दस-याच्या दिवशी शोभेच्या दारूचे प्रदर्शन करून रावण दहन करण्याची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे; परंतु आता या परंपरेला विरोध केला जात आहे. जुन्या परंपरा वाईट असतील तर त्या जरूर बंद कराव्यात पण ज्या परंपरांचा संबंध आनंदोत्सवाशी आहे त्यावर विनाकारण वाद घालण्याची गरज नाही. सीतेचे अपहरण करणा-या रावणाला काय शिक्षा दिली पाहिजे हे आज मीटू आणि सामूहिक बलात्काराची प्रकरणे गाजत असताना सांगण्याची वेळ आलेली आहे.नाशिकमध्ये रावण दहनास आदिवासी बचाव अभियान व कोकणी आदिवासी सेवा संघाने विरोध दर्शवला आहे. यापाठोपाठ आता पुण्यातही रावण दहनास विरोध सुरू झाला आहे. आदिवासी तसेच मागासवर्गीय समाजातील अनेकांसाठी रावण दैवत आहे, रावण दहनाच्या कार्यक्रमांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा कार्यक्रमांना परवानगीच देऊ नये, अशी मागणी केली जात आहे. राज्याच्या अन्य भागांमध्येही वेगवेगळ्या संघटनांनी या संदर्भातील पत्र दिल्याने रावण दहनावरून महाराष्ट्रात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पण या गोष्टीचे राजकारण करण्याचे कारण नाही. रावणाच्या विद्वत्तेबद्दल, कोणीच शंका घेत नाही. रावण हा खूप महान होता हे पुराणातून नेहमीच दिसून आलेले आहे; परंतु रावण दहन हे दस-याला केले जाते ते वाईट प्रवृत्तींवर सतप्रवृत्तींनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून. दस-या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, त्याचे प्रतीक म्हणून हा सोहळा अनेक ठिकाणी केला जातो. रामाने रावणाला ठार केले ते एका महिलेचे अपहरण केले म्हणून. केवळ रामाची पत्नी पळवली म्हणून त्याला शासन केले नाही तर रावणातील दुष्ट प्रवृत्तींचे अनुकरण होऊ नये, अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळू नये म्हणून त्याचा वध केला. अशाप्रकारे दुष्कर्म करणा-या प्रवृत्तींचा नाश हा व्हायलाच पाहिजे. त्यामुळे त्याचे विनाकारण राजकारण करून त्याला कोणत्याही संघटनेने जातीय, सामाजिक स्वरूप देऊ नये.या रावण दहनाबाबत आज विविध आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमधील आदिवासी समाजात रावणाला दैवत मानले जाते. तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये रावणाची मंदिरे देखील आहेत. रावण हा महान राजा होता. मात्र, इतिहासात रावणाची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली. रावण हा खलनायक होता, हा दावाच चुकीचा आहे, असे या संघटनांचे म्हणणे आहे; परंतु हे या संघटनांचे म्हणणे चुकीचे आहे. रावणाची महानता कुठेही यामुळे कमी होत नाही. रावणाचे श्रेष्ठत्व साक्षात रामानेही मान्य केलेले होते. त्याचे औदार्य आणि मोठेपणाही रामाने जाणला होता. लंकेत जाण्यासाठी सेतू बांधायचा हौता तेव्हा रामेश्वराची निर्मिती रामाने केली. त्यावेळी रामेश्वराची पूजा करण्यासाठी पौरोहित्य करण्यासाठी कोणी ब्राह्मण पुरोहित तिथे नव्हता. गुप्त मार्गाने येऊन हेरगिरी करण्यासाठी त्या ठिकाणी रावण आला होता. तेव्हा राम आणि रावण या दोघांनीही एकमेकांना ओळखले होते. परंतु पुरोहिताशिवाय रामाची पूजा अपूर्ण राहू नये म्हणून रावणाने या पूजेचे पौरोहित्य केले होते, अशीही एक आख्यायिका आहे. हा रामेश्वर लंकेत येऊन लढण्यासाठी बांधण्यात येणा-या सेतूसाठी असलेला संकल्प आहे हे माहिती असूनही रावणाने मोठय़ा मनाने हे पौरोहित्य केले होते. त्यावेळी अशा रावणाला रामाने मारलेले नाही. तर त्याच्यातील दुष्ट प्रवृत्ती, अहंकार याचा नाश करण्यासाठी त्याने त्याचा वध केला होता. इतकेच नाही तर रावणाचे महत्त्व रामाइतके कोणी जाणत नव्हता. म्हणूनच राज्यशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी रामाने लक्ष्मणाला त्याच्याकडे पाठवले होते. त्याचा मृत्यू होण्यापूर्वी हा उपदेश त्याच्याकडून तू घे असे रामाने लक्ष्मणाला सांगितले होते. रावणाचा वध म्हणजे फक्त दुर्गुणांचा नाश केला होता. या दुर्गुणांचा नाश आजही होण्याची गरज आहे.आज मीटूच्या निमित्ताने अनेक रावण पुढे आलेले आहेत. महिलांशी असभ्य वर्तन करणारी प्रवृत्ती बोकाळलेली असताना महिलाची छेडछाड करणे, अपहरण करणे यासाठी काय शिक्षा पाहिजे हे दाखवण्यासाठी रावण दहनाचा सोहळा होणे गरजेचे आहे. रावणातील सद्गुणांचा नाश कधीही होणार नाही, मात्र दुर्गुणांचा नाश हा व्हायलाच पाहिजे. अशा दुर्गुणांचे कोणीही समर्थन करू नये. जे आदिवासी रावणाला देव मानून पूजा करतात ते त्याच्यातील सद्गुणांची पूजा करत असतात. सीतेचे अपहरण करणे आणि अशा प्रवृत्तींचे हे आदिवासी कधीही समर्थन करत नाहीत. रामाला वनवासात असताना अनेक आदिवासी जमातींनी मदत करून रावणाकडे जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे. रावण हा पुलस्य ऋषींचा ब्राह्मण असलेला मुलगा होता. त्यामुळे विनाकारण त्याचा गैरअर्थ काढून रावण दहन करणारांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणे म्हणजे कायद्याचा दुरुपयोग करणे आहे. रावणाची दहा तोंडे म्हणजे त्याची वेगवेगळी विचार करणारी प्रवृत्ती होती. यातील फक्त दुष्प्रवृत्तीचा नाश रामाने केला, तोच दस-याचा सण आहे.वाल्मिकी रामायण हे प्रमाण मानून विचार केला तर त्या रामायणात पूर्णपणे देव, दानव, मानव तिघांना समसमान न्याय दिलेला आहे. रावणाचे श्रेष्ठत्वही तितकेच मानले आहे, मनुष्याचा स्वभावही दाखवला आहे आणि देवांची वृत्तीही दाखवलेली आहे. यातील ३० टक्के रामायणही लोकांना माहिती नसते. परंतु त्याबाबत फक्त वाद निर्माण केला जातो. आपल्या ज्या परंपरा आहेत त्याचा सन्मान राखता आला पाहिजे. दुष्प्रवृत्तींवर विजय ही आपली परंपरा आहे. दुष्ट रावणाचा वध रामाने केला हे रामायण आहे. सुष्ट रावणाला कधीही नाकारलेले नाही. रावणसंहितेच्या रूपाने अनेक तोडगे, औषधी माहिती ही वापरली जात आहे. या ग्रंथाच्या सातत्याने आवृत्त्या निघतात आणि रावणाच्या औषध निर्माणाची माहिती विविध आयुर्वेदिक अभ्यासातही दिली जाते. त्यामुळे या गोष्टीसाठी आकांडतांडव करू नये, असे वाटते. रावण दहन केल्याने दसरा जर आनंदी होत असेल तर त्या आनंदात विघ्न आणू नये.
गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८
रावण दहन म्हणजे दुष्प्रवृतींचा नाश
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा