आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय यावेळी चर्चा करण्यात आली. मतदारसंघाच्या वाटपाबाबत मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ही केवळ प्राथमिक चर्चा आहे. अन्य समविचारी पक्षांचाही आम्ही विचार करणार आहोत, अशी माहितीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली. पण, ही आघाडी करून काँग्रेस अथवा अन्य पक्षांबरोबर जाण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. काँग्रेस अद्याप त्याबाबतीत फारसा प्रतिसाद देत नाही. याचे कारण शरद पवारांचे राजकारण सर्वाना माहिती आहे. काँग्रेसचा फायदा ते घेतील, पण काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्नही तेच करतील. कारण, राज्यात काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवून मोठय़ा भावाची भूमिका करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. या महत्त्वाकांक्षेपोटीच शरद पवारांनी ४८ जागांचा फॉर्म्युला ठरवला आहे. किमान दोन अंकी संख्या गाठायचीच या इराद्याने ते उमेदवार मिळवू पाहत आहेत. यासाठी सर्वात प्रथम त्यांनी स्वत:च्याच नावाची चाचपणी केली. पुण्यातून ही चाचपणी केली आणि डाळ शिजणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी माघार घेतली हे लक्षात घेतले पाहिजे.आपल्या काही निवडक पत्रकार मित्रांना बोलावून शरद पवारांनी ते पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याचे पिल्लू सोडले. पक्षाच्या अन्य उमेदवारांची आणि बालेकिल्ल्यातील उमेदवारांची चर्चा करण्यापूर्वीच आपला खुंटा हलवून बळकट होतो आहे का पाहिले, पण तो खुंटा अगदीच तकलादू भुसभुशीत जागेत असल्याची जाणीव होताच त्यांनी माघार घेतली. शरद पवार पुण्यातून लढणार ही खरी बातमी होती. त्यासाठी काँग्रेसकडून जागा मागून घेण्यासाठी तो दबावही होता. पण, शरद पवार हे कायम बारामती मतदारसंघातून लढले आहेत. एकवेळा ते माढा मतदारसंघातून लढले कारण, त्यांना आपले सुप्रिया कार्ड पुढे करायचे होते. माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी पोषक होता, त्यावेळी मोहिते पाटील यांची मदत होणार हे माहिती होते, त्यामुळे ते तिथून निवडून आले. नंतर मात्र बारामतीशिवाय आपण कुठेही निवडून येणार नाही याची त्यांना जाणीव झाली होती. त्यातच २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट आली होती. भलेभले त्या लाटेत पडणार याची जाणीव त्यांच्यासारख्या जाणत्या राजाला होतीच, त्यामुळे माढा किंवा अन्य कुठूनही न लढता राज्यसभेवर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कारण, पराभव त्यांनी आजवर कधी पाहिलेला नाही.या वयात पराभव स्वीकारण्याची मानसिकता नाही आणि त्यामुळेच त्यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय तेव्हा घेतला होता; परंतु आता थोडे सरकारविरोधी वातावरण तयार झाले असावे, असे त्यांना वाटले आणि आपल्यासाठी मतदारसंघाची चाचपणी त्यांनी सुरू केली. त्यासाठी पुण्याची निवड करण्याचा प्रयत्न केला. काही जवळच्या पत्रकारांकरवी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी बातमी पसरवली. साधारण कानोसा घेण्यासाठी त्यांनी ही खेळी केली खरी, पण तीच त्यांच्या अंगलट आली आणि मी पुण्यातून निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री अशा अनेक पदावर काम केलेले शरद पवार जर पुण्यातून लढले असते, तर कोणाची काहीच अडचण असायचे कारण नव्हते. पण, स्वत:च केलेल्या खड्डय़ात स्वत:च पडण्याची पाळी त्यांच्यावर आली अन् माघार घ्यावी लागली. शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची बातमी हा हा करता सगळीकडे पसरली आणि पुणेकरांनी शरद पवारांवर चौफेर हल्ले चढवण्यास सुरुवात केली. पुणेकरांना तसा उपरा उमेदवार कधीच मान्य होत नाही. याची दोन मोठी उदाहरणे म्हणजे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ विरुद्ध जगन्नाथ जोशी आणि २०१४ ची अनिल शिरोळे विरुद्ध विश्वजित कदम यांच्यातील निवडणुका ही आहेत. एकात काँग्रेसचा फायदा झाला, तर एकात भारतीय जनता पक्षाचा. बॅ. विठ्ठलराव गाडगीळांचे पुणे लोकसभा मतदारसंघात चांगले वर्चस्व असताना त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने जगन्नाथराव जोशी यांना उभे केले. जगन्नाथराव जोशी मोठे होते, अगोदरही ते खासदार होते, संघाचे कार्यकर्ते होते, पण त्यापूर्वी ते भोपाळमधून निवडून आलेले होते. मूळचे कर्नाटकातील आहेत, हा विचार त्यावेळी कोणी केला नाही. भाजपने आपल्या पद्धतीने प्रचार करून आता बॅ. गाडगीळांचे डिपॉझीट तरी वाचणार का, अशी हवा केली होती. पण, पुणेकरांनी अस्सल पुणेकर विद्वान म्हणून बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांना विक्रमी मतांनी निवडून दिले आणि भाजपचा भ्रमनिरास केला.२०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हे अनिल शिरोळे होते. दीर्घकाळ पुण्यातील नगरसेवक असलेल्या शिरोळे यांच्या तुलनेत काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम हे तगडे होते. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद होते. पतंगराव कदम यांच्या शिक्षण सम्राटपदाची पुण्याई होती. पैसा, प्रसिद्धी कशातच कमी नव्हते. त्यामुळे विश्वजित कदम विजयी होतील, अशी भावना सगळय़ांची होती. मात्र, ते सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करण्यासाठी जाणार आहेत अशी बातमी आली. कारण, ते स्थानिक नाहीत. त्यामुळे पुणेकरांनी आपली अस्मिता जपली आणि लाखांच्या फरकाने त्यांना पराभूत केले.पुणेकरांची निष्ठा स्थानिकतेशी असते, पुणेकर असण्याशी असते. त्यामुळे शरद पवारांनी जेव्हा पुण्यातून निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा पुणेकर पेटून उठले. सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यात नुकताच पगडीचा अपमान केल्यामुळे पगडीचा हिसका दाखवणार, अशा प्रतिक्रिया येत राहिल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात असतानाच, त्यांनी आर्थिक आरक्षण मिळावे असे पिल्लू सोडून त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक कारणांनी दुखावलेला तरुणवर्ग पेटून उठला आणि पवार विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. त्याचा धसका पवारांनी घेतला आणि पुण्यात लुडबूड करायला नको, गडय़ा आपुला गाव बरा, म्हणत माघार घेतली.
सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८
म्हणून शरद पवारांनी माघार घेतली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा