गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

इतिहासाची मोडतोड नको!


क्षा अभियानांतर्गत पुरवली जाणारी पुस्तके सातत्याने वादग्रस्त होताना दिसत आहेत. चुकीची माहिती, अभ्यास न करता छापला जाणारा मजकूर, संदर्भहीन वाक्यरचना यामुळे लहान वयात विद्यार्थ्यांपुढे चुकीची माहिती देण्याचे काम होत आहे. याकडे सरकारचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत असून याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे. महाराष्ट्राची वीर पुरुषांची, संतांची परंपरा आहे, त्या परंपरेला तडा देत ही माहिती चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे पोहोचवणे म्हणजे एकप्रकारचे षड्यंत्र आहे. महापुरुषांच्या बदनामीचे षड्यंत्र हे जाणीवपूर्वक वारंवार रचले जात आहे. त्या घटनांची पुनरावृत्ती सातत्याने होताना दिसत आहे. अशा लोकांवर कारवाई का केली जात नाही, त्यांची अशी चुकीची माहिती देण्याची हिंमतच कशी काय होते, हा मजकूर निवड करणे, त्याची तपासणी करणे याबाबत नियोजित संपादक मंडळ, समित्या या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष का करतात, अनभिज्ञ असल्याचा आव आणून दिलगिरी व्यक्त करतात. हे सातत्याने होताना दिसत आहे. त्यामुळे तिथे योग्य, अभ्यासू माणसांची नेमणूक करून खरा इतिहास आणि माहिती देणारीच यंत्रणा निर्माण करावी. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जर अशी चुकीची माहिती दिली जात असेल, चुकीचा इतिहास मुलांसमोर ठेवला जात असेल तर ती विशिष्ट विचारसरणीची विकृती आहे, असेच मानावे लागेल.इतिहासाच्या नावाखाली या महापुरुषांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाची तोडमोड करून चुकीचा इतिहास पसरवला जात असेल तर अशा लेखक मंडळींवर कठोर कारवाई होण्याचीच गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत वितरित केलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या बदनामीचे प्रकरण पुन्हा एकदा पुढे आले आहे. हे सर्व प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक करीत आहेत; परंतु अशा प्रयत्नांना ज्यावेळी सरकारतर्फे हातभार लावला जातो, त्यावेळी मात्र या षड्यंत्राच्या व्यापकतेची कल्पना येते. त्यामुळे या प्रकारांची निव्वळ उच्चस्तरीय चौकशी होऊन उपयोग नाही, चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची नाटके नकोत, तर या इतिहास संशोधन मंडळ, संपादनात योग्य आणि अभ्यासू माणसांचीच वर्णी लागली पाहिजे. सरकारच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे.संभाजी राजांच्या बदनामीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने ठाम भूमिका घेऊन आपला निषेध नोंदविला. अखेर सरकारला हे पुस्तक मागे घ्यावे लागले. लेखिका शुभा साठे आाणि प्रकाशकाने माफी मागितलेली आहे. म्हणून हा विषय संपला असे समजण्याचे कारण नाही. कारण सर्व शिक्षा अभियानांतर्गत जेवढी पुस्तके समोर येत आहेत त्या सर्व पुस्तकांमध्ये अशा अक्षम्य चुका असल्याचेच नाही तर चुकीचा इतिहास मांडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. संभाजीराजेंच्या प्रकारानंतर संत तुकाराम महाराजांबाबतही चुकीची माहिती दिल्याचे उघडकीस आले. एका पुस्तकात मोहंमद पैगंबरांबद्दलही चुकीची माहिती दिल्याचा प्रकार समोर आला. हे सातत्याने का घडते आहे? का मुद्दाम केले जात आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. महाराजांबद्दल चुकीची माहिती देणा-या पुस्तकाबाबत संभाजी ब्रिगेडने जर आवाज उठविला नसता तर हे पुस्तक असेच पुढे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वितरित होत राहिले असते. जी मुले लहान आहेत, त्यांच्या मनात संभाजी महाराजांविषयी अत्यंत चुकीचे चित्र उभे राहिले असते. एकीकडे झी मराठी वाहिनीवरील संभाजीराजांवरील मालिका लोकप्रिय होत असताना, त्यातून राजांबद्दल आदराची भावना तयार होत असतानाच दुसरीकडे चुकीची माहिती देणारी पुस्तके येणे हा खोडसाळपणाचाच प्रकार म्हणावा लागेल.मात्र संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या भूमिकेमुळे हे पुस्तक मागे घेतले गेले असले तरी भविष्यात असा प्रयत्न पुन्हा होणारच नाही असे सांगता येत नाही. यासाठी त्या ठिकाणी योग्य माणसांची, तज्ज्ञ अभ्यासू लोकांची नेमणूक झाली पाहिजे. जी माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे ती अचूक आहे ही संशोधक तज्ज्ञांकडून खात्री करून घेतली पाहिजे. जे पॅनेल या मजकूर निवडीसाठी आहे, पुस्तकांना मान्यता देणारे आहे, त्यामध्ये योग्य लोकांची निवड झाली पाहिजे. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी जागल्याची भूमिका नव्या पिढीच्या तरुणांना घ्यावी लागेल. ही पुस्तके लिहिणारी लेखक मंडळी काल्पनिक आणि काहीतरी रंजक देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी अभ्यासाची पुस्तके, अभ्यासक्रमातील पुस्तके लिहिण्याच्या फंदात न पडता काल्पनिक कथा-कादंब-या लिहाव्यात, पण इतिहासाची चुकीची मांडणी करण्याचा दुष्टपणा कोणी करू नये. सरकारचे अशा गोष्टींकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. अशा चुकांची जबाबदारी घेण्याचे काम कोणी करत नाही. शिक्षण खाते, शिक्षणमंत्री अशा गोष्टींवर कानावर हात ठेवण्याचे प्रकार करतात आणि अंग काढून घेतात. पण इतका चांगला, भव्य इतिहास, परंपरा असलेल्या महाराष्ट्राची चुकीची माहिती देण्याचा जो प्रकार होत आहे तो संतापजनक आहे. शाळेच्या क्रमिक अभ्यासक्रमातील ही पुस्तके नाहीत असे सांगून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हात झटकले आहेत.पण सर्व शिक्षा अभियान ही सरकारचीच मोहीम आहे. अशा मोहिमेतून जर चुकीची पुस्तके, चुकीचा इतिहास देणारी पुस्तके सातत्याने येत असतील तर ही फार चिंताजनक बाब आहे. समाजात, जातीपातीत दरी निर्माण करण्याचे काम या घटनांमधून होऊ शकते. त्यामुळे हे हेतुपुरस्सर होत असेल तर अशांची चौकशी झाली पाहिजे. अशा वारंवार चुकीची माहिती पसरवणा-या पुस्तकांचे मास्टर माईंड कोण आहेत हे तपासावे लागेल. आपल्याकडे इतिहास संशोधकांची, तज्ज्ञांची रेलचेल आहे, अभ्यासपूर्ण मांडणी करणा-यांची कोणतीही कमतरता नसताना, नको त्या लोकांना अशा मंडळांवर, समित्यांवर नेमून इतिहासाचे विकृतीकरण करणारी पुस्तके खपवण्याचा हा धंदा चालला आहे असेच म्हणावे लागेल. धंदे ताबडतोब थांबले पाहिजेत. अशा प्रवृत्तींना केवळ चौकशी समिती नेमून आणि पुस्तकांवर बंदी घालून आळा बसणार नाही तर कठोर शिक्षा करून त्यांना तिथून हटवणे हेच योग्य ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: