आपल्या देशात दस-याचा सण हा क्षात्रवृत्ती किंवा क्षत्रिय धर्म या पुरुषार्थाशी जोडलेला आहे. आपल्या परंपरेत क्षात्रधर्माला उच्च स्थान दिले गेले आहे. अर्थातच दसरा हा रामाचा रावणावर विजय आणि महिषासुरमर्दिनीने केलेला महिषासुराचा वध याच्याशी निगडित आहे. महाराष्ट्रात दसरा हा सीमोल्लंघन म्हणून साजरा केला जातो. तो देशाच्या इतर भागात साज-या होणा-या उत्सवापेक्षा फार वेगळा आहे. सीमोल्लंघनाची ही परंपरा कधी सुरू झाली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा; परंतु भारताच्या शेकडो वर्षाच्या इतिहासावर नजर टाकली असता, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि मुघल आक्रमणाचा यशस्वी मुकाबला केल्यानंतर मराठय़ांनी स्वराज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या पलीकडे वाढवायला सुरुवात केली. त्यानंतर दर दस-याच्या दिवशी सैन्य दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रयाण करत असे. भारताच्या इतिहासात अगदी चौथ्या शतकानंतर म्हणजे चालुक्य साम्राज्यानंतर सर्वसाधारणपणे महाराष्ट्राला उत्तरेकडून आक्रमणांचा सामना करावा लागला; परंतु अठराव्या शतकात मात्र हे चित्र पालटले आणि मराठय़ांनी उत्तरेकडे स्वा-या करायला सुरुवात केली. संरक्षणासाठी आपल्या प्रदेशात शत्रूची वाट पाहत बसण्याऐवजी शत्रूच्या प्रदेशावर चाल करून जाऊन त्याला त्याच्याच प्रदेशात नेस्तनाबूत करणे ही मराठय़ांची रणनीती जवळजवळ दोन शतके म्हणजे इंग्रज येईपर्यंत कायम होती. याचेच फलस्वरूप म्हणजे, अगदी उत्तरेकडे ग्वाल्हेर, झाशी, इंदोपर्यंत मराठी संस्थाने निर्माण झाली.दसरा किंवा विजयादशमी म्हणजे विजयाचा संकल्प करण्याचा दिवस. देशभरात राजे आपापली शस्त्रे या दिवशी बाहेर काढतात. त्याचे पूजन करतात. यामागचे कारण म्हणजे महाभारत काळात अज्ञातवासात विराटनगरीत बृहन्नडेच्या रूपात राहिलेल्या अर्जुनाने विराटपुत्राला मदत करण्यासाठी आपली शस्त्रे बाहेर काढून ठेवली, तो हा दिवस. वर्षभर अज्ञातवासात गंजत पडलेल्या शस्त्रांचा वापर करण्यासाठी आलेली योग्य वेळ म्हणजेच हा विजयादशमीचा दिवस. या दिवशी आपल्याकडे चांगल्या गोष्टींचा संकल्प केला जातो. दसरा झाल्यानंतर काही दिवसांनी येऊन ठेपलेल्या दिवाळीची ओढ प्रत्येकाला लागलेली असते. नवे आलेले पीक, धान्य आणि त्याची बाजारात विक्री होऊन येणारा मुबलक पैसा याचे धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाला पूजा करण्याची आपली परंपरा. या परंपरेची सुरुवात दस-यापासून होते. आपल्या या कृषीप्रधान संस्कृतीत आजही दस-याच्या दिवशी बहुतेक सर्व साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते. उसाची खरेदी कारखानदार सुरू करतात. कामगारांच्या दृष्टीनेही दसरा हा आनंददायी असतो. कारण, येत्या काही दिवसांत त्याला दिवाळी बोनस मिळणार असतो. कुटुंबीयांना आनंदी करण्याची ही संधी असते. चार महिने काम केलेल्या शेतक-याला धन घेऊन येणारा हा दिवस म्हणून ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे म्हटले जाते. ज्या देशातील शेतकरी आनंदी असतात, तो देश संपन्न असतो. आज आपल्याकडे शेतक-यांना आत्महत्या कराव्या लागतात. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आज शेतकरी गांजलेला आहे. आर्थिकदृष्टय़ा ज्या प्रमाणात सरकारकडून मदत होणे अपेक्षित आहे, ती होताना दिसत नाही.सरकारने चांगले निर्णय घेतले, तर प्रशासनाकडून त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. या सगळय़ा दुष्टचक्रात आमचा शेतकरी अडकून पडलेला आहे. त्याला कुठेतरी या दस-याच्या निमित्ताने चांगले दिवस यावेत, अशी अपेक्षा या निमित्ताने केली पाहिजे. शेतकरी हा आपल्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. तो टिकला पाहिजे. राजकारणाच्या आणि सत्तेच्या चढाओढीत शेतकरी कुठेतरी भरडला जातो आहे. त्याचा वापर राजकारणासाठी करू नये, इतकीच अपेक्षा आहे. यावर्षीचा दसरा म्हणजे विजयाचा संकल्प करून तयारीला लागलेले राजकीय पक्ष आपल्याला पाहायला मिळतील. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि या दोन्ही मोठय़ा प्रवाहांबरोबर जाणारे प्रादेशिक आणि छोटे पक्ष यानिमित्ताने आपले शक्तिप्रदर्शन करून विजयाचा संकल्प करतील. २०१९च्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यापूर्वी मिनीलोकसभा असे वर्णन केलेल्या पाच राज्यांची निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुका राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांत होणार आहेत. यातील तीन मोठय़ा राज्यांत भाजपची सत्ता दीर्घकाळापासून आहे. ती टिकवण्याचे फार मोठे आव्हान या पक्षापुढे आहे, तर इथे सत्तांतर घडवून आणण्याचा संकल्प विरोधकांचा असणार आहे. त्यादृष्टीने रणशिंग राजकीय पक्षांकडून फुंकले जाण्यासाठी यावर्षीचा दसरा महत्त्वाचा आहे. यावर्षीच्या दस-यावर महागाईचे सावट आहे. पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीचा परिणाम ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणार आहे.दस-याला वाहन खरेदीचा एक मुहूर्त असतो; परंतु पेट्रोल महाग झाल्यामुळे अपेक्षित वाहनांची विक्री होईल की नाही, याची चिंता ऑटोमोबाईल व्यवसायाला लागलेली दिसून येते. त्यामुळे सध्या दुचाकी वाहनांच्या जाहिरातीतही प्रतिलिटर आपल्या कंपनीची गाडी किती किलोमीटर धावते, हे सांगण्याचा आटापिटा चालवला आहे; परंतु वाहन खरेदीमध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी घट होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. याशिवाय दसरा हा एक साडेतीन मुहूर्तापैकी दिवस असल्याने यादिवशी सुवर्ण खरेदीचाही मुहूर्त असतो. यावर्षी सोन्याचे भाव प्रचंड महागले आहेत. दहा ग्रॅमसाठी ३२ हजारांचा टप्पा गाठलेला आहे. दागिन्यांसाठी लागणारे सोने तर त्याची घडणावळ आणि जीएसटीमुळे आणखी महागणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जी लग्नाची सराई सुरू होते, त्यावर परिणाम करणारी ही सोन्याची दरवाढ आहे. साहजिकच सुवर्ण व्यापा-यांमध्येही चिंतेचे सावट आहे. अर्धा ग्रॅमच्या वळय़ापासून ते काही तोळय़ांमध्ये खरेदी करणारा ग्राहक असतो. त्या सर्वाचे वाढत्या दराप्रमाणे कसे समाधान करायचे, याची चिंता पेढी व्यापा-यांना लागलेली आहे.विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांत सोने खरेदीपेक्षा विक्रीस काढणा-या ग्राहकांची वर्दळ सुवर्ण व्यापा-यांकडे वाढलेली आहे. असे मोडीचे सोने नाकारणेही व्यापा-यांना अवघड झालेले आहे. जादा दराने ही मोड घेतली अन् काही दिवसांनी सोन्याचे दर गडगडले, तर ती झळ सोसायला नको म्हणून सोन्याची मोड न घेण्याचा प्रकार काही व्यापारी करत आहेत. अडीअडचणीला गाठीशी असलेले सोने हे गुंतवणूक म्हणून अपयशी ठरताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला ‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ म्हणत आपटय़ाची पाने देत विजयाचा संकल्प करायचा आहे.
गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८
विजयाचा संकल्प ‘दसरा’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा