मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

बाजारात तुरी

मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने केले. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद होता. नको इतके राजकारण करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यातून आपली किंमत कमी करून घेतली. भाजपला डावलून घाईघाईने हे भूमिपूजन केले. पण त्यांनी काय म्हणून हे भूमिपूजन केले आणि कशासाठी केले हे यातून प्रश्न निर्माण झालेले आहेत. तसेच हे भूमिपूजन करण्याचा त्यांचा अधिकार नेमका का आणि त्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर येऊन अट्टहास का हे प्रश्न मुंबईकरांना पडले आहेत.या कोस्टल रोडचे भूमिपूजन १८ डिसेंबरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन केवळ श्रेयवादासाठी ही सवंग लोकप्रियतेची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. अशा पद्धतीने भूमिपूजन करण्याचा प्रकार म्हणजे बाजारात तुरी अन् भट भटीणीला मारी या प्रकारचा नमुना आहे, तो शिवसेनेने केला आणि आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवले. प्रत्यक्षात कोस्टल रोडच्या विविध टप्प्यांसाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार प्रकल्पाचा अंतिम आराखडा ठरवण्यात येणार आहे. एमएमआरडीए मुंबईत मेट्रोचे जाळे उभारणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: लक्ष घालत आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी मेट्रो भाजपसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. दुसरीकडे या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मुंबई महापालिका बांधत असलेला कोस्टल रोड शिवसेनेसाठी हुकमी एक्का ठरू शकतो, यासाठी ही चढाओढ आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचे श्रेय कोण घेणार, यावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पण हे भूमिपूजन राज्य सरकारला टाळून करण्याचे काम महापालिका आणि उद्धव ठाकरे यांनी केले हे अत्यंत चुकीचे आणि हास्यास्पद आहेच, पण ते शिष्टाचाराला सोडून असेच होते. अर्थात शिष्टाचार माहिती असणा-याकडून याची अपेक्षा करायची असते हा भाग वेगळा. जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख हे कोणतीही निवडणूक लढत नाहीत आणि एखाद्या सभागृहात जात नाहीत किंवा जनतेतून निवडून येणारे पद मिळवत नाहीत, तोपर्यंत त्यांना हा शिष्टाचार समजणारही नाही.वास्तविक कोस्टल रोडला केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळवून देण्यात मुख्यमंत्र्यांचे मोठे योगदान आहे, असा भाजपचा दावा आहे, तर हा प्रकल्प शिवसेनेचा असल्याने उद्धव ठाकरेंच्या हस्तेच भूमिपूजन व्हायला हवे, असा आग्रह शिवसेनेचा होता. पण हा जर शिवसेनेचा प्रकल्प असेल, तर त्याचा खर्च शिवसेना करणार आहे का, असा भाबडा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. घरातील सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे कोणत्याही जनतेतून निवडून आलेल्या सरकारी पदाधिका-याला विचारात न घेता फक्त ठाकरे कुटुंबीयांनी हे भूमिपूजन करायचे म्हणजे अतिच झाले असे म्हणावे लागेल. हा प्रकार म्हणजे शिवसेना नेत्यांनी आपलीच आरती आपणच करण्याचा प्रकार आहे. हा प्रकल्प शिवसेनेचा आहे, असा दावा शिवसेना कसा काय करते हे न समजणारे आहे. कारण याला लागणारा पैसा शिवसेना नेमका कुठून उभा करणार आहे? शिवसेना स्वत:चा पक्षनिधी वापरून बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्त्वावर बांधणार आहे का? यासाठी महापालिका खर्च करणार असेल, तर तो जनतेचा पैसा आहे, शिवसेनेचा नाही. त्यामुळे शिवसेनेचा हा प्रकल्प कसा काय म्हणता येईल. एखादी कल्पना मांडणे म्हणजे त्या प्रकल्पाची मालकी कशी काय होऊ शकते? कित्येक सामान्य नागरिकही वाचक पत्रातून चांगले चांगले सल्ले, प्रस्ताव, कल्पना मांडत असतात. त्या कल्पना कधी कधी प्रत्यक्षात येतात म्हणून त्याचा मालकी हक्क, श्रेय हे त्या सामान्य माणसांना कोणी देते का?शिवसेनेने गेल्या साडेचार वर्षात काहीही केलेले नाही, सगळय़ा निवडणुकांमध्ये अपयश आलेले आहे, महापालिका निवडणूकही काठावर पास अशा अवस्थेत आहे. त्या तुलनेत भाजपने चांगलीच प्रगती केली आहे. त्यामुळे शिवसेनेचा तिळपापड होतो आहे. कोणत्या तोंडाने आपण मतदारांना सामोरे जायचे हा प्रश्न आहे. केवळ सरकारवर टीका करून आणि बेछूट आरोप करून आपल्याला कोणी जवळ करणार नाही, याची खात्री सेनेला असल्यामुळे त्यांनी ही कोस्टल रोड भूमिपूजनाची घाई केली. पण त्यातच स्वत:चे हसे करून घेतले. कोस्टल रोडचे राजकारण करायचे आणि दिवस काढायचे हा शिवसेनेचा डाव आहे. अजून त्यासाठी निधी तरी आलेला आहे का, हेही ते सांगू शकत नाहीत. त्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे हेही ते लपवून ठेवत आहेत आणि हा शिवसेनेचा कोस्टल रोड आहे, असे सांगून राजकारण करत आहेत. हा रोड बांधून झाल्यावर या रस्त्याला नाव कोणाचे द्यायचे यावरून राजकारण असेल, यात शंकाच नाही. फक्त चर्चेत राहण्यासाठी या कोस्टल रोडला नंतर अमूक यांचे नाव द्या, तमूक यांचे नाव द्या, असे राजकारण करून दिवस काढायचा डाव शिवसेनेचा आहे.लोकसभा निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे भूमिपूजन करायचे या हेतूने राज्य सरकारला डावलून परस्पर हे भूमिपूजन शिवसेनेने केले. पण त्यात विकासकामांपेक्षा राजकारणच जास्त दिसते आहे. त्यामुळे शिवसेनेचे हे भूमिपूजन हास्यास्पद ठरले. यामागचे सत्य कारण वेगळेच आहे. उद्धव ठाकरे हे वैधानिक पदावर नाहीत. पालिकेच्या कोणत्याही सोहळ्यात ते सर्वात शेवटी भाषण करतात; मात्र पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री कार्यक्रमाला असल्यास राजकीय शिष्टाचारामुळे ठाकरे यांना मानाची जागा मिळण्यास अडचण होते. त्यामुळे आपल्याला बोलायची संधी मिळणार नाही, यासाठी घाईघाईने हे भूमिपूजन केले. पण म्हणूनच मुंबईकर विचारत आहेत की काय म्हणून हे भूमिपूजन शिवसेनेने केले?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: