मुंबईतल्या भांडुपमध्ये दोन दिवसांपूर्वी एका २४ वर्षाच्या मुलाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. वैभव केसरकर असे या मुलाचे नाव होते. क्रिकेट खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्या अगोदर काही दिवसांपूर्वी सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच खेळताना एकाचा असाच मृत्यू झाला होता. मुंबईत महिनाभरात घडलेल्या या तिस-या घटनेने तरुण वयात हृदयविकाराने मृत्यू होण्यास बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. कामाचा अतिताण तसेच वाढत चाललेले फास्ट फूड कल्चर, जेवणाच्या अनियमित वेळा, अनियमित व्यायाम यामुळे तरुणवयात हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण हे जास्त असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. ही बदलत्या जीवनशैलीची चिंतेची बाब म्हणावी लागेल. तरुण वयातच जर निरोगी राहायचे असेल, तर नियमित व्यायाम, पोषक आहार आणि ताणविरहित आनंदी राहणीमान या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पण, आज मुंबईकरच नाही, तर प्रत्येक माणूस तणावाखाली जगतो आहे. या तणावाचा स्फोट होऊन हृदयविकाराला त्याला सामोरे जावे लागत असावे असे दिसते आहे.त्यामुळे तणावमुक्त जीवन जगणे हाच या समस्येवर उपाय आहे. त्यासाठी समाधान, शांतता आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. कुठेतरी समाधानी असणे हे फार महत्त्वाचे आहे. महत्त्वाकांक्षा आणि ईर्षा, स्पर्धा आणि करिअर यामध्ये अवास्तव अपेक्षा आणि अपेक्षाभंगाची वेळ येऊ नये म्हणून अतिमेहनत आणि त्या मेहनतीचा ताण मनावर असणे हे प्रकार वाढले आहेत. यावरून सर्वात जास्त तणावाखाली तरुण पिढी आणि विद्यार्थीवर्ग आहे, हेच दिसून येते. या तणावातून त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. कालच्या घटनेत डॉक्टरांनी ईसीजी काढताच, वैभवला कार्डियाक अॅटॅक आल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वीच विद्याविहार येथे सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच करत असताना जीबीन सनी या तरुणाचा मृत्यू झाला होता. कांदिवलीत एका तेरा वर्षाच्या मुलीचा नृत्य करताना अशाप्रकारे मृत्यू झाला होता. मुंबईत महिनाभरात अशा प्रकारे हार्टअॅटॅकमुळे विद्यार्थीदशेतील तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. स्पर्धेच्या या युगात आपली मुलं कशी जपली पाहिजेत आणि त्यांच्यावर किती ताण-तणाव ठेवायचा, याचा विचार पालकवर्गालाही आता करावा लागेल. आपल्याला जिंकायचे आहे, आपल्याला पुढे जायचे आहे, इतरांच्या पुढे जाऊन काहीतरी मिळवायचे आहे, या नादात मानसिक ताण-तणावाखाली युवापिढी, विद्यार्थीवर्ग जगताना दिसत आहे. अमूक इतके टक्के मार्क मिळालेच पाहिजेत, अभ्यासेतर काही गुण त्याने मिळवले पाहिजेत. स्पर्धा परीक्षांमध्ये त्याने यशस्वी झाले पाहिजे. अशी पालकांची अपेक्षा असते. प्रत्येक पालकाला आपला मुलगा सचिन तेंडुलकर व्हावा, लता मंगेशकर व्हावी, अमिताभ बच्चन व्हावा, आपल्या करिअरमध्ये त्याने मोठे व्हावे असे वाटत असते.पण, अगोदर तो निरोगी आणि चांगला नागरिक झाला पाहिजे, यासाठी पालकांचे प्रयत्न असले पाहिजेत. त्याच्या खाण्याच्या, आहाराच्या सवयी, खेळ, व्यायाम आणि झोपेच्या सवयी योग्य आहेत की नाही हे पाहिले पाहिजे. किती खातो यापेक्षा काय खातो याला महत्त्व आहे. सकस आणि चांगले अन्न पोटात न जाता कोलेस्ट्रॉल वाढवणारे जंक फूट पोटात जात असेल, तर योग्य ऊर्जा येणार कशी आणि प्रतिकारशक्ती वाढणार कशी? चौरस आहाराऐवजी फक्त वडापाववर आमचे जेवण आणि नाष्टा होत असेल, कुरकुरे आणि वेफर्ससारखे तत्सम तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ले जात असतील, तर जीभ सोकावेल पण, शरीर कमकुवत होईल. अशा परिस्थितीत आव्हाने पेलण्यास तरुणाई सक्षम असणार नाही. आव्हाने पेलण्याची शक्ती संपते, तेव्हा तणाव निर्माण होतो. या तणावातून व्यसनाधीनता वाढते किंवा मानसिक दुर्बलता येते. हे दोन्ही झाले नाही, तर अशा विकारांना सामोरे जावे लागते. या दुष्टचक्रात युवापिढी आज अडकलेली दिसते. मुंबईचे जीवन गतिमान आहे. पण, ते आजच नाही, वर्षानुवर्षे आहे. मुंबईत स्पर्धा आहे. पण, ती आजच नाही सातत्याने त्यात वाढ होत आहे. अॅडजेस्टमेंटचे नाव मुंबई आहे. हे समजून जो जगतो तो तणावाशिवाय पुढे जातो. पण, मला सकाळची लोकल पकडायची आहे. त्या भरून आलेल्या लोकलमध्ये जीव गुदमरत घुसायचे आहे. जीव गुदमरत लटकत प्रवास करताना माझ्या स्टेशनवर ही गर्दी मला उतरून देईल का? अशा प्रकारची अनेक टेन्शन घेऊन तरुण पिढी विद्यार्थी शिकत आहेत. यात बदल होणार नाही. पण, आपल्याला सुधारता येईल का, याचा विचार करावा लागेल. ही धावपळ करत असताना आपल्या वेळेचे नियोजन आणि आहार, व्यायाम आणि विश्रांतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. या गडबडीत प्रत्येक गोष्टीसाठी अट्टहास करून चालणार नाही. तासनतास मोबाईलवर असू, चार तास टीव्ही बघत बसणार असू, तर त्यात वाया गेलेला वेळ अभ्यास आणि करिअरमध्ये बाधा आणणार, तो वेळ विश्रांतीतून कमी होणार. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम अशा विकारांमध्ये उद्भवणार यात शंकाच नाही.डॉक्टर आणि कुठलीही अद्ययावत यंत्रणा असली तरी तिथपर्यंत पोहोचायची वेळही आपल्याला नियती देत नसते. कारण, आपण इतके स्वत:ला बिझी बनवून घेत आहोत की, शरीराकडे दुर्लक्ष होताना दिसते. शरीर एक यंत्र आहे. त्याला नियमित यंत्राप्रमाणे तेलपाणी, सव्र्हिसिंग केले नाही, तर ते कधीही बंद पडू शकते. त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करून योग्य प्रकारे संतुलित आहार, व्यायाम आणि तणाव कमी करणारे उपाय योजणे गरजेचे आहे. त्यासाठी कुणाला संगीत ऐकून समाधान, आनंद मिळेल, तर कुणाला नामस्मरण, मेडिटेशनने मिळेल. पण, आपल्याला आनंद आणि समाधान मिळेल यासाठी काही साधना केली आणि थोडीशी विस्मरणाची सवय लागली, तर ताण कमी होऊन आपले आयुष्य निरोगी बनू शकते. हृदयविकाराचे वय कमी झाले आहे की, आम्ही तो लहानवयात आणतो आहोत याचा विचार करावा लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा