पुरुषांकडून होणा-या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लैंगिक छळाला सामोरे जावे लागलेल्या महिलांनी आपले अनुभव सार्वजनिक करण्याची आणि पुरुषांच्या सभ्यतेचा बुरखा फाडण्याची हिंमत ‘मी टू’ चळवळीमुळे अनेक महिला दाखवत आहेत. भारतासारख्या देशात हे अनुभव कथन निश्चितच अवघड आहे. कारण अशा प्रकरणात महिलेकडेच संशयाने पाहिले जाते. काही कालावधीनंतर असे आरोप केल्यामुळे तर त्या महिलेच्याच नैतिकतेबद्दल शंका घेतली जाते. महिलांकडून सुरू असलेले आरोप हे सगळेच खरे आहेत असे म्हणता येणार नसले तरी ते सुडबुद्धीने केले आहेत, असेही मानता येणार नाही. परंतु महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिला तडजोडीसाठी भाग पाडणा-या पुरुषी मानसिकतेच्या विरोधात महिला बोलू लागली आहे, हा पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या विरोधातील हुंकार मानायला हवा. ‘मी टू’ ही चळवळ वर्षभरापूर्वी सुरू झाली आणि महिलांमध्ये थोडीफार जागरूकता आली. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर केलेल्या आरोपानंतर तर संपूर्ण देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातून कृष्णकृत्ये करणारे चेहरे समाजासमोर काळवंडलेले आहेत. त्यामुळे समाजातील आक्रमक होत चाललेली ही चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे, तिचे स्वागत केले पाहिजे.त्याचप्रमाणे या चळवळीला थोडे प्रोत्साहन दिले तर पुरुषी मानसिकतेचा बुरखा फाटून समाजात उजळ माथ्याने हिंडणा-यांच्या मनात किती काळेबेरे आहे, हे लक्षात येईल. महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेणे किंवा त्यांच्याकडे फक्त वाईट हेतूने पाहणे, काम देण्यासाठी त्यांना त्या दिव्यातून बाहेर यावे लागणे हे फक्त चित्रपटसृष्टीतच घडते असा सर्वाचा समज होता. पण ‘मी टू’ या चळवळीने राजकारण, पत्रकारिता आणि अन्य क्षेत्रांतील पांढरपेशा लोकांचीही दुष्कृत्ये समोर येऊ लागली आहेत. छोटय़ा-मोठय़ा पडद्यावर दिसणारा सभ्य चेहरा म्हणजे आलोकनाथ. ‘बुनियाद’सारख्या मालिकेतून ३२ वर्षापूर्वी समोर आलेला हा चेहरा नंतर सुसंस्कृत आणि संस्कारी चेहरा म्हणून नावारूपाला आला. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या सुपरहिट ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’मधून तो अधिक लोकप्रिय झाला आणि महिलांचा आवडता कलाकार अशी त्याची ख्याती झाली. पण या सभ्यतेच्या बुरख्यामागची कुरुपता जेव्हा समोर आली तेव्हा याच संस्कारी अभिनेत्याची विकृत प्रतिमा जगाला दिसली. भारतीय जनता पक्ष हा संस्कार, सिद्धांत आणि सभ्यतेची भाषा करणारा पक्ष. पण त्यांच्याच पक्षाच्या सरकारमध्ये असलेले एक मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप होतो आणि त्यांचा बुरखा फाटतो तेव्हा समाजात उजळ माथ्याने वावरणारे किती काळ्या मनाचे आहेत याचे दर्शन घडते. आजवर अशा घटनांमुळे बदनामी होईल म्हणून मुली, महिला तक्रारी देण्यास पुढे येत नव्हत्या. पण यात तुमचा दोष नाही, तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे आणि तुमच्यावर झाला तसा अन्याय, अत्याचार, शोषण आणखी कोणाचे होऊ नये असे वाटत असेल तर महिलांनी ‘मी टू’ चळवळीत सामील होत अशा प्रसंगांना सामोरे गेलो आहोत हे सांगण्यासाठी पुढे आले पाहिजे. निर्भयपणे आणि न लाजता आपल्यावरील अन्यायाचे कथन महिलांनी बिनदिक्कतपणे केले पाहिजे.भारत हा एक सुसंस्कृत देश आहे, हे जगाने पाहिले आहे. फार मोठा इतिहास या देशाला आहे. पण या देशात जेव्हा रावण, दुयरेधन अशा प्रवृत्ती जागृत होतात तेव्हा सीता, द्रौपदी बनून न घाबरता महिलेने नवे महाभारत घडवण्यासाठी आणि या दुष्टांना शासन घडवण्यासाठी पुढे आले पाहिजे. नवरात्राच्या निमित्ताने महिला हा दुर्गावतार धारण करत आहेत हे फार महत्त्वाचे आहे. शुंभ-निशुभ, मधुकैटभ अथवा सुंद उपसुंद जेव्हा साक्षात शक्तीला आव्हान देऊ लागले तेव्हाच या शक्तीने दुर्गेचे, कालीचे रूप घेऊन त्यांना तुडवले, हा आपला पुराणातील दाखला आहे. त्यामुळे अन्यायी, अत्याचारी पुरुषांना धडा शिकवण्यासाठी महिलांनी आता दुर्गेचे रूप घेतलेच पाहिजे. अशा तक्रारी करताना आणखी कोणी लपून राहिले आहे काय, ते बाहेर आले पाहिजे. आज महाविद्यालयांतून प्राध्यापकवर्ग सहकारी महिला कर्मचारी अथवा विद्यार्थिनींकडे वाईट नजरेने पाहताना दिसतात, शालेय शिक्षकही आठवी-नववीतील मुलींशी अश्लील चाळे करू पाहतात. आपल्या पदाचा दुरुपयोग करून बॉस आपल्या सहकारी महिला कर्मचा-याचे शोषण करू पाहतो. यात कित्येक कळ्या कोमेजून जातात. कित्येक बरबाद होतात. कित्येक मुकाटपणे सहन करतात. पण आता या शोषणाविरोधात लढण्यासाठी कायदा आहे, त्याचा वापर करून महिलांनी आपल्यावर अन्याय होत असेल तर स्पष्ट भूमिका घेण्यात काहीही हरकत नाही.आजपर्यंत बदनामी आणि जग काय म्हणेल या भीतीने महिला पुढे येत नव्हत्या. आपले आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीने महिला सहन करत होत्या. पण त्याचाच गैरफायदा घेतला जात असेल, तर त्यांना आता दुर्गेचा अवतार धारण करावाच लागेल. ही चळवळ उभी राहून वर्षच झाले आहे, पण आता कुठे त्याचे महत्त्व पटल्यामुळे महिला तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. तनुश्री दत्ताने चित्रपटातील कधी खलनायक, कधी चरित्रनायक, कधी सहनायक असलेल्या नाना पाटेकरला दणका दिल्यानंतर अनेकांना यातून प्रेरणा मिळत गेली. अनेकांचे चेहरे समोर येत गेले. पण यानिमित्ताने महिला धाडसाने पुढे येऊ लागल्या आहेत हे फार महत्त्वाचे आहे. बदनामी, अब्रू ही फक्त महिलांनाच असते हा जो समज आहे तो झुगारून देऊन आता खोटी प्रतिष्ठा राखणारे दिग्गज मोहरे महिलांनी समोर आणण्याचे धाडस केले पाहिजे. या दृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रात अशी काही दुष्कृत्ये होत असतील तर अशा महिलांना मदत करण्याचे काम इतर पुरुषांनीही केले पाहिजे. एका चित्रपट निर्मात्यावर अशाच प्रकारे लैंगिक शोषणाचा आरोप आल्यावर त्या निर्मात्याबरोबर काम करण्यास आमिर खानने नकार दिला आहे. असा आदर्श घालून दिला पाहिजे. ‘मी टू’मुळे ज्यांची नावे समोर आली आहेत, त्यांच्या बाबतीत ‘नाव मोठं अन् लक्षण खोटं’ असेच म्हटले पाहिजे. आज या चळवळीतून पुढे घटनांमध्ये शिक्षा झाल्याचे प्रमाण कमी असले तरी दुष्कृत्ये करून उजळ माथ्याने समाजात वावरणा-यांची पोलखोल झाली आहे. त्यामुळे भविष्यात अशी दुष्कृत्ये करण्याचे प्रमाण कमी झाले, तरी ते ‘मी टू’ चळवळीचे मोठे यश असेल.