दस-याच्या दिवशी अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताचे पडसाद अजूनही उमटत आहेत. खरे तर याला अपघात म्हणताच येणार नाही. याला आत्मघात असेच म्हणावे लागेल. कायद्यानुसार रेल्वे रुळावर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. या दुर्घटनेत रेल्वे प्रवाशांचा बळी गेलेला नसून रुळांवर उभे राहणा-या नागरिकांचा बळी गेला आहे. रेल्वे रुळावरून घसरणे किंवा दुस-या रेल्वेला धडकणे, चुकीच्या सिग्नलमुळे अपघात होणे किंवा घातपात होणे अशा कारणांनी झालेल्या प्राणहानीबद्दल रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरता येते. पण अमृतसरमध्ये झालेल्या दुर्घटनेतील प्राणहानीबद्दल रेल्वेला जबाबदार धरता येणार नाही. रेल्वेचे रूळ ही मुळातच धोकादायक बाब असते, हे माहीत असूनही शेकडो लोक रुळांवर उभे राहून रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असतील, तर नंतरच्या घटनेला ते स्वत:च जबाबदार आहेत, असा निष्कर्ष निघतो. रावण दहनाचा कार्यक्रम दर वर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी कोणतेही नियोजन नव्हते. कार्यक्रम पाहणा-या लोकांच्या बसण्याची व्यवस्था न केल्यानेच त्यांना रुळावर उभे राहावे लागले आणि तेथे त्यांनी उभे राहू नये म्हणून प्रशासनाने कोणतीही काळजी घेतली नव्हती, असेच प्रथमदर्शनी दिसून येत आहे.त्यामुळे या अपघाताची जबाबदारी स्थानिक प्रशासनानेच घ्यायला हवी. अर्थात दुसरीकडे लोकांनीही जबाबदारीने वागायला हवे होते. लोकांचा बेजबाबदारपणा अपघातानंतरही समोर आला होता. तेथे उपस्थित लोक कार्यक्रमाचे फोटो आणि रेल्वे ट्रॅकवर उभे राहून सेल्फी काढण्यात व्यग्र होते. त्यामुळे हा अपघात कसा झाला कोणालाच कळले नाही. रेल्वे लोकांच्या अंगावरून गेली असतानाही लोक मोबाईल काढून शूटिंग करत होते. हा शुद्ध बेजबाबदारपणा आहे. रेल्वेच्या हद्दीत घुसण्याचा अधिकार कोणालाच नाही. असे असतानाही शेकडो माणसे रावण दहनाच्या कार्यक्रमाला रेल्वे मार्गावर घुसतात. रेल्वे रुळांवर उभे राहतात. रेल्वेच्या इंजिनाच्या चालकाना हिरवा सिग्नल असल्याने त्याला नियमानुसार पुढे जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे समजते आणि तो सुसाट गाडी घेऊन जात असतो. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली, तर नंतर ओरडण्यात काय अर्थ आहे? या आत्मघाताची सगळी जबाबदारी ही तेथील संयोजकांची आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांची आहे. साधारणपणे ज्या गावाजवळून रेल्वे लाईन जाते त्या गावातल्या लहान मुलापासून सर्वाना कोणत्या वेळी ट्रेन येते, किती वाजता येते, त्या ट्रेनचे नाव काय, फाटक केव्हा बंद होते हे सगळे माहिती असते. बाहेर जाण्याचे मार्ग, वेळा, बसच्या वेळा, रिक्षाच्या वेळा या त्याप्रमाणे ठरवलेल्या असतात. गावाबाहेर जाताना किती वाजता बाहेर पडले म्हणजे रेल्वे लाईन क्रॉस करताना फाटक आडवे येणार नाही आणि वाट पाहत थांबावे लागणार नाही हे सगळे गावक-यांना, स्थानिकांना माहिती असते.भारतात हजारो-लाखो गावे, खेडी ही अशी रेल्वेलाईनच्या आजूबाजूला आहेत, त्यांना ही माहिती असते. त्यामुळे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथील लोकांना रेल्वे येण्याची वेळ माहिती नसेल हे म्हणताच येणार नाही. जे या दुर्घटनेत मृत झाले त्यांच्याबद्दल दु:ख आहेच. पण त्यासाठी रेल्वेला दोषी ठरवणे, रेल्वेच्या माथी या अपघाताचे खापर फोडणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. त्यावरून संतप्त जमावाने केबिनमधल्या कर्मचा-याला मारले, तोडफोड केली. त्या रेल्वेचालकालाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्या चालकाने दिलेल्या जबाबाप्रमाणे जर रेल्वे थांबवली असती तर रेल्वेतील हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता, असे वातावरण होते. त्यामुळे कोणताही पर्याय नसल्याने रेल्वे न्यावी लागली असे त्याचे म्हणणे आहे. रेल्वेचा अचानक ब्रेक लावणे सोपे नसते. हे पाहता अवैधपणे रेल्वेमार्गावर अतिक्रमण करणारे, रेल्वे रुळाचा चुकीचा वापर करणारे यात दोषी आहेत. असे प्रकार सातत्याने होत असतात. रेल्वे किंवा मुंबईच्या लोकलवरही सातत्याने उद्घोषणा केली जात असते. रेल्वेलाईन ओलांडण्यासाठी पुलाचा अथवा सब-वेचा वापर करा. तरीही लोक प्लॅटफॉर्मवरून उडी मारून जा-ये करत असतात. अशावेळी अपघात झाला तर त्याला रेल्वेला जबाबदार धरून चालणार नाही. आपल्याकडे जिथे जिथे रेल्वेलाईन आहेत, त्याच्या जवळपासची माणसे नेहमीच समोरून रेल्वे येताना दिसली तरी रेल्वेलाईन ओलांडण्याचा प्रयत्न करतात. फाटक पडले असले तरी खाली वाकून सायकली, दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी अपघात घडत असतात. हा त्या माणसांचा बेजबाबदारपणा आहे.रेल्वेलाईनचा वापर ग्रामीण भागातून किती प्रकारे केला जातो, त्याचा दुरुपयोग कसा केला जातो हे अनेकवेळा समोर आलेले आहे. गावात गुरे, गाई-म्हैशी रानात चरायला नेताना रेल्वेखाली येऊन म्हैशी, गुरे मेल्याच्या घटनाही अनेकवेळा पाहायला मिळतात. अशा गुरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रेल्वेची नाही, तर ती आपली आहे. रावण दहनाच्या वेळी संयोजकांनी रेल्वेलाईनवर कुणीही जाऊ नका, असे सांगितले होते, असे म्हणतात. तरीही इतका मोठा जमाव तिथे कसा काय गेला? हे सगळेच संशयास्पद आणि धक्कादायक आहे. संयोजकांना कार्यक्रमाची आखणी करताना किती वेळ कार्यक्रम चालणार हे माहिती असते. त्या वेळेत किती वेळा रेल्वे या मार्गावरून धावणार आहेत हे माहिती असणारच. असे असताना हा प्रकार घडणे म्हणजे पूर्णपणे निष्काळजीपणा आहे. निष्काळजीपणाची मोठी किंमत या लोकांना चुकवावी लागली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. हे सगळे खरे असले तरी या घटनेला रेल्वेला जबाबदार धरता येणार नाही. एकतर रेल्वेमार्गाच्या इतक्या जवळ असे कार्यक्रम सादरच कसे केले जातात? यावेळी आणखीही अपघात घडू शकले असते. त्या शोभेच्या दारूतून, आतषबाजीतून समजा काही बाण, फटाके रेल्वेवर पडले असते तर आपल्याला बर्निग ट्रेनही बघावी लागली असती. या घटनेनंतर अमृतसरच्या नागरिकांनी, जमावाने नंतर दगडफेक करणे, बंद करणे, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागणे हे सगळेच चुकीचे आहे. त्यांना काय हवे होते? रेल्वेकडून, सरकारकडून नुकसानभरपाई? आपल्या चुकीने जीव गमवायचा आणि सरकारकडून मदतीची अपेक्षा करणे किती बरोबर आहे याचा विचार व्हायला हवा. रेल्वेलाईन ओलांडताना सावधगिरी ही घेतलीच पाहिजे. आपल्या दुर्लक्ष, गलथानपणाचे खापर रेल्वेच्या माथी फोडण्याचे राजकारण करता कामा नये.