एका वृत्तवाहिनीने आज निवडणुका झाल्या, तर काय निकाल लागतील अशा तऱ्हेचे भाकीत वर्तविण्याचा प्रकार अलीकडेच केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेपर्यंत पोहोचेल, पण भाजपच्या जागा कमी होतील असा निष्कर्ष त्यांनी नोंदवला. निवडणुका जवळ आल्यावर विविध संस्थांचा हा एक खेळच असतो. दर आठ-पंधरा दिवसांनी कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर अंदाज वर्तवायचे आणि खळबळ उडवून द्यायची. पण अशी निवडणूक पूर्व सर्वेक्षणे खरी किती आणि खोटी किती असा प्रश्न आता पडू लागलेला आहे.निवडणूक पूर्व सर्वेक्षण, जनमत, मतदानपूर्व अंदाज अशा अनेक नावांनी म्हणजे कुणी सत्यदेव म्हणा, कुणी सत्यनारायण म्हणा त्याप्रमाणे एकच कार्य या वाहिन्यांवरून होत असते. पण आजवर बहुतेक सारेच अंदाज खरे ठरल्याचे दिसले नाही. प्रत्येक निवडणुकी पूर्वी जी वातावरण निर्मिती होत असते त्यातलाच हा एक प्रकार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पक्षांतर, बंडखोरी, नेते हा पक्ष सोडून त्या पक्षात जाऊ लागले की निवडणुका जवळ आल्याचे समजले जाते, त्याप्रमाणेच असे अंदाज वर्तवणा-या एजन्सीज, संस्था कार्यरत झाल्या की समजायचे आता निवडणुका आल्या आहेत. पावसाळय़ापूर्वी वारे वाहतात, ढग जमा होतात तसे हे अंदाजाचे ढग वाहिन्यांवरून वाहू लागतात, पण ब-याचवेळा गर्जेल तो पडेल काय, अशा प्रकारची अवस्था या अंदाजांची असते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वीही अशाप्रकारे अंदाज वर्तवणा-यांचे पेव फुटले होते. काँग्रेस, भाजप आणि दोन्ही मुख्य पक्षांच्या मित्र पक्षांचे नेते हा अंदाज वर्तवला जात असताना वाहिन्यांवर चर्चेसाठी येत असत. कोणी कधी समाधानी तर कोणी चलबिचल होऊन जणू निवडणुकीचा निकालच लागला आहे अशा आवेशात चर्चा करायला येतात. हे सगळेच हास्यास्पद वाटते. कारण २०१४ च्या निवडणुकी पूर्वी भारतातल्या बहुतेक सर्वच वाहिन्यांवरून असे निवडणूक पूर्व अंदाज दर आठ-पंधरा दिवसांनी वर्तवले होते. पण कोणीही भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे सांगितले नव्हते. भाजपचा आकडा निवडणुकी पूर्वी अगोदर ६ महिन्यांपर्यंत १५५-१६० होता. तो दर आठवडय़ाला वाढत अखेरच्या चाचणीपर्यंत १८० पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे मोदींना २७२ चा आकडा गाठण्यासाठी कोणाची मदत होणार इथंपासून ते मोदींबरोबर हे पक्ष जातील का? त्यांचे नेतृत्व मान्य होईल का? भाजपला दुसरे नेतृत्व देता येईल का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. कोणत्याही वाहिनीने भाजपला २०० चा आकडा पार होईल, असा अंदाज वर्तवला नव्हता. प्रत्यक्षात मात्र निवडणूक निकालानंतर भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल इतके संख्याबळ मिळाले होते. २७२ च नाही तर २८३ पर्यंत हा आकडा गेला होता. संपूर्ण राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आकडा हा ३३० पर्यंत गेला होता. त्यामुळे सर्वाचेच अंदाज पार चुकले होते. नंतर कोणीही आम्ही वर्तवलेला अंदाज अगदी बरोबर आला असा दावा केला नव्हता. त्यामुळे हे निवडणूक पूर्व वर्तवले जाणारे अंदाज विश्वासार्ह नसतात असेच समोर आलेले असताना हे असले निर्थक कार्यक्रम वाहिन्या का करतात असा प्रश्न पडतो.दहा वर्षापूर्वी सुरुवातीला लोकांना त्याची उत्सुकता वाटत होती, पण आता प्रेक्षक आणि मतदार अशा अंदांजाकडे बिलकूल पाहत नाहीत. त्यामुळे असे अंदाज वर्तवणारे कार्यक्रम सादर करून दोन-दोन तास वाहिनीवर एरंडाचे गुऱ्हाळ चालवणा-यांनी अगोदर किती टक्के प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला आणि पसंत केला याचे सर्वेक्षण करायची गरज आहे, असे वाटते. अंदाजात काही टक्के इकडे तिकडे होऊ शकतात, पण प्रचंड तफावत असणारे अंदाज विश्वासार्हता कसे निर्माण करणार? साहजिकच अशा अंदाजांवर बंदी घालावी अशी मागणीही अनेकवेळा जोर धरून राहिली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर लोकसभेत काँग्रेसचे संख्याबळ १०० च्या खाली जाईल, असे कोणत्याही अंदाजप्रभूंनी सांगितले नव्हते. भाजप १८०, तर काँग्रेेस १२५ ते १४० हाच आकडा सातत्याने दाखवला जात होता. पण प्रत्यक्षात काँग्रेसला शंभरच काय पन्नासचा आकडाही पार करता आला नाही. एका फार मोठय़ा राष्ट्रीय पक्षाची ताकद प्रादेशिक पक्षासारखी कमकुवत झाली. त्यामुळे असे अंदाज वर्तवणा-यांवर कितपत विश्वास ठेवायचा याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.विशेष म्हणजे हे अंदाज वर्तवताना अगोदर निरनिराळे संख्याशास्त्र तज्ज्ञ आपण हे सर्वेक्षण नेमके अभ्यासपूर्ण कसे केले हे अत्यंत ठामपणे सांगतात. अमूक इतक्या मतदारसंघातील सुमारे हजार मतदारांना भेटून हा अंदाज काढला असल्याचे सांगतात. पण कोटय़वधी मतदार असलेल्या या देशातील ५४२ जागांचा अंदाज काही मतदारसंघातील जेमतेम काही हजार मतदारसंघातील पाहणीवरून कसा काय बांधता येतो, हा न उलगडणारा प्रश्न आहे. बरे, हे जे निवडलेले पाच-पंचवीस मतदारसंघ आहेत ते प्रत्येक राज्यातील असतील असेही नाही. कुठल्या तरी एका ठिकाणी बसून ही आकडेवारी तयार केली असावी असे दिसते. खरोखरच जर कोणाशी चर्चा केली असेल तर नेमके कोणते मुद्दे विचारात घेतले याचाही ऊहापोह होणे गरजेचे आहे. अंदाज वर्तवल्यानंतर ज्यांच्याशी संवाद झाला त्यांची मते दाखवायला काय हरकत असते? पण तसे हे अंदाजपंडित कधीही करत नाहीत.त्यामुळे अशा अंदाज वर्तवणारांवर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो. हे निवडणूकपूर्व अंदाज वर्तवणारे कोणत्या परिस्थितीत रस्त्यावर उतरून सर्वेक्षण करायला गेले आहेत हेही महत्वाचे असणार आहे. आता आज निवडणुका झाल्या तर आजचा प्रश्न नेमका काय आहे? त्यावरून मतदार प्रभावित होऊन काहीतरी मते व्यक्त करेल. पण त्यावेळी केलेली त्याची मते ही निवडणुकीपर्यंत कायम राहतीलच याचा काय भरवसा आहे? आता गेले दोन महिने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्दा गाजतो आहे. पेट्रोल शंभरी पार करणार इथंपासून ते शंभरी पार केल्यानंतर पेट्रोलपंपावर ती यंत्रणा नसल्यामुळे निर्माण होणारे प्रश्न इथंपर्यंत सर्वानी चर्चा केली आहे. त्याचवेळी अमेरिकेने केलेली कोंडी, आखाती राष्ट्रांकडून वाढवल्या गेलेल्या तेलाच्या किमती याचा परिणाम याचीही चर्चा होत आहे. सामान्य माणूस महागाईने गांजला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम तो भोगत असतानाच त्याच्यासमोर अंदाजवाले गेले आणि आज मतदान झाले तर काय कराल असे विचारले तर तो सामान्य माणूस सरकारला दोष देणार आहे, शिव्या घालणार आहे, संताप व्यक्त करणार आहे, त्यांना खाली खेचा म्हणणार आहे. पण हे फक्त संतापाच्या भरात घडते. संताप आणि शांत मन यात हाच फरक असतो. निवडणुकीला मतदान करायला जाताना तो शांत मनाने जात असतो, त्यामुळे तो यातले काहीही करत नाही. त्यावेळी त्याने विचार केलेला असतो की आपण हे सरकार बदलले तरी नवीन आलेले सरकार थोडेच पेट्रोल डिझेलची दरवाढ रोखू शकणार आहे? जे सरकारच्या हातातच नाही, जे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे घडत आहे त्याचे खापर सरकारच्या माथी का फोडायचे? या विचाराने तो मतदान करतो आणि मतदानपूर्व अंदाज वर्तवणारांचा पार पोपट करून टाकतो.असे वर्तवले जाणारे अंदाज आणि त्यातील मते यांना कसलाही शास्त्रीय आधार नसतो. या सगळ्या जर तरच्या गोष्टी असतात. त्यामुळे ज्योतिषांची भाकिते जशी नेहमीच खोटी ठरतात त्याचप्रमाणे ही भाकितेही खोटी ठरताना दिसतात. पंचवीस तीस वर्षापूर्वी निवडणूकपूर्व ज्योतिषशास्त्रीय अंदाज वर्तवले जात असत. मोठमोठय़ा नेत्यांच्या कुंडल्या, टॅरोकार्ड, अर्ज भरण्याची वेळ अशा अनेक गोष्टींवरून हे अंदाज वर्तवले जात होते. १९९१ च्या निवडणुकीत एका ज्योतिषाने जनता दलाचे सरकार जाऊन आता पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल असे म्हटले होते. राजीव गांधी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील असे ठामपणे सांगितले होते. दुसरीकडे दुस-या एका ज्योतिषाने भारतीय जनता पक्ष सत्तेवर येईल असे सांगितले होते. पण नेमका त्या निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा होण्यापूर्वीच प्रचारसभेदरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. पुढचा टप्पा, मतमोजणी महिनाभर पुढे गेली आणि गणितच बदलले. लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला आणि काँग्रेसने अल्पमतातील पाच वर्ष सरकार चालवले. त्याचे नेतृत्व नरसिंहराव यांनी केले होते. पण कोणत्याही ज्योतिषाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला नव्हता. त्यापैकी एका ज्योतिषाला विचारले की, काय हो, तुम्ही भविष्य सांगता, जाणता मग राजीव गांधीची हत्या होणार आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे याबाबत तुम्ही भविष्य का सांगितले नाहीत? तसे झाले असते तर राजीव गांधींचा जीव वाचला असता ना? त्यावेळी त्या लबाड ज्योतिषाने दिलेले उत्तर चक्रावून सोडणारे होते. तो म्हणाला, राजीव गांधींच्या कुंडलीत मृत्यू योग नव्हताच. त्यामुळे त्यांचा मृत्यू होणारच नव्हता. पण मी नंतर सोनिया गांधींची कुंडली पाहिली, त्यामध्ये त्यांच्या कुंडलीत वैधव्य योग होता त्यामुळे ही हत्या झाली. म्हणजे हे असे ज्योतिषी आपले अंदाज चुकल्यावर सारवासारव करतात. तसाच प्रकार या सर्वेक्षण करणारांच्या बाबतीत होताना दिसतो आहे. त्यामुळेच त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, ती खरी किती खोटी किती याचा विचार केला पाहिजे. पण वाहिन्यांना दोन-तास टाईमपास करायला एक संधी मिळते या पलिकडे या अंदाजांना काहीही अर्थ नाही.
रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८
निवडणूक पूर्व सर्वेक्षण किती खरे, किती खोटे ?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा