मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने चांगले प्रदर्शन करीत कमबॅक केले असले, तरी ही लाट महाराष्ट्रात येणे सध्या तरी शक्य नाही, याचे कारण महाराष्ट्रातील काँग्रेस ही पूर्णपणे नेतृत्वहीन आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातील यशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना सत्तेची स्वप्न पडू लागली असली तरी सध्या तरी काँग्रेसने महाराष्ट्रात अशी स्वप्न न पाहणेच उत्तम, कारण खंबीर आणि कणखर नेतृत्वाशिवाय महाराष्ट्रातील काँग्रेस ही पोरकीच आहे. सध्या महाराष्ट्राचे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांना अद्यापही महाराष्ट्र काँग्रेसने नेता म्हणून स्वीकारलेले नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्षपद काय किंवा मुख्यमंत्रीपद काय हे लादलेले पद होते, त्यामुळेच जनमान्य नसलेले खुजे नेतृत्व म्हणूनच त्यांची प्रतिमा आज सर्वश्रुत आहे. अशोक चव्हाणांना नांदेडपलीकडे कोणीही ओळखत नाही. केवळ वरिष्ठांची मर्जी राखून किंवा शंकरराव चव्हाणांचे पुत्र म्हणून नेतृत्व लादायचा काँग्रेसने प्रयत्न केला असला, तरी ना त्यांच्यात शंकररावांचे नेतृत्वगुण आहेत, ना खंबीरपणा आहे. केवळ सत्यसाईबाबांचा आशीर्वाद मागून जनतेचे आशीर्वाद लाभत नाहीत, हे त्यांनी आणि काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसची पुनर्रचना करायची असेल, तर राहुल गांधींना महाराष्ट्रात खंबीर नेतृत्व द्यावे लागेल. आज काँग्रेसकडे असलेले नेतेही कालबाह्य आणि निरुपयोगी नेते आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होण्याची सुतराम शक्यता आजमितीस नाही. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ ही प्रमुख नेतृत्व करणारी मंडळी होती, त्यांनी हे यश खेचून आणले. पक्षाला जो खंबीर चेहरा असावा लागतो, तो चेहरा ज्योतिरादित्य आणि कमलनाथ यांच्या रूपाने होता. गेली पंधरा वष्रे मध्य प्रदेशात काँग्रेसला चेहरा नव्हता. दिग्विजय सिंग यांच्या दहा वर्षाच्या राजवटीला नेस्तनाबूत करून २००३ मध्ये भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशातील काँग्रेस चेहराहीन केली होती. दिग्विजय सिंगांचा विदुषकी चेहरा आणि वक्तव्ये ही काँग्रेसला मारक होती. त्यामुळे भाजप हा पर्याय मतदारांना, तेथील जनतेला सापडला होता. आज भाजपला पर्याय म्हणून नवा कोरा तरुण चेहरा म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव पुढे आलेले आहे. त्यामुळे मतदारांनी त्या नावाला चांगलाच प्रतिसाद दिला. त्यांच्या बरोबरीने कमलनाथ यांच्याकडे राज्याची जबाबदारी दिलेली होती. त्यामुळे ते पण, मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून होतेच; परंतु पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी या दोघांमध्ये फूट पडणार नाही, मतभेद होणार नाहीत, याची काळजी घेत दोघांना बांधून ठेवले. त्यामुळे एक नवा चेहरा काँग्रेसला मिळाला, त्याचा परिणाम निकालात दिसून आला. त्यामुळे त्याचे अनुकरण जर महाराष्ट्रात व्हायचे असेल, तर महाराष्ट्र काँग्रेसला चांगला खंबीर चेहरा द्यावा लागेल. दिग्विजय सिंगांप्रमाणेच अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे सगळे नाकारलेले चेहरे आहेत. अशा परिस्थितीत नेतृत्वहीन झालेली काँग्रेस ही महाराष्ट्रात पोरकी आहे. काँग्रेसकडे महाराष्ट्रात सर्वसमावेशक असे नेतृत्व नाही. प्रत्येकजण आपले गट-तट सांभाळण्यात धन्यता मानतो आहे.गटा-तटात विभागलेली काँग्र्रेस ही महाराष्ट्रात काही चमत्कार करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पुनर्बाधणीसाठी काँग्रेसला सर्वसमावेशक आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. समोर भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे. मित्रपक्ष असला तरी राष्ट्रवादी हा काही काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी बोळय़ाने दूध पिणारा पक्ष नाही. त्यामुळे या तीन आक्रमक पक्षांच्या तुलनेत महाराष्ट्रात काँग्रेस आहेच कुठे? आज बोलेल त्याचा एरंड खपतो, अशी परिस्थिती आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेेस हे सतत बोलत आहेत. काँग्रेसचे नेते आहेत कुठे? कोणावर विश्वास टाकून महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता द्यायची, हा प्रश्न आहे. अशोक चव्हाणांना नांदेडच्या पलीकडे कोणी ओळखत नाही आणि ऐकत नाही. लोकसभेत त्यांना पाठवायची पक्षाची तयारी असताना अगोदरच मला दिल्लीच्या राजकारणात रस नाही सांगून, त्यांनी आता माघारीची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे अशा भरकटलेल्या अवस्थेत अशोक चव्हाणांचे नेतृत्व कोणी मान्यच करू शकत नाही. पण, कोणीतरी नगाला नग हवा म्हणून पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलेले आहे इतकेच. अशोक चव्हाणांकडे हे पद सोपवून काँग्रेसने महाराष्ट्रातील काँग्रेस बुडीत काढली, असेच म्हणावे लागेल.त्यामुळे मध्य प्रदेश राजस्थानची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करायची झाल्यास, काँग्रेसला खमका नेता दाखवावा लागेल. आज जनता बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल, असे म्हणत असताना काँग्रेसकडे दाखवायला कोणता चेहरा आहे? पृथ्वीराज चव्हाण हे दुसरे नाव काँग्रेसकडे असू शकते. पण, त्यांना आपल्या मतदारसंघातून निवडून येताना किती कसरत करावी लागली आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्या मतदारसंघातील गटबाजी त्यांना अजून शांत करता आलेली नाही. विलासराव पाटील-उंडाळकरांना पक्षात परत आणले गेले असले, तरी ते गप्प बसतील, असे नाही. पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीत पाठवण्यास महाराष्ट्रातील काँग्रेस उत्सुक आहे, पण सोनिया गांधींनी तेही नेतृत्व अपघाताने महाराष्ट्रावर लादले असेच महाराष्ट्र आजही मानतो. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे पिढय़ान्पिढय़ा काँग्रेसच्या निष्ठेतील घराणेशाहीच्या जोरावर मुख्यमंत्री झालेले असले, तरी आज इथल्या जनतेला अनुकंपा तत्त्वावरील मुख्यमंत्री नको आहे, तर खंबीर नेतृत्वगुण असलेला नेता पाहिजे. नेमकी हीच कमतरता काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रात असुनी नाथ मी अनाथ, अशी झालेली आहे. या पोरक्या काँग्रेसची पुनर्रचना करण्याशिवाय महाराष्ट्रात काँग्रेसला काहीही करता येणार नाही. सुशीलकुमार शिंदे हे एक काँग्रेसकडे नाव आहे. पण, त्यांचे वय आणि कार्यक्षमता पाहता, त्यांना आता ही कामगिरी झेपणार नाही. आजूबाजूला अन्य पक्षांचे तोफखाने परतवून लावण्याची ताकद त्यांच्यात नाही. राधाकृष्ण विखे-पाटील हे विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नेमकी काय कामगिरी करतात, हा प्रश्नच आहे. किंबहुना कित्येकवेळा ते भाजपच्या बाजूने बोलतात की काय, असाच भास होतो. त्यामुळे राज्यात नेतृत्वहीन असलेली काँग्रेस कोणताही चमत्कार करू शकणार नाही.
बुधवार, १२ डिसेंबर, २०१८
महाराष्ट्रात काँग्रेस नेतृत्वहीनच!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा