बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

दुष्काळात तेरावा महिना

दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे भाव पस्तीस हजारांच्या घरात जातील, असे बोलले जात आहे. दहा ग्रॅमला पस्तीस हजार रुपये हा दर आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर असणार आहे. अर्थात हा परिणाम रुपयाचे झालेले विक्रमी अवमूल्यन आणि शेअर बाजाराची झालेली घसरण यामुळे आहे यात शंकाच नाही. सोन्याची गुंतवणूक ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक राहिलेली आहे. आपल्याकडे हजारो वर्षाच्या परंपरेचा विचार केला तर सोन्याची खरेदी करणे, सोन्याचे दागिने खरेदी करणे हा गुंतवणुकीचा मार्ग निवडलेला दिसतो. कारण सोन्याची गुंतवणूक ही माणसाला अडीअडचणीला आणि महत्त्वाच्या व्यवहारांच्या वेळी अत्यंत उपयोगी पडणारी असते. धनसंचय हा आपल्याकडे परंपरेने सोन्यात मोजला गेलेला आहे. तोच प्रकार विद्यमान अर्थव्यवस्थेत दिसून येतो. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या असण्यावर प्रत्येकाचे अस्तित्व ठरत असते. मग तो डॉलर असो, रुपया असो, पौंड असो वा जगातील कोणत्याही देशाचे चलन असो. त्याचा संबंध हा सोन्याशीच जोडला गेलेला आहे.रिझव्‍‌र्ह बँकेला सोन्याचा संचय हा महत्त्वाचा असतो. देशाच्या तिजोरीत असणारे सोने विकणे किंवा सरकारने बाहेरून सोने खरेदी करणे याचा संबंध हा अर्थव्यवस्था आणि चलन निर्मितीशी आहे. चलन किंवा नोटा छापण्याचे तंत्र हे सोन्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. त्यामुळेच रुपया घसरतो, चलन टंचाई निर्माण होते तेव्हा त्याचा परिणाम हा सोन्याच्या किमतीवर होत असतो. सोन्याचे भाव उतरतील तेव्हा रुपयाचे अवमूल्यन थांबेल. त्यामुळे हा परस्पर संबंध लक्षात घेता गेल्या आठवडय़ात भारतीय रुपयाने डॉलरपुढे घातलेल्या लोटांगणाचा विचार करता ही दरवाढ अपेक्षितच होती. फक्त ती कशी होते यावर ते अवलंबून होते. गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर जवळपास दीड हजारांच्या आसपास वाढले आहेत. मागच्या आठवडय़ात जे सोने एकोणतीस हजार रुपये दहा ग्रॅम या दराने विकले जात होते ते आज एकतीस हजार सहाशे ते बत्तीस हजार दराने विकले जात आहे. या झाल्या आर्थिक घडामोडी. सामान्यांच्या दृष्टीने हे अनाकलनीय आहे. त्यांना फक्त सोन्याचे भाव वाढले याची चिंता असते. कारण गरीब असो वा श्रीमंत आपल्याकडे त्याला सोने खरेदी करायचे असते. कारण त्याचे वैभव, त्याचे अस्तित्व सोन्याशीच जोडलेले असते. म्हणून तर आपल्याकडे गुंज गुंज का होईना सोने खरेदी करून संचय करण्याची प्रथा आहे. सोन्यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. दागदागिने बनवणे, विविध अलंकार बनवणे हे श्रीमंतीपेक्षा त्याला भविष्याची तरतूद म्हणून महत्त्वाचे असते. बँका, विमा कंपन्या, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यात कितीही गुंतवणूक केलेली असली तरी सर्वात सुरक्षित गुंतवणूक ही सोन्याची वाटते. कारण ऐनवेळी मदतीला धावून येणारी, सहज मोडता येणारी आणि त्याचा पैसा करता येणारी ही गुंतवणूक असते.त्यामुळे आपल्या गाठीशी थोडे तरी सोने असावे असे प्रत्येकाला वाटत असते. सोने हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याच्या नियोजनाचा भाग असतो. म्हणूनच माणसाने सतत सोने खरेदी करावे यासाठी आपल्याकडे त्याचे दर महिन्याचे काही मुहूर्त असतात. गुरुपुष्यामृत, साडेतीन मुहूर्त यामध्ये, गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा या दिवशी सोने खरेदीचे फार महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येकजण आटापिटा करून थोडे तरी सोने खरेदी करत असतो. बहुतेक सराफी पेढय़ा सुवर्णसंचयसारख्या भिशी योजनाही राबवत असतात. मुहूर्ताला खरेदी करता यावे म्हणून दरमहा रिकरिंग डिपॉझिटप्रमाणे ग्राहकांनी पैसे गुंतवावेत यासाठी अनेक योजना सुवर्ण व्यापारी राबवत असतात. कारण प्रत्येकाला सोने खरेदी करायचे असते. पण हाच सोन्याचा भाव जेव्हा गगनालाच भिडतो तेव्हा सामान्य माणसाच्या पाचावर धारण बसते. दसरा-दिवाळीच्या तोंडावर सोन्याचा भाव पस्तीस हजारांच्या घरात जाण्याच्या चिंतेने सर्वानाच धक्का बसणे साहजिक आहे. याचे कारण प्रत्येकाचे यामुळे बजेट कोलमडून पडते. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी तुळशीच्या लग्नानंतर आपल्याकडे लग्नाचा हंगाम सुरू होतो. या लग्नात सोने खरेदी मोठय़ा प्रमाणात होत असते. मुलीचे लग्न असो वा मुलाचे दोन्ही बाजूने सोने खरेदी ही होतच असते. अगदी गरिबाला मणीमंगळसूत्र करायचे झाले तरी किमान २० ग्रॅम सोन्याची गरज असते.परंतु हे दर वाढल्याने त्याला आता चिंता लागते ती जादा पैसा उभा करण्याची. शेती, सोने आणि पावसाचे प्रमाण यावर आमची अर्थव्यवस्था चालत असते. अर्थव्यवस्था व्यापारी, उद्योजक चालवत नाही, तर आमचा शेतकरी चालवत असतो. त्याच्या अस्तित्वावर सगळे काही अवलंबून असते. यातूनच तर आपल्याकडे म्हण तयार झालेली आहे की, शेतीतून सोने पिकवले. ज्यावेळी पीक चांगले येते, त्याला भाव चांगला मिळतो तेव्हा आपसूकच सोने खरेदीची संधी निर्माण होते. ही संधी निर्माण झालेली असली तरी त्यासाठी सोन्याचा दर स्थिर असावा लागतो. आज पावसाचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. शेतकरी, सर्वसामान्य माणसाच्या हातात पैसा पडत नाही. त्याची क्रयशक्ती कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत तोंडावर आलेली कार्ये कशी पूर्ण करायची याची त्याला चिंता आहे. या चिंतेमुळेच सोने महाग होणे त्याच्या दृष्टीने वाईट आहे. सोन्याची दरवाढ झाली तर लग्नकार्यावर परिणाम होत असतोच पण सोन्याची उलाढाल जेव्हा बाजारात होते, मोठय़ा प्रमाणावर त्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात तेव्हा ते अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम करत असतात. सोने खरेदी ही फक्त श्रीमंतांची किंवा भांडवलदारांची मक्तेदारी आहे, असे समजण्याचे कारण नाही. सोन्याच्या असण्यावर, त्याचे जास्तीत जास्त व्यवहार होण्यावर अर्थव्यवस्था बळकट होत असते. पण जेव्हा ते महाग होते तेव्हा आपसूकच त्याचे खरेदीचे प्रमाण कमी होते. व्यापारीवर्गाकडे जादा वाढलेल्या दराप्रमाणे नोटा जमतीलही पण त्या नोटांचे, रुपयाचे अवमूल्यन कमी झाल्यामुळे तो फुगवटा असतो. बाजारपेठेत हजारो कोटींच्या सोन्याची उलाढाल झाली यापेक्षा किती किलो सोने विकले गेले हे महत्त्वाचे असते. म्हणून सोने ते सोने आहे, अर्थव्यवस्थेत त्याचे स्थान महत्त्वाचे असते. त्याची दरवाढ होणे हे यासाठी चिंतेचे कारण असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: