महाराष्टÑातील थोर शिवभक्त असल्याचे भासवून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा ठेका घेतलेल्या विनायक मेटे यांनी शिवभक्तांची घोर फसवणूक करण्याचा धंदा सध्या चालवला असल्याचे दिसते. त्यामुळे समुद्रातील खडकावर भूमिपूजनाची नाटके कशासाठी चालवली जात आहेत आणि निवडणुका जवळ आल्यावरच महाराजांची आणि त्यांच्या स्मारकाची आठवण का येते हे न सुटलेले कोडे आहे. विनायक मेटेंनी असले गलिच्छ राजकारण न करता आणि शिवभक्तांची फसवणूक न करता स्मारकाबाबत नेमकी काय भूमिका आहे ते स्पष्ट करण्याची गरज आहे. मेटे यांच्याकडून शिवस्मारकाचे जे सध्या गलिच्छ राजकारण केले जात आणि भूमिपूजनाचा जो आटापिटा केला जात आहे तो प्रकार अत्यंत संतापजनक आहे. मेटे यांच्याकडून मराठी माणसाची आणि शिवभक्ताची फसवणूक होत आहे. हे असले प्रकार मेटेंनी बंद केले पाहिजेत. वास्तविक अत्यंत गाजावाजा करत पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आले होते. एकदा जलपूजन केल्यावर पुन्हा भूमिपूजन कसले? वास्तविक समुद्रातील एका खडकावर शिवस्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक समुद्रात होत असल्याने त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झाले, हे सर्वांना मान्य आहे. समुद्रात जमीन नाही, तर खडकावर स्मारक उभारले जाणार असताना केवळ मेटेंकडून या भूमिपूजनाचा अट्टाहास असण्याचे नेमके कारण काय? या प्रश्नाचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. मेटेंची कृती अनाकलनीय आहे. मेटेंनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या नावाखाली माकडचाळे चालवले आहेत काय? पंतप्रधानांनी एकदा जलपूजन केल्यानंतर पुन्हा भूमिपूजन करण्याचा मेटेंचा अट्टाहास का आणि सरकारही याकडे दुर्लक्ष का करते याचीही उत्तर मिळणे गरजेचे आहे. फक्त आम्ही शिवस्मारक बांधणार आहोत, त्याची तयारी करत आहोत, त्याचे भूमिपूजन करत आहोत एवढे दाखवून काम काही पुढे सरकत नाही. त्यामुळे शिवस्मारकाचे राजकारण करून फक्त स्वत:ची तुमडी भरण्याचे उद्योग केले जात आहे हेच यातून दिसत आहे. शिवप्रेमींचा महाराष्टÑ हे कधीही खपवून घेणार नाही. या जलपूजन आणि दोनदा भूमिपूजनाचे फार्स झाल्यानंतरही अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामास सुरवात झालेली नाही. त्यातच या स्मारकाच्या खर्चात जीएसटीमुळे एक हजार कोटींची वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे काय चालले आहे तेच समजत नाही. दोन वर्षांपूर्वी या स्मारकासाठी नेमण्यात आलेल्या व्यवस्थापन सल्लागार कंपनीने २ हजार ६९२ कोटी ४० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र आता या स्मारकाचा खर्च वाढल्याने ३ हजार ६४३ कोटी ७८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रसासन विभागाने जारीही केला आहे. फक्त अंदाजपत्रकात बदल करायचे आणि प्रत्यक्षात कामाला सुरूवात होतच नाही. या राजकारणात शिवभक्त मराठी माणसांची घोर फसवणूक होताना दिसते आहे. हा प्रकार तातडीने थांबवून शिवस्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले पाहिजे. वास्तविक १४ जून १९९६ पासून विचाराधीन असलेल्या शिवस्मारकाच्या या प्रस्तावाला २२ जानेवारी १९९७ ला तत्त्वत: स्वीकृती मिळाली. २ फेब्रुवारी २००५ रोजी गोरेगावऐवजी हे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन एप्रिल २०१६ रोजी या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. इजिस इंडिया या कंपनीची नेमणूक करण्यात आली. शिवस्मारकासाठी या सल्लागाराने एकूण २ हजार ६९२ कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयानुसार पाच वर्षांच्या कालावधीत कामासाठी ३ हजार ७०० कोटी ४८ लाख रुपयांना मान्यता देण्यात आली. शिवस्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ डिसेंबर २०१६ रोजी जलपूजन केले होते. त्यानंतर दोन वर्षात काहीच घडले नाही. एक वीटही रचली गेली नाही. त्यानंतर दोनच महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भूमिपूजनाचे आयोजन केले होते. त्या वेळी स्मारकाच्या ठिकाणी जाताना एक बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एका युवकाचा हकनाक बळी गेला होता. या अपघाताची पोलिसांकडून अद्याप चौकशी सुरू असताना मेटे यांनी गुरूवारी पुन्हा भूमिपूजन केले. हा काय पोरखेळ आहे. फक्त जलपूजन, भूमीपूजन या पलिकडे स्मारकाचा विषय सरकत नाही. शिवस्मारकाच्या कामाला सुरवात झालेली नाही. फक्त कागदोपत्री खेळ चालला आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे की नाही? शिवस्मारकाच्या मागून ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ या सरदार पटेलांच्या पुतळ्याची घोषणा झाली आणि अल्पावधीत ते काम पूर्णही झाले. मग आमच्या महाराजांच्या स्मारकाबाबत हे कसले गलिच्छ राजकारण चालवले आहे? सरकारही शिवस्मारक आणि आंबेडकर स्मारकाकडे गांभिर्याने पाहात नसल्याचेच दिसून येते. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष या नात्याने विनायक मेटे यांनी याबाबत ठोस भूमिका घेण्याऐवजी स्वत:ला मिरवत वारंवार भूमिपूजनाचा घाट घातला जात आहे. हा प्रकार निश्चित निंदनीय आहे. मेटे यांच्या अट्टाहासामुळेच दोन महिन्यांपूर्वीच्या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी एक बळी गेला. त्यानंतर मेटे यांच्यावर चौफेर टीका झाली. तरीही पुन्हा पुन्हा भूमिपूजनाची नौटंकी करण्याचा त्यांची हौस भागत नाही, असेच दिसते. हा खरे तर निर्लज्जपणाचा कळस आहे. शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजनच वारंवार होत राहणार का, खरेच शिवस्मारकाच्या कामाला सुरूवात होणार असा सवाल आज शिवप्रेमी विचारत आहेत. शिवभक्तांची फसवणूक करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम विनायक मेटे करणार असतील, तर शिवाजी महाराजांचा हा अपमान मराठी माणूस कधीच सहन करणार नाही.
शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८
शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची नौटंकी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा