दरवर्षी नवरात्र बसावे आणि दहाव्या दिवशी ते उठावे त्याप्रमाणे भारतीय राजकारणात एक नवरात्र दरवर्षी बसते. या नवरात्राची धूम एकेकाळी फार मोठी होती, पण त्यावरचा लोकांचा विश्वास उडाल्याने आता त्याची फारशी कोणाला दखल घ्यावीशीही वाटत नाही, तशी आता गरजही राहिलेली नाही. ते नवरात्र म्हणजे अण्णा हजारेंचे आंदोलन. आपण आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आणि आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्यासाठी ते गेली काही वर्षे सातत्याने ९ ऑगस्ट, २ ऑक्टोबर अशा क्रांती दिन, गांधी जयंतीचे औचित्य साधून आपल्या आंदोलनाची घोषणा करतात. ते आंदोलनाला बसेपर्यंत आणि त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पहिले चार-पाच दिवस त्यांची कोणीही दखल घेत नाही. मग पाचव्या दिवसांनंतर अण्णांचे वजन इतके घटले, त्यांना तितका ताप आला वगैरे बातम्या येऊ लागतात. पण त्यांच्या या सातत्याने होणा-या निर्थक आंदोलनामुळे त्यांचे प्रत्यक्षातील वजन इतके घटले आहे की ही आंदोलने हास्यास्पद होताना दिसत आहेत. त्यांच्या आंदोलनाला होणारी गर्दी कमी झाली, त्यांच्या आंदोलनाचा फोलपणा समजल्यामुळे आणि त्यांच्या देखाव्यामुळे ते अगदीच अदखलपात्र झाले आहेत. आता काकुळतीला येऊन आमची दखल घ्या आणि आंदोलन करू नका अशी विनंती करायला या असे सरकारला सांगायची वेळ अण्णांवर आली आहे.भाजप सरकारसाठीही हे पोषक वातावरण होते आहे. त्यामुळे अण्णांचे आंदोलन म्हणजे सरकार आणि अण्णा हजारे यांच्यातील मिलीभगत असल्याचाच संदेश सर्वत्र पोहोचला आहे. हा निष्कर्ष खोटाही नाही. आंदोलनाला पाच दिवस झाल्यानंतरही दखल न घेणारे सरकार आंदोलन पुकारल्यावर, घोषणा केल्यावर ते सुरू होण्यापूर्वीच सरकार, त्यांचे मंत्री दखल घेतात हे कोणाला पटणारे आहे? भाजपचे आंदोलन मिटवणारे मंत्री म्हणून ख्याती निर्माण करू पाहत असलेले गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली आणि अण्णांनी सुरू होण्यापूर्वीच आंदोलन मागे घेतले गेले. अण्णांच्या या पूर्वीच्या आंदोलनात आंदोलन करू नका अशी विनंती आर. आर. (आबा) पाटील या सभ्य मंत्र्याने त्यांच्यापाशी जाऊन केल्यावरही त्याची दखल न घेणारे अण्णा मात्र गिरीश महाजन यांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच भेट काय घेतली आणि आंदोलन मागे घेतले, यामागचा दिखावा आणि नाटक सहज समजण्यासारखे आहे.भारतीय जनता पक्षाला उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांचे वजन कमी करून त्यांना पर्याय निर्माण करायचा आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरात गिरीश महाजन हा मोहरा भाजपला मिळाला आहे. शेतक-यांचे आंदोलन असो किंवा खा. राजू शेट्टी यांनी केलेले दुधाचे आंदोलन असो, त्या प्रत्येकवेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून चर्चेला गिरीश महाजन यांना पाठवण्यात आले आहे. पण त्यासाठी ही आंदोलने व्यापक प्रमाणात होऊ दिली. नाशिकपासून मोर्चेकरी शेतकरी पायाला जखमा करून घेऊन चालत मुंबईत धडकले, दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतून द्यावे लागले, आंदोलन उग्र करावे लागले तेव्हा सरकारने त्याची दखल घेतली. गिरीश महाजन यांना चर्चेला पाठवले, मागण्या मान्य केल्याचे घोषित केले गेले. असे असताना अण्णांचे आंदोलन सुरूही झाले नाही तर त्यांना भेटायला गिरीश महाजन कसे काय गेले? हा सगळाच फार्स वाटतो. नौटंकी वाटते. केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट वाटतो. २०११च्या आंदोलनातून अण्णांच्या मंचावरून ‘आम आदमी पार्टी’ची निर्मिती झाली. त्या पार्टीनेही अण्णांना आता टाळले आहे. त्यांच्या मंचावर असणारे किरण बेदी, मेधा पाटकर अशा अनेकांनी अण्णांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. कारण अण्णांची ढोंगबाजी आता सर्वानाच कळून चुकली आहे. त्यामुळे आता सर्वत्र बेदखल झालेले अण्णाच आता मी आंदोलन मागे घेतो कुणीतरी अगोदरच मला विनंती करा म्हणून टाहो फोडतात का, असा संशय आल्यावाचून राहवत नाही.अण्णांची थोरवी २०११ ला इतकी वाढली होती की जगभर त्यांची चर्चा झाली. पण त्या आंदोलनाचा फायदा विरोधक असलेल्या भाजपने करून घेतल्यावर आणि काँग्रेसला सत्तेवरून दूर केल्यानंतर अण्णांनी निर्माण केलेल्या वादळाशी कृतज्ञता म्हणून भाजपला हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मिटवणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे अण्णांची थोरवी वाढवण्यासाठी अतिउत्साही कार्यकर्त्यांनाही इतका ऊत आला होता की, त्यांच्या राळेगणसिद्धी या गावातील लोकांनी अण्णांना महात्मा ही पदवी देऊन टाकली. अण्णांना महात्मा बनवण्यासाठी, दुसरा गांधी तयार करण्यासाठी चाललेला हा खटाटोप अत्यंत हास्यास्पद आहे. म्हणजे काँग्रेसचा गांधी म्हणजे महत्मा गांधी. आम्ही गांधी विचाराने जातो असे म्हणत राजकारण काँग्रेसने आजवर केले. आता भाजपला महात्मा गांधी जवळ करता येत नाहीत म्हणून त्यांनी अण्णा हजारे नावाचा नवा गांधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अण्णांना त्यांच्या गावक-यांनी महात्मा अण्णा हजारे अशी पदवी दिली होती.परंतु महात्मा ही पदवी मिळण्याइतकी थोरवी अण्णांची आहे काय हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला तर प्रत्येकाचे उत्तर ‘नाही’ असेच येईल. कुठे महात्मा जोतिराव फुले, कुठे महात्मा मोहनदास करमचंद गांधी आणि कुठे अण्णा हजारे? पण राजकारणात राजकीय पक्षांना असा एखादा नेता लागतो. एखादा धार्मिक, आध्यात्मिक गुरू लागतो. त्यामुळे अशाप्रकारे अण्णांचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. चार वर्षे झाली हे सरकार येऊन, मग चार वर्षात लोकपाल विधेयकाबाबत काही वाच्यता केली नाही. भ्रष्टाचारावरच बोलायचे हे अण्णांचे ब्रिद असल्यामुळे त्यांना गेल्या चार वर्षात कसलीही संधी मिळाली नाही. त्यामुळे भाजपच्या सरकारमध्ये कसलाही भ्रष्टाचार नाही, असे अलिखित प्रमाणपत्रच अण्णांनी दिल्याचे दिसते आहे. पण या एकूणच प्रकारात अण्णा लोकशाही मूल्य, पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती याबाबत अवाक्षर काढत नाहीत. त्यामुळे अण्णांना हायजॅक करून भाजपने त्यांना महात्मा बनवल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. त्यामुळेच तर हा आंदोलनाचा देखावा केला गेला आणि सुरू होण्यापूर्वीच त्यांच आंदोलन संपुष्टात आणले गेले.
बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८
विश्वास गमावलेला राळेगणचा ‘महात्मा’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा