कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे घालून येणा-या भाविकांना प्रवेश न देण्याचा निर्णय पश्चिम देवस्थान समितीने घेतला आहे. त्यावरून आता विनाकारण वादविवाद सुरू झाले आहेत. हा निर्णय देवस्थान समितीने नवरात्रोत्सवापूर्वी मागे घ्यावा; अन्यथा समिती सदस्यांना चोप देऊ, असा धमकीवजा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. तर, मंदिर व्यवस्थापनाने मात्र आपण निर्णयावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली आहे. केवळ वादासाठी वाद घालण्यापेक्षा आपली संस्कृती आणि संस्काराला अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे.तोकडे कपडे घालून येणा-या भाविकांना अडवून मंदिरात न जाण्याची विनंती आम्ही करू, तसेच ते कपडे बदलण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था केली जाईल, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे यात काही गैर आहे असे वाटत नाही. दक्षिणेतील बहुतेक मंदिरांमध्ये अगदी केरळच्या गुरुवायूर मंदिरातही पुरुषांना पँट-शर्ट घालून जाता येत नाही. लांबलचक किलोमीटरची रांग असते. या रांगेच्या दुतर्फा लुंगी धोतर आणि चेंचिंग रूमची सोय केलेली असते. तिथे सगळे पँटवाले पुरुष लुंगी घालून उघडय़ानेच दर्शनाला जातात. त्या ठिकाणी पांढरी लुंगी घालून जाण्यात किंवा उघडय़ाने मंदिरात दर्शनासाठी जाण्यात कोणालाही गैर वाटत नाही. त्याचप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये चामडय़ाच्या वस्तू घालण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे पँट घालून कोणाला प्रवेश दिला तर कमरेचा पट्टा आणि खिशातील पाकीट, पर्स अशा चामडय़ाच्या वस्तू जमा करून घेतल्या जातात. त्यालाही कोणी विरोध करत नाही.असे असताना कोल्हापूरच्या मंदिरात जर कोणी पूर्ण पोशाखात येण्याचा आग्रह धरला तर त्यात गैर काहीही नाही. प्रत्येक गोष्टीचे काही वैशिष्टय़ असते, स्थान महात्म असते, दिन महात्म्य असते, त्याप्रमाणे वागणे हेच उचित असते. तोकडे कपडे आपण फिरायला जाताना, पिकनिकला जाताना, पार्टीला जाताना वापरतो. कपडय़ांची काही सभ्यता असते. त्यामुळे मंदिरात येताना जर पूर्ण आणि सभ्य कपडय़ाची अपेक्षा केली तर त्यात काही गैर आहे, असे वाटत नाही. आपल्याकडे कोणत्याही कार्यालयात फॉर्मल कपडेच चालतात. यापूर्वी न्यायालयात जीन्स घालून येऊ नये असाही सल्ला दिला गेला होता. आपल्याकडे कोणत्याही कार्यालयात तोकडय़ा कपडय़ात आलेला कर्मचारी चालत नाही. कारण ऑफिसची अशी काही शिस्त असते. आपण बँकेत किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर तिथले अधिकारी विशिष्ट अशा पेहेरावातच आपल्याला योग्य वाटतात. कारण ही त्या त्या जागेची, कार्याची, कार्यालयाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे मंदिराचेही असे एक स्थान आहे की जिथे ठरावीक प्रकारेच जाणे योग्य असते. त्यामुळे तोकडय़ा कपडय़ांना केलेला विरोध हे गैर नाही.मात्र, मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी लढा देणा-या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या निर्णयावरून भारतीय जनता पक्षावरही आरोपाची राळ उठवली आहे. कोल्हापूर देवस्थानचे अध्यक्ष हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजप स्वत: पुढे येऊन अशाप्रकारचा निर्णय घेऊ शकत नसल्याने त्यांच्याकडून समितीचा आधार घेतला जात आहे. मंदिरात येणा-या कोणत्याही भाविकाच्या कपडय़ांवरून त्याची भक्ती ठरवली जाऊ नये. आमचा या निर्णयाला ठाम विरोध आहे. महिला भाविकांना साडी घालून मंदिरात प्रवेश देणे म्हणजे एक प्रकारचा फतवाच आहे, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.परंतु या निर्णयात साडी परिधान करण्याची सक्ती नाही हे तृप्तीताईंनी लक्षात घेतले पाहिजे. पूर्ण पोशाखात म्हणजे कोणताही भारतीय पोशाख चालू शकतो. पंजाबी ड्रेस, सलवार कुडता, जीन्स टॉप किंवा चनिया चोली, गुजराती, राजस्थानी कसलाही पोशाख चालेल. फक्त तो पूर्ण असावा ही अपेक्षा आहे. तृप्तीताईंनी आजवर दिलेले लढे हे कौतुकास्पद आहेत; परंतु असा जर योग्य निर्णय असेल तर त्याला केवळ विरोधासाठी विरोध म्हणून आग्रही राहू नये. तोकडे कपडे हे फक्त महिलांसाठीच नाहीत तर पुरुषही तोकडे कपडे घालून बागेत, पिकनिकला हिंडत असतात. बम्र्युडा, स्लीवलेस, टी शर्ट असले प्रकार घालून हिंडणारे पुरुषही अशा निर्णयाला पात्र ठरतील हे लक्षात घेतले पाहिजे. मंदिराचे एक पावित्र्य असते. मंदिरात जाताना मनुष्याच्या मनात भक्तिभाव निर्माण होणे अपेक्षित असते. बाकीच्यांचे लक्ष वेधून घेणारे पोशाख, काहीतरी वेगळेपण दाखवणे हे योग्यच नाही. म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवे. कोल्हापूरच्या गाभा-यात मंदिर प्रवेशाच्या वेळी तृप्तीताईंनी दिलेला लढा हा महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी तो आपल्या कर्तृत्वाने जिंकला. तेव्हा तेथील पुजा-यांनी साडीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असा आग्रह केला होता; परंतु तो विरोध झुगारून तृप्ती देसाई यांनी सलवार कमीज, पंजाबी ड्रेस हा भारतीय पोशाख आहे सांगून त्याला मान्यता मिळवली होती. त्यानंतर कोल्हापुरातील पुजारी हे सर्व जाती-धर्माचे झालेले आहेत. अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही झालेले आहेत. प्रसादाचे लाडूही कैद्यांकडून करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या मंदिराने घेतला आहे.पूर्णपणे पुरोगामी अशा विचारानेच ते मंदिर आता चालवले जात आहे. त्यामुळे पूर्ण पोशाखाची केलेली अपेक्षा ही फक्त महिलांसाठी नाही तर सर्वासाठी स्त्रीया-पुरुष यांच्यासाठी आहे हे लक्षात घेऊन आपल्या मंदिराचे पावित्र्य जपण्याचे धोरण स्वीकारण्यास काहीच हरकत नाही. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी योग्य पोशाख असावा, अशा प्रकारच्या अनेक सूचना मंदिर ट्रस्टला देशभरातून आल्या होत्या असे विश्वस्तांचे मत आहे. कुणी तोकडे कपडे घालून आल्यास आम्ही त्यांच्यासाठी चेंजिंग रूमची व्यवस्थाही करू, असे समितीने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे सर्व व्यवस्था असेल तर या परंपरेला छेद देण्याची गरज नाही.