष्ट झाले आहे, असा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे. नैसर्गिक प्रसूतीत खर्च खूप कमी होतो, तर सिझेरियनमध्ये २० ते २५ हजारांपर्यंत खर्च येत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यानंतर चार-पाच दिवस रुग्णालयात राहण्यासाठी जे लॉजिंग बोर्डिगचे पैसे द्यावे लागतात ते वेगळेच; परंतु सिझेरियन किंवा गर्भनिष्क्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे हे नक्की. यामध्ये केवळ डॉक्टरांनाच जबाबदार धरून चालणार नाही, तर काही पती-पत्नींना नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सिझेरियन करण्याची घाई झालेली असते. यामध्ये अंधश्रद्धा आणि हव्यास ही दोन्ही कारणे असतात. तसेच काही सामाजिक कारणेही असू शकतात. त्यामुळे कित्येकवेळा सिझेरियनचा आग्रह त्या पती-पत्नीकडूनच धरला जातो, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अंधश्रद्धा म्हणजे एखाद्या विशिष्ट दिवशीच आपल्या बाळाचा जन्म व्हावा असे अनेक जोडप्यांना वाटते. विशिष्ट नक्षत्र, तिथीवर जन्म होण्यासाठी आग्रह धरून त्या वेळीच सिझर करावा असे डॉक्टरांना आग्रह करणारेही महाभाग आहेत.त्यामुळे डॉक्टरांना ती विशिष्ट वेळ पाळण्यासाठी अधिक चार्जेस आकारावे लागतात. २०१२ साली १२ डिसेंबरला जन्म मिळावा यासाठी अनेक महाभागांनी सिझेरियनचा आग्रह धरला होता. कारण नवजात बालकाची जन्मतारीख १२/१२/१२ अशी येईल म्हणून अनेकांनी आटापिटा केला होता. अशाच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ जानेवारी, २९ फेब्रुवारी अशा काही तारखांची कसरत करून सिझेरियनचे प्लॅनिंग करणारे काही महाभाग असतात. कित्येकांना घरात सणवाराच्या दरम्यान सोयर यायला नको म्हणून गौरी-गणपतीच्या अगोदर सोयराची अडचण येऊ नये म्हणून सिझर करणारेही अनेकजण आहेत. अशा श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सोयीच्या नियोजित तारखांमुळे सिझरचे प्रमाण वाढते. त्यासाठी जादा पैसे मोजायची तयारी पती-पत्नी दाखवत असतील, डॉक्टर त्याला ना कशाला बोलतील. मग त्यांच्या डोक्यात ही कल्पना घुसली की त्याचा सल्ला अन्य जोडप्यांना देऊन अशाप्रकारे मार्केटिंग करण्याचे काम डॉक्टर काही प्रमाणात करतात. याशिवाय आणखी एक कारण आहे ते म्हणजे कित्येक दांपत्यांना नैसर्गिक प्रसूती नको असते. याचे कारण त्यानंतर योनीमार्गाचा आकार वाढल्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यात आनंद मिळत नाही किंवा दीर्घकाळ वाट पाहावी लागते, असा समज अनेकांचा असतो. साहजिकच नंतर आनंद मिळवण्यासाठी बाळाचा मार्ग बदलला जातो. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे गर्भनिष्क्रमण करावे लागते. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.कित्येक वेळा पती-पत्नींची अनावश्यक काळजी सिझरला प्रवृत्त करते. म्हणजे शक्यतो आज-काल एकच चान्स घेतला जातो. त्यामुळे बाळाचा जन्म सुरक्षित होण्यासाठी प्रसूती वेदनांची वाट न पाहता सिझर केले जाते. कित्येकांना वाटते की जास्त काळ वाट पाहिल्याने बाळाची पोटात वाढ होते, त्यामुळे बाहेर येताना जीव गुदमरण्याची शक्यता आहे, पोटात फिरताना नाळ मानेभोवती येण्याची भीती व्यक्त केली जाते. अशा भीतीमुळे सिझर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. वास्तविक नैसर्गिक प्रसूतीपेक्षा स्त्रियांची प्रकृती सिझरनंतर अत्यंत नाजूक बनते. त्यांना आयुष्यभराचे दुखणे असल्यासारखे प्रकार घडतात. त्यामुळे स्त्रियांनीच शक्यतो सिझरला विरोध केला पाहिजे. आपल्या स्वास्थ्यासाठी आपण खंबीरपणे राहून शक्य तितक्या प्रसूती या नैसर्गिक कशा होतील याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रसूती कळांचा आनंद घेऊन जन्माला दिलेल्या बाळावर आपले प्रेम अधिक असेल याचा अनुभव घेतला पाहिजे. वाढत्या सिझरच्या प्रमाणाला प्रत्येकवेळी डॉक्टरांना जबाबदार धरून चालणार नाही, तर महिलांनीही भक्कम होण्याची गरज आहे.