शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

किती झाले करोडपती, किती झाले रोडपती

२०१७-१८ या आर्थिक वर्षात करोडपतींच्या यादीत भारतातील ७३०० जणांचा समावेश झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. कोणालाही आनंद वाटेल, असेच हे वृत्त आहे. पण, हे काही देशाचे खरे चित्र आहे काय?
१२५ कोटी लोकसंख्या असलेला हा देश. एका कुटुंबात सरासरी ५ माणसे आहेत असा विचार केला, तर २५ कोटी कुटुंबे या देशात आहेत असे गृहीत धरले, तर २५ कोटींपैकी ७ हजार ३०० कुटुंबे करोडपती झाली. मूठभर लोक श्रीमंत होण्याने देशाची समृद्धी कशी मानता येईल? म्हणूनच किती करोडपती झाले, यापेक्षा किती रोडपती झाले हे सांगण्याचे धाडस कोणी करणार आहे का?
७३०० लोकांचा समावेश करोडपतींच्या गटात झाला, हे सांगताना या देशात दारिद्रय़रेषेखाली जगणा-यांची संख्या किती आहे, हे कधी स्पष्ट करणार? दारिद्रय़रेषेखाली किती लोक जीवन जगत आहेत, हे नेहमीच आपल्याकडे लपवून ठेवले जाते. ही अगदी स्वातंत्र्यानंतर शासक बनलेल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासूनची परंपरा आहे. दारिद्रय़रेषेखाली या देशातील फक्त २४ टक्के लोक जगतात, असा अहवाल पंडित नेहरूंच्या काळात आला होता. तेव्हा तो अहवाल खोटा असून, प्रत्यक्षात देशातील ६० टक्के लोक दारिद्रय़रेषेखाली जगत असल्याचे डॉ. राम मनोहर लोहिया यांनी दाखवून दिले होते. समाजवादाचा लढा देणा-या आणि समाजाचे अर्थशास्त्र जाणणा-या राम मनोहर लोहिया यांनी त्यावेळी पंडित नेहरूंच्या डोळय़ांत अंजन घालून फार मोठा धक्का दिला होता.
पंडित नेहरूंच्या नंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांनी यासाठीच तर गरिबी हटाओची घोषणा दिली होती. राम मनोहर लोहिया यांनी पेटवलेली ही मशाल समाजवादाने धडधडत असताना, ती शमवण्यासाठी इंदिरा गांधींनी गरिबी हटाओची घोषणा दिली. त्यासाठी गरिबांसाठी जनता साडी, रेशनवर जाडेभरडे कापडापासून काय काय आणले होते. पण गोरगरिबांकडे क्रयशक्ती होतीच कुठे? ही घोषणा फसवीच ठरली होती. गरिबी हटाओ नाही तर देशातील गोरगरिबांना हटवण्याचे काम सुरू झाले होते. १९७२ च्या दुष्काळात तर प्रत्येक गोष्टी रेशनवर मिळत होत्या. त्यासाठी लांब लांब रांगा लागत होत्या. साखर, रॉकेलच नाही तर गहूपण मिळत नव्हता. साठेबाजी आणि काळय़ा बाजाराला ऊत आला होता. यात गरीब माणूस भरडला जात होता. त्याची अवस्था मनोजकुमारने ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातून मांडली होती. एकीकडे काळा बाजार, देशद्रोह करून मोठा होणारा भांडवलदार वर्ग आणि दुसरीकडे भरडला जात असलेल्या दारिद्रय़रेषेखालील लोकांचा वर्ग, हे अत्यंत भीषण असे चित्र होते. ती परिस्थिती नंतरही बदलली नाही की आजही बदलली नाही. काँग्रेसच्या राजवटीत बेरोजगारी आणि दारिद्रय़रेषेखालील लोकांची संख्या वाढली. तेच चित्र आजही बदललेले नाही. फक्त मूठभरांची वाढलेली श्रीमंती आणि त्याचे कोडकौतुक याची बातमी येते. पण आर्थिक सर्वेक्षण, पाहणी अहवालात दारिद्रय़रेषेखाली किती माणसे आहेत हे कधीच स्पष्ट होत नाही. आज ७ हजार ३०० लोक करोडपती झाले सांगताना रोडपती किती झाले आहेत, याचा काहीच हिशोब नाही.
अनेक कंपन्या बंद होत आहेत, अनेक लोक बेरोजगार होत आहेत. नवीन रोजगार निर्मिती होताना दिसत नाही. शिकल्या सवरलेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. शेतकरी अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. दुष्काळाशी, नैसर्गिक संकटांशी सामना करण्याची वेळ त्याच्यावर येते आहे. शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. टोमॅटोपासून अन्य भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ येते आहे. दुधाची तशीच परिस्थिती. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. बँका त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. यातून लाखो शेतकरी उद्ध्वस्त होत असताना फक्त मूठभर लोक करोडपती झाले म्हणून कौतुक कसले केले जाते? जगभरातील श्रीमंतांच्या यादीत अनिल अंबानींचे नाव समाविष्ट झाले, टाईम मॅक्झिनच्या टॉप टेनमध्ये अंबानींचे नाव झळकले म्हणून प्रसारमाध्यमांतून त्याचे कौतुक होते. पण त्याचवेळी देशातील गरिबीकडे पाहण्याची दृष्टी आम्हाला येत नाही, हे फार विचित्र आहे.
७ हजार ३०० लोक करोडपती झाल्याचे दु:ख नाही, आनंदच आहे. पण इतरांनाही पुढे जाण्याची कुठे संधी आहे काय, हे कोणीतरी सांगितले पाहिजे. अमेरिकेने तिथल्या आर्थिक घडामोडी आणि धोरणानंतर परदेशांतून रोजगारासाठी येणा-यांवर बंदी घातली आहे. अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात भारतीय रोजगारासाठी जातात. कारण त्यांना रोजगार देण्यास इथली यंत्रणा सक्षम नाही. अशा परिस्थितीत तिकडेही रोजगार नाही, इकडेही नाही या कात्रीत सापडलेला तरुणवर्ग रोडपती झालेला आहे. या तणावामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. रोजगाराअभावी तरुणांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे सगळे दारिद्रय़ाचे दुष्टचक्र त्याच्याभोवती पिंगा घालताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आमचा नितीआयोग असेल किंवा पूर्वीचा नियोजन आयोग नेमके काय करतो हे समजत नाही.
पाच वर्षापूर्वी यूपीए सरकारच्या काळात दारिद्रय़रेषेखाली फक्त १८ टक्के लोक भारतात आहेत, असे म्हटले होते. प्रत्यक्षात तो आकडा ४० टक्क्यांच्या आसपास होता. त्यावर प्रचंड टीका झाली. विरोधक असलेल्या भाजपनेही त्यावरून हंगामा केला होता. पण आज सत्तेत असताना नेमके काय चित्र आहे हे सरकारकडून समजत नाही. माहिती येते फक्त ७ हजार ३०० लोक करोडपती झाल्याची. रोडपती झाल्याचे कोणीच बोलत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: