दसरा हा आपल्याकडे राजकीय समीकरणे मांडण्याचा दिवस असतो. भारतीय जनता पक्षाची मातृशाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभर चालणारे संचलन आणि त्यानंतर नागपूर येथून होणारे सरसंघचालकांचे बौद्धिक, शिवसेनेचा दसरा मेळावा, याच निमित्ताने निवडणुका डोळय़ांसमोर ठेऊन आखणी करणारे विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम. यामुळे दसरा हा राजकीय समीकरणाचा दिवस असतो. या निमित्ताने ज्या सर्व पक्षांनी आपली गेल्या काही दिवसांत भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यावरून सर्वानीच रामाला साकडे घातल्याचे दिसत आले आहेत. वेगवेगळय़ा मार्गाने राममंदिर अयोध्या प्रश्नाचा विषय घेऊन सगळे मैदानात उतरणार हे निश्चित झालेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाकीचे मुद्दे बाजूला पडून राम मंदिराचा मुद्दा समोर येणार हे नक्की झालेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या मुद्दय़ावरच भाष्य केले. राजकारणामुळे राम मंदिर उभारणीचा मुद्दा लांबणीवर पडला, असे ते म्हणाले.राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारने कायदा करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात राफेल आदी मुद्दे बाजूला सारण्यासाठी भाजपच्या मदतीला राम धावून येणार असे दिसते किवा भाजप राम मंदिरावरून रामाला साकडे घालण्याची चिन्हे दिसत आहेत. मोहन भागवत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नानक यांच्या शिकवणीचा उल्लेख करत, भारतीय लष्कर आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचे म्हटले. याशिवाय एससी-एसटी हे समाजातील वंचित घटक, पीडितांना आणखी सक्षम करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. यातून संघ सर्वसमावेशक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच शहरी नक्षलवादाच्या संकल्पनेवरही त्यांनी भाष्य केले. देशभरातील छोटय़ा-मोठय़ा आंदोलनांमध्ये भारताचे तुकडे होणार म्हणणारे लोक दिसले. सोशल मीडियावर त्याचा जोरदार प्रचार केला जात आहे. त्यासाठीचा मजकूर पाकिस्तान, इटली, अमेरिकेतून पुरवला जातो, असेही ते म्हणाले. समाजात निर्माण झालेला असंतोष दूर करायला हवा. दबलेल्या-पिचलेल्या लोकांना त्यांचे अधिकार द्यायला पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला, पण या सगळय़ांवर एकच रामबाण उपाय म्हणजे राम मंदिराची उभारणी होणे असल्याचे नकळत त्यांनी दाखवून दिले आहे.विशेष म्हणजे देशातील सगळय़ाच पक्षांना आता राम मंदिर हा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला आहे. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा चढवलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता पोप न राहता हिंदू म्हणवण्यात आनंद मानू लागले आहेत. गतवर्षीच्या गुजरात निवडणुकीपासून त्यांनी देवदर्शनाचा सपाटा लावत कर्नाटकातील मंदिर आणि मठ अक्षरश: झाडून काढले, मानसरोवर यात्रा करून सोवळे, धोती आणि विविध हिंदू पेहरावा करण्यात त्यांनी धन्यता मानली. आता ही पावले त्यांची अयोध्येच्या दिशेने पडून भाजप नाहीतर आम्हीच राम मंदिर बांधू शकतो हे दाखवण्यासाठी कंबर कसल्याचे दिसते. त्यांच्या या उद्देशात शिवसेना त्यांना मदत करेल असे दिसते आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला काँग्रेस आणि राहुल गांधींचा पुळका येताना दिसत आहे. त्या नियोजनानुसारच कदाचित शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. अयोध्येत जाऊन पूजा आणि राम मंदिराच्या संकल्पाची घोषणा शिवसेनेने करणे म्हणजे हातात दुसरे मुद्दे नसल्याने आणि महाराष्ट्रासाठी काही करण्याची धमक नसल्याने रामाला साकडे घातल्याचे दिसते आहे. एकूणच आता या राम मंदिराचा मुद्दा २०१९च्या निवडणुकीत सत्ताधारी विरोधक आणि दोघांचे मित्रपक्ष करणार, त्याचप्रमाणे डावे समाजवादी पक्षही याचा फायदा घेणार हे निश्चित. पण याचा अर्थ देशापुढे अन्य प्रश्न राहिलेले नाहीत किंवा त्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत कोणात नाही.भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर या मुद्दय़ापासून दूर जाताना दिसत असला तरी त्यांना त्या मुद्दय़ावर परत आणण्याचा घाट सर्वच पक्ष करताना दिसणार आहेत. न्यायालयाचा निर्णय आलेला नाही, अजूनही न्यायप्रविष्ठ हा मुद्दा असताना आणि येत्या काही दिवसांत त्याच्यावर सुनावणी सुरू होण्याची चिन्हे असताना आधीच उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग या न्यायाने सगळे पक्ष राम राम करत साकडे घालताना दिसत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यावरच आज बोट ठेवलेले दिसते. भाजपच्या बाबतीत आता हा मुद्दा म्हणजे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय असा झालेला आहे. विशेष म्हणजे आजच्या भाषणात रामाशिवाय मोहन भागवत यांनी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा उल्लेख केला. देशात सांस्कृतिक जागराची परंपरा सुरूच आहे. राजकारणासंबंधी अनेक अभिनव प्रयोग करण्यात आले. ब्रिटिशांच्या काळात महात्मा गांधींनी असेच प्रयोग केले. सत्य आणि अहिंसेच्या आधारे राजकारणाची कल्पना केवळ आपल्याच देशातील लोक करू शकतात. शस्त्रांच्या आधारे लढा देणारे लोकही होते. याच नैतिक बळाच्या आधारे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि स्वतंत्र भारताचे पहिले सरकार विदेशात स्थापन केले. या घटनेलाही आता दीडशे वर्षे झाली आहेत, असे सांगून दोन विचारधारांचा फरक दाखवून देताना दोन्हींचा उद्देश एकच असल्याचे सांगितले. सरसंघचालकांच्या भाषणात अपेक्षित इतर मुद्दे होतेच यामध्ये आपला देश सर्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो.पण जगात आपलेही काही शत्रू आहेत. त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. शेजारी देशाचे सरकार बदलले, पण सीमेजवळील राज्यांतील त्यांच्या कारवाया कमी झालेल्या नाहीत. त्या रोखण्यासाठी आपल्याला अधिक सक्षम बनले पाहिजे, जेणेकरून कुणाचीही हिंमत व्हायला नको. त्यासाठी लष्कराला अधिक मजबूत केले पाहिजे. गेल्या काही वर्षात जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असेही भागवत म्हणाले. यावरून त्यांनी संघ सैन्य तयार करू शकतो या गेल्या वर्षी केलेल्या मुद्दय़ाकडे डोळेझाक केली. मात्र या सर्वावर कडी म्हणजे राम मंदिराचे सर्वच पक्षांकडून होणारे राजकारण हा मुद्दा त्यांनी मांडला. हा मुद्दा भाजपचीच मक्तेदारी आहे हे अधोरेखीत करून त्यासाठी कायदा निर्माण करण्याची अपेक्षा त्यांनी केली असली तरी सर्व पक्षांनीच रामाला साकडे घातल्याचे दिसून येते.
शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८
सर्वाचेच रामाला साकडे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा