मराठी चित्रपट हा सध्या सर्वभाषिक निर्माते आणि बॉलिवूडलाही आव्हान देतो आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांची निर्मिती मोठय़ा संख्येने होते आहे. त्यात केवळ अनुदान मिळते म्हणून काढणारे अल्पसंतुष्ट दिखाऊ बाजाचे काही चित्रपट असतात, पण कलात्मक आणि दर्जेदार चित्रपटांची संख्याही खूपच आहे. वेगळे विषय घेऊन येणारे चित्रपट ही मराठीची ताकद असल्यामुळेच बॉलिवूडमध्ये स्थिरावलेले अक्षयकुमारसारखे अनेकजण मराठी चित्रपटाच्या निर्मितीतही उत्साह दाखवू लागले आहेत हे २०१८ या वर्षाने दाखवले. अर्थात भारतीय चित्रपटसृष्टीचा पायाच जिथे मराठी माणसांनी घातला आहे तिथे मराठी चित्रपट एका उंचीवर पोहोचेल यात शंकाच नाही. बॉलिवूडवर साम्राज्य हे पूर्वीपासून मराठी माणसांचेच होते हे विसरून कसे चालेल? या मराठी मुंबईने तर बॉलिवूडला जगवले. म्हणूनच २०१८ मध्ये मराठी चित्रपटांची निर्मिती ५० पेक्षा अधिक झाली असल्यास नवल नाही.या पन्नास चित्रपटांतील किमान निम्मे चित्रपट हे चांगले आणि वेगळे या गटात मोडणारे होते हे कबूल करावेच लागेल. म्हणूनच या वर्षात कोणते वेगळे आणि लक्षात राहतील, असे चित्रपट आले यावर नजर टाकावी लागेल. २०१९ मध्ये प्रवेश करताना २०१८ च्या आठवणी बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे. त्यातील काही चित्रपटांबद्दल आता बोलूया.या वर्षी मराठी मुलगी अशी ओळख असलेली आणि बॉलिवूडमध्ये लेडी सुपरस्टार पदापर्यंत गेलेली धकधक गर्ल माधुरी दीक्षितने मराठी चित्रपटात पदार्पण केले ही एक आनंदाची बाब होती. ‘बकेट लिस्ट’ नावाने आवडला म्हणून ही भूमिका स्वीकारली असे सांगून माधुरीने हा चित्रपट केला. या चित्रपटाला व्यावसायिक यश किती मिळाले हा भाग वेगळा असला तरी वेगळा विषय घेऊन माधुरी आली. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील अपु-या गोष्टींची पूर्तता करण्याची इच्छा देऊन ही बकेट लिस्ट गेली. बॉलिवूडमध्ये घोडे, गाडय़ा, मोटरसायकल उडवणारी माधुरी या चित्रपटात सायकलवर दिसली. पण हलका-फुलका चित्रपट देऊन २०१८ मध्ये या चित्रपटाने लक्ष वेधले हे नक्की.या वर्षीच्या उत्तरार्धात आलेला आणि दिवाळीनंतर साधारण महिनाभर धुमाकूळ घातलेला चित्रपट म्हणजे ..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. १९६०-७०च्या दशकात आपल्या रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा आणि चित्रपटातही नावलौकिक मिळवलेला अभिनेता म्हणजे काशिनाथ घाणेकर. त्याचे दिसणे, हसणे, असणे हे सगळेच अफलातून. एन्ट्रीला टाळी घेणारा नट अशी ख्याती मिळवलेला मराठीतील पहिला सुपरस्टार अशी त्यांची ख्याती. पण अहंकार आणि दारूच्या नादाने सर्वस्व धुळीला मिळवलेल्या एका अभिनेत्याची शोकांतिका चित्रपटातून मांडून मराठी रंगभूमीचा आणि चित्रपटसृष्टीचा इतिहासच या चित्रपटातून जिवंत करण्याचे काम निर्माता-दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी केले, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल. यातील काशिनाथ घाणेकर यांची भूमिका सुबोध भावेने जिवंत केलीच, पण तेवढय़ाच ताकदीने सुलोचना-सोनाली कुलकर्णी, डॉ. श्रीराम लागू-सुमीत राघवन आणि प्रभाकर पणशीकर-प्रसाद ओक यांनी आपल्या भूमिका केल्या. मोहन जोशींचा भालजी पेंढारकर, नंदिता धुरीची इरावती या भूमिकाही लक्षवेधी आहेत. त्यामुळेच संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांवर पकड घेतो. जुन्या पिढीला पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो, तर नव्या पिढीला इतिहास समजतो. आपल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलाकारांची ताकद यातून दिसून येते. त्याचप्रमाणे अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू ही नाटके आणि तत्कालीन चित्रपट पाहण्याची इच्छा या चित्रपटाने निर्माण केली हे या चित्रपटाचे यश म्हणावे लागेल.ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला एक चित्रपट या वर्षात गाजला तो म्हणजे र्फजद. दिगपाल लांजेकर या नवोदित निर्माता-दिग्दर्शकाने आणलेला हा भव्य-दिव्य चित्रपट. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास चित्रपटातून पाहणे सगळय़ांनाच आवडतो. पण तितकाच पराक्रम राजांच्या मावळय़ांचाही पाहायला आवडतो. कोंडाजी र्फजद हा असाच पराक्रमी मावळा. राजांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी केलेला अफलातून पराक्रम करणारा मावळा. मूठभर मावळे घेऊन मराठी ताकद दाखवणारा लढवय्या योद्धा म्हणजे कोंडाजी र्फजद. तंत्रज्ञ आणि छायाचित्रणाचा योग्य वापर करून निर्माण केलेली सुरेख निर्मिती म्हणून या ऐतिहासिक चित्रपटाकडे पाहावे लागेल. आजवर अनेकांनी छत्रपतींची भूमिका साकारली. पण या चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेले छत्रपती शिवराय आणि मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या राजमाता जिजाऊ या व्यक्तिरेखांबरोबर आपल्या अभिनयाचे पैलू दाखवणा-या प्रसाद ओक यांनी यात बहिर्जी नाईक ही भूमिका साकारली आहे, ती लक्षवेधी ठरते. पण चित्रपटाचा नायक असलेला र्फजद साकारणारा तगडा अंकित मोहन हा त्याच्या पिळदार शरीरयष्टीसह अभिनयानेही लक्षात राहतो. मराठीतील बाहुबली अशीच प्रतिमा या चित्रपटातून त्याने निर्माण केली आहे.या वर्षी गाजलेल्या आणखी एका चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे सविता दामोदर परांजपे या चित्रपटाचा. रिमा लागू यांच्या कसदार अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राने १९८०चे दशक या नाटकातून दणाणून सोडले होते. त्या नाटकावर चित्रपट काढणे हे तसे आव्हानच होते; परंतु दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी हे आव्हान पेलले. आपली खूप दिवसांपासून मनात असलेली ही इच्छा त्यांनी पूर्ण केली. यातील भूमिकांना सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश वशिष्ठ यांनी न्याय दिला आणि हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवले. सत्य घटनेवर असलेल्या शेखर ताम्हाणे लिखित नाटकाचे रुपेरी पडद्यावर झालेले पदार्पण, असे याचे वर्णन करावे लागेल. या चित्रपटानंतर या नाटकाच्या यू टय़ूबवरून पाहणा-या प्रेक्षकांची संख्या वाढली हे याचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.या वर्षीचा सुंदर चित्रपट असे वर्णन करावे लागेल, असा चित्रपट म्हणजे पिप्सी. लँडमार्क फिल्मस प्रेझेंटसने पिप्सी नावाचा एक अतिशय संवेदनशील भावनाप्रधान चित्रपट आणला आहे. बालकलाकारांचा सहजसुंदर मजबूत परिपक्व अभिनयासह चांगले संवाद, कथाबांधणी यामुळे हा चित्रपट लक्षात राहतो. बालकांचे निरागस मन आणि आसपासच्या घटनांमुळे येणारी जबाबदारी या कचाटय़ात त्यांचा कसा कोंडमारा होत असतो हे अत्यंत सोपे करून हा चित्रपट सांगतो. नापिकी, दुष्काळी गावातील पार्श्वभूमीवर कटाक्ष टाकतानाच गरीब कुटुंबातील बालकांची काय अवस्था आहे हे यातून ठळकपणे दाखवून दिले आहे. दारिद्रय़ आणि रोगराई ही भावंडच असतात. त्यांचे वास्तव्य एखाद्या घरात असले, तर बाकीच्यांची मानसिकता कशी असते याचे स्पष्ट चित्रीकरण यात दिसतेच. पण आपली आई तीन महिनेच जगणे शक्य आहे हे समजल्यामुळे अस्वस्थ झालेली ७ ते ८ वर्षाची चानी आपल्या वर्गमित्राबरोबर हे दु:ख शेअर करताना काय काय प्रयत्न करते याचे सुरेख बांधेसूद कथानक म्हणजे हा चित्रपट. बालसुलभतेने असणारा खोडकरपणा, जबाबदारीचे ओझे आणि संकटांमुळे अंगात येणारे धैर्य याचे भाव प्रकट करताना चानी या भूमिकेतून मैथिली पटवर्धनने जो अभिनय केला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे. तिच्या मित्राची भूमिका करणारा बाळू साहिल जोशी या बालकलाकाराने तेवढय़ाच ताकदीने उभा केला आहे. सौरभ भावे यांनी कथा, पटकथा आणि संवाद यावर मेहनत घेतल्याचे आणि ते वास्तवाशी भान राखतील याचा चांगला अभ्यास केल्याचे या चित्रपटातून दिसून येते. विधी केसलीवाल यांनी या अवघड विषयाची निर्मिती केली असून रोहन देशपांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन चांगल्याप्रकारे केले आहे. या चित्रपटाचे छायाचित्रणही चांगले आहे. त्यासाठी निवडलेली ठिकाणे, तेथील बारकावे छान चित्रित केली आहेत. शहरापासून लांब असणा-या गावात घडणारी ही कथा फार सुंदर आहे. दुष्काळी गावातील बारकावे अत्यंत मार्मिकपणे या चित्रपटाने टिपलेले आहेत. खूप पंप मारूनही पाणी न येणे, टँकर, पिकांचे पंचनामे, त्यामागचा प्रशासकीय भ्रष्टाचार यावर प्रभावी कटाक्ष टाकताना कथेला कुठेही धक्का लागत नाही हे या चित्रपटाचे वैशिष्टय़. २०१८च्या उत्कृष्ट निर्मितीत या चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल.गीतकार, संगीतकार आणि लेखक असलेल्या स्वानंद किरकिरे यांची प्रमुख भूमिका असलेला आणि अक्षयकुमार प्रस्तुत असलेला मराठी चित्रपट म्हणून ‘चुंबक’ या चित्रपटाबाबत प्रचंड आकर्षण होते. पण ज्या प्रमाणात या चित्रपटाची जाहिरात झाली त्या प्रमाणात हा चित्रपट प्रभाव टाकू शकत नाही. याचे कारण गुन्हेगारी जगताचा विस्कळीत आणि सुमार परिचय करून देताना हा चित्रपट अनेक त्रुटी ठेवून झालेला जाणवतो. ही संकलनाची चूक आहे की दिग्दर्शकाची हे अनाकलनीय असे आहे, पण अनेक प्रश्न अर्धवट ठेऊन जातात. २०१८ च्या सुमार चित्रपटात याची गणना झाली. बाळू हा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये फडका मारणारा पो-या. त्याला गावात उसाच्या रसाचे गुऱ्हाळ टाकायचे आहे. म्हणून पैसे मिळवण्यासाठी मुंबईत तो हे काम करतो आहे. गावातल्या मामा म्हणजे एजंटला त्याने पैसे देण्याचा वायदा केलेला आहे. त्यासाठी काही करून तो पैसे मिळवण्याचा प्रयत्न करायचे ठरवतो. त्यासाठी गुन्हेगारी जगताच्या जवळ पोहोचतो. मग आपण रोज ज्या गुन्हेगारी जगतातील बातम्या वर्तमानपत्रांतून वाचतो त्या गुन्ह्यांची एक अर्धवट मालिका लावण्याचा यात प्रकार केलेला आहे. एसएमएस किंवा ईमेलवरून तुम्हाला लॉटरी लागली आहे, त्यामुळे लाखो रुपये मिळतील, ते डॉलरच्या स्वरूपात असल्यामुळे कन्व्हर्ट करण्यासाठी पैसे भरा वगैरे, तर अशाच प्रकारे प्रसन्न ठोंबरे नावाच्या एका सामान्य माणसाला फोनवरून गंडवण्याचा प्रयत्न हा बाळू त्याच्या मित्राच्या मदतीने करतो. त्यात तो अडकत जातो आणि त्यातून सुटण्यासाठी नवा गुन्हा करायचा. पण आपण करतो आहे ती चूक आहे हे समजल्यामुळे पुन्हा ती चूक सुधारताना आणखी अडचणीत सापडणे. हा काहीसा कथाभाग आहे. पण कथेचे सुसूत्रीकरण नसल्यामुळे आणि अनेक गोष्टी अर्धवट टाकून देण्यामुळे हा चित्रपट अर्धवट अर्धवट वाटतो. पटकथा लिहिताना राहिलेल्या त्रुटी आणि गुन्हेगारी जगताचे चित्र उभे करताना पुरेसा अभ्यास नसल्यामुळे अनेक अतार्किक संवाद आणि विसंगत प्रसंग समोर येतात. त्यामुळे मुंबईतील गुन्हेगारी जगत इतके बावळट आहे का, असा प्रश्न समोर आल्याशिवाय राहात नाही. अक्षयकुमारचे नाव जोडले म्हणून आणि स्वानंद किरकिरे यांचा अभिनय या जमेच्या बाजूसाठी हा चित्रपट पाहणे एवढेच यात आहे. इतक्या केविलवाण्या त्रुटी या चित्रपटात आहेत की, कधी कधी त्या हास्यास्पद वाटतात. पण हा एक चित्रपट या वर्षात येऊन गेला एवढेच त्याचे वर्णन करावे लागेल.याशिवाय या वर्षातील उल्लेखनीय चित्रपटांमध्ये असेही एकदा व्हावे, न्यूड, शिकारी या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. कास्टिंग काऊच आणि मी टू याने हे वर्ष गाजलेले असताना चित्रपटसृष्टीला बदनाम करणारे शिकारी किती भयानक आहेत याचे वास्तव चित्रण करणारा चित्रपट म्हणून शिकारीचा उल्लेख करावा लागेल. विनोदी ढंगाने जाणारा पण संवेदनशील असा हा चित्रपट होता. ठाण्यातील दिग्दर्शक विजू माने याने यावर चांगले परिश्रम घेतलेले दिसून येतात.याशिवाय मस्का, झिप-या, नाळ, मुळशी पॅटर्न हे चित्रपट या वर्षात गाजले. पण अखेरच्या टप्प्यात लक्ष वेधून घेतले ते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या सहजसुंदर अभिनयाच्या मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाने. या चित्रपटाचा हा तिसरा भाग चढत्या क्रमाने प्रेक्षकांना आवडत गेला हे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.एकंदरीत भरपूर चित्रपट मराठी सृष्टीने या वर्षी दिले असले तरी त्यातील काही चित्रपटांचाच इथे उल्लेख केलेला आहे. पण मराठी चित्रपट ताकदीने आणि मोठय़ा संख्येने निर्माण होतो आहे हे २०१८ या वर्षाने दाखवले आहे.