एकतर्फी प्रेमाची प्रकरणे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. गेल्या तीस वर्षापासून हे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यावर तेवढय़ापूरती चर्चा होते पण नंतर काहीच होत नाही. दुसरी घटना घडेपर्यंत पहिल्या घटनेचा विसर पडून जातो, इतक्या संवेदना बोथट होताना दिसत आहेत. काल ठाण्याच्या मुंब्रा परिसरात एका तरुणाने अशाच प्रकारे एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचे घर जाळल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास नीतेश मेरोल यांने पेटलेला कापडी बोळा घराच्या एक्झॉस्ट फॅनच्या खिडकीतून आत टाकला. त्यामुळे काही क्षणात घरात आग लागली. शिवाय या कुटुंबाला घराबाहेर पडता येऊ नये यासाठी त्याने त्यांच्या दाराला बाहेरून कडी लावली होती. मात्र हा प्रकार पीडित कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आग विझवली. हे कुटुंब वेळीच जागे झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या घटनेमुळे मुंब्रा परिसरातील महात्मा फुलेनगर परिसरात राहणारे हे कुटुंब अक्षरश: हादरून गेले आहे. ही समाजाला लागलेली कीड आहे. अशा गैरप्रकारांचे पेव फुटल्याप्रमाणे या घटना घडणे चांगले नाही. गेल्या महिन्यात मुंब्य्रातच एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच ही घर जाळण्याची घटना घडली आहे. ३० वर्षापूर्वी उल्हासनगरच्या एका महाविद्यालयात रिंकू पाटील नावाच्या मुलीची अशीच जाळून हत्या झाली होती. त्यावेळी कुठल्या तरी दाक्षिणात्य चित्रपटातील घटनेची ही पुनरावृत्ती आहे, असे सांगून त्यावर पडदा पडला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला झटका बसला होता. कारण भर महाविद्यालयात महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यासमोर एका मुलीला जाळून मारणे ही घटनाच भयानक होती. कोणीही त्या मुलीला वाचवायला पुढे आले नाही, यावरून त्याची दाहकता अधिकच दिसून येते की, अशा माथेफिरूंची मानसिकता आणि दहशत किती भयानक आहे हे यातून दिसते. बघ्याची भूमिका घेणारा षंढ समाज आणि या षंड समाजात असहाय्यपणे दुष्कृत्याला बळी पडणारी अबला हे चित्र देशाचे नाव खराब करणारे आहे.त्यापाठोपाठ अशा तऱ्हेच्या घटनांची एक मालिकाच तयार झाली होती. कोणी जाळून मारत होते तर कोणी चाकूने भोसकून मारत होते. त्या घटनांनंतर ठिकठिकाणी रकानेच्या रकाने लिहून येत होते, निषेधाचे मोर्चे निघत होते, पण प्रत्यक्ष घटनेच्या वेळी कोणीही माईका लाल अशा तरुणींना वाचवायला पुढे येत नाही हेच सातत्याने दिसून आले आहे. सांगलीची अमृता देशपांडे, कराडची आरती अशा घटनांपाठोपाठ मुंबई, महाराष्ट्रात अशा घटना सतत कुठे ना कुठे घडतच होत्या. या घटनांमुळे समाजात खळबळ माजणे आणि माध्यमांना बातमी मिळणे या पलीकडे काहीच घडत नव्हते. समाजाच्या बोथट झालेल्या संवेदना आणि परदु:ख शीतलमचा प्रकार यामुळे या घटना वाढत गेल्या आहेत. यावर मुलींना सुरक्षा देण्याबाबत कोणतेही धोरण राबवले जात नाही. पोलीस हे सदरक्षणाय आहेत हा संदेशच कुठे पोहोचलेला नाही. अवघ्या महिनाभराच्या आत ठाणे-मुंब्रा परिसरात या घटना घडल्या आहेत. पण ही फक्त ठाण्यातील घटना आहे असे नाही, राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही एकतर्फी प्रेमातून आतापर्यंत दोन मुलींवर हल्ला करण्यात आला आहे. नागपूरमध्ये फेसबुक रिक्वेस्ट डिलिट केली म्हणून रोहित हेमलानी या युवकाने सानिका प्रदीप थुगांवकर या अठरा वर्षाच्या मुलीची हत्या केली. अनिकेत साळवे नावाच्या माथेफिरू तरुणाने भरधाव कारने धडक मारून मयुरी हिंगणेकर या मुलीची हत्या केली आहे. गणेशपेठ परिसरातील तेलीपु-यात आरोपी अनिकेत साळवे राहत होता आणि जवळच राहणा-या मयुरीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. अनेकदा आरोपीने मयुरीला भेटण्याचा प्रयत्न केला पण तिने भेटण्यास नकार दिला.दरम्यान मयुरी बाईकवर मागे बसून जात असताना आरोपी अनिकेतने त्यांच्या गाडीला जोरदार धडक मारली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर बाईक चालविणारा अक्षयही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही एकापाठोपाठ घटनांची मालिका कशामुळे तयार होते आहे याचा शोध घेतला पाहिजे. १९९० च्या दशकात या घटना घडत होत्या तेव्हा शाहरूख खानच्या चित्रपटांना दोषी ठरविण्यात येत होते. त्याचा डर, बाजीगर अशा चित्रपटातून दाखवलेली एकतर्फी प्रेमाची घटना पाहून अनेक महिला संघटनांनी मोर्चे काढून शाहरूखच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली जात होती. त्यामुळे शाहरूखचे सुमार चित्रपटही जोरात चालले हे वेगळेपण. अशा घटनांपूर्वीही असे चित्रपट येत होते. त्या अगोदर राज बब्बर, डिंपल आणि राजीव कपूर यांचाही लाव्हा नावाचा एक चित्रपट आला होता. तोही एकतर्फी प्रेमाचाच होता. १९७० च्या दशकात अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या दोघांनीही नकारात्मक भूमिका करून एकतर्फी प्रेमाच्या भूमिका केल्या होत्या. धनवानसारख्या चित्रपटातून राजेश खन्ना, रिना रॉय आणि राकेश रोशन, फरारमध्ये अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, संजीवकुमार अशा त्रिकुटाचा चित्रपटही एकतर्फी प्रेमाचाच आहे.त्यामुळे चित्रपटांमुळे असे काही घडले असेल असे म्हणता येणार नाही. पण गेल्या तीस वर्षात हे प्रकार वाढले आहेत. पण त्याबाबत मजबूत कायदे होत नाहीत की काही अंमलबजावणी होत नाही हे वास्तव आहे. असे प्रकार सातत्याने घडणे हे घातक आहे. त्यापेक्षा अशा घटना घडूनही समाजातील कोणीही मदतीला धावत नाही हा जाणारा संदेश वाईट आहे. त्यामुळे अशाप्रकारची गुन्हेगारी मानसिकता वाढीस लागते आहे. त्याच्यावर कुठेतरी बंधन आले पाहिजे. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात अशा घटनांची वाढ झाली. त्यामुळे कोणत्याही वाईट प्रकारानंतर त्याची पुनरावृत्ती करण्याची मानसिकता वाढीस लागते हे फार भयंकर चित्र आहे. त्याला आवर घालणारे कायदे आणि सुरक्षा धोरण आखणे जरुरीचे आहे. महिला संघटना, समाजसेवी संघटना आंदोलने करतात, पण त्यामध्ये संघटना मोठय़ा होतात, तोडगा निघत नाही.