गेल्या काही दिवसांपासून भारतात घोंगावत असलेल्या ‘मी टू’ वादळात भाजपचे परराष्ट्र मंत्री एम. जे. अकबर यांचे नाव आल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. अमेरिकेतून आलेल्या या वादळात ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांना घेरले होते. त्यामुळे एम. जे. अकबर यांनी आपला राजीनामा सादर करावा, अशी मागणी जोर धरू लागली. एम. जे. अकबर हे परदेश दौ-यावर होते. ते शनिवारी परत येणार होते; परंतु हे आरोप सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने भारतात येण्यास सांगितले गेले होते. तातडीने गुरुवारी त्यांना येणे कदाचित शक्य झाले नसावे, त्यामुळे ते नियोजित दौ-याप्रमाणेच शनिवारी आले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार का, याबाबत साशंकता होती. शनिवारीच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी याबाबत तोंड उघडले होते आणि अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होईल, असे वक्तव्य केलेले होते. पण, चौकशीत भरपूर वेळ जात असतो. त्यामुळे काय कारवाई होणार, याकडे सर्वाचेच लक्ष होते; परंतु एम. जे. अकबर यांनी भारतात येताच ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे, असे वृत्त रविवारी सकाळी आले. अकबर यांनी राजीनामा दिला तर भारतीय जनता पक्षाची प्रतिमा पुन्हा एकदा स्वच्छ राहणार आहे.एम. जे. अकबर यांच्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. त्यानंतर पाठोपाठ अनेक मुलींनी आणि एका विदेशी महिला पत्रकारानेही अकबर यांनी आपले शोषण केल्याचा आरोप शनिवारी केला होता. त्यामुळे या ‘मी टू’ च्या प्रकरणाची अकबर यांच्याबाबतीत व्याप्ती वाढत चालली होती. तरीही शनिवारी त्यांच्यावर ठोस कारवाई होईल, असे कोणतेही संकेत भाजप अध्यक्षांनी दिलेले नव्हते.एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी दिली होती. पण, या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही पाहावे लागेल, असेही अमित शाह त्यावेळी म्हणाले होते. एम. जे. अकबर यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया होती.‘मी टू’ या मोहिमेंतर्गत एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. यानंतर परदेशात असणा-या अकबर यांना सरकारने ताबडतोब भारतात बोलावून घेतले. अकबर हे मीडिया संस्थांमध्ये संपादक म्हणून कार्यरत असताना, अनेक महिला पत्रकारांसोबत त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप केला गेला आहे. त्यामुळे या घटनेला महत्त्व होतेच. पण, त्याकडे महिलांना न्याय देण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाला कुठेतरी कमी दाखवण्याचा प्रकार करून काँग्रेसने त्याचे राजकारण सुरू केले. त्यामुळेच परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. पक्षाचे प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली होती. आता काँग्रेसमध्येही सगळे अगदी संत सज्जन असल्याचा आव आणत, त्या गोष्टीचे राजकारण केले गेले. वास्तविक या प्रकाराकडे एका पुरुषाने महिलेची केलेली छळवणूक म्हणून त्याकडे पाहायला हवे होते. कारण, अशा व्यक्ती कोणत्याही पक्षात असताच कामा नयेत. अकबर यांनी केलेले तथाकथित दुष्कृत्य हा काही भाजपचा अजंडा नव्हता. ते पक्षाचे धोरण नव्हते, तर अकबर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा तो भाग होता. त्यांनी खासगीत कुठे काय शेण खाल्ले, याचा संबंध पक्षाशी किंवा सरकारशी जोडण्याचे कारण नाही. तरीही अकबर यांनी ईमेलने राजीनामा पाठवला असे सांगण्यात आले. मात्र, अकबर यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ज्या महिलांनी तक्रारी केल्या, त्यांच्यावरच कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.आज समाजात मनाने दुष्ट असणा-या प्रवृत्ती उजळमाथ्याने वावरत आहेत. या पांढरपेशी प्रवृत्तीचा यानिमित्ताने पडदाफाश होत आहे हे विशेष. त्यादृष्टीने ही शुद्धिकरणाचीच चळवळ म्हणावी लागेल. आता तर जास्तीत जास्त महिलांनी पुढे आले पाहिजे. समाजात उजळ माथ्याने फिरणारे किती पुरुष धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत हे तरी समजेल. किमान आज केलेल्या लैंगिक छळ, शोषणाला दडपण्याचा प्रकार झाला, तरी भविष्यात कितीही दिवसांनी हे प्रकरण पुढे येऊ शकेल, या भीतीने तरी कोणाची छळवणूक करण्यापूर्वी अशा मानसिकतेचे पुरुष हजार वेळा विचार करतील. त्यामुळे हे एक प्रकारचे शुद्धिकरणच म्हणावे लागेल. ‘कामातुराणां न भयं न लज्जा’ अशी आपल्याकडे उक्ती आहे. पण, आता या कामुक पुरुषांना भय वाटेल, अशी ही मोहीम सुरू झाली आहे, हे फार चांगले झाले आहे. आज बहुतेक सर्वच क्षेत्रात थोडय़ा फार फरकाने हे प्रकार चालतात असे दिसते आहे. अगदी शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रही या वृत्तीने विटाळले आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षिका, शासकीय रुग्णालयातील परिचारिका यांना या दिव्यातून जावेच लागते, असे अनेकजण सांगतात. त्यांना अवघड जागी बदली करून इच्छित ठिकाणी काम मिळवण्यासाठी एक तर पैसा किंवा शारीरिक देवघेव असल्या प्रकारांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेक प्रकार घडत असतात. याबाबत जिल्हा परिषदांच्या शिक्षण सभापतींपासून फार मोठी चेन यात असते. कापरेरेट जगतात तर, हे प्रकार बिनधास्त चालतात. बीपीओ, आयटी इंडस्ट्रीज अशा सगळय़ा क्षेत्रात हे विष पसरले आहे. या विषाने महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वाईट बनवला जात आहे. शिकलेल्या मुली म्हणजे बिघडलेल्या, चालू आहेत, असे बिंबवणारे महाभागही आहेत. या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी ‘मी टू’चा हा रामबाण उपाय आहे. त्यावेळी भीतीपोटी तक्रार करायची राहून गेली असेल, पण मनाचा निर्धार झाल्यावर कालांतराने का होईना तक्रारीची सोय आहे. त्यामुळे हा ‘मी टू’चा मोहिमेचा भाग अबला ठरलेल्या महिलांना बळ देणारा असेल. त्यामुळेच अकबर ही भाजपची सध्या डोकेदुखी असली, तरी त्यांचा राजीनामा घेऊन आपल्या पक्षाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करू शकतो.
गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८
अकबरांच्या ‘मी टू’मुळे भाजपला डोकेदुखी Oc
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा