राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवरच गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधींचा हा आरोप म्हणजे भ्रष्टाचाराच्या शिष्टाचाराला छेद देणारा आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेत हा प्रश्न राहुल गांधींना कोणीही विचारला नाही याचेच आश्चर्य वाटते. की यात मोदींचा नेमका हेतू, फायदा काय असेल?आजवर या देशाला फक्त काँग्रेस नेत्यांचेच भ्रष्टाचार माहिती आहेत. त्याचा एक काँग्रेसने पायंडा पाडलेला आहे किंवा भ्रष्टाचाराचा तो शिष्टाचार झाला आहे म्हणा, पण जास्ती काळ सत्ता भोगल्यामुळे म्हणा पण काँग्रेसने जे व्यवहार केले किंवा त्यांच्या नेत्यांनी जे भ्रष्टाचार केले, त्यात त्या नेत्यांना कुणी पैसे दिल्याच्या घटना घडल्या होत्या. अगदी एखादे कंत्राट घ्यायचे असेल तर टक्केवारी, कमिशन संबंधित ठेकेदार नेत्यांच्याकडे पोहोचवत असत. हर्षद मेहताचा घोटाळा झाला तेव्हा १९९२ साली हर्षद मेहताने तमाम जगाला धक्का देत चक्क भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना एक कोटी रुपयांची बॅग दिल्याचे जाहीर केले होते. हे ऐकून नरसिंह रावांचे तोंड असे हुप्प झाले की, ते नंतर उघडलेच नव्हते. टू जी स्पेक्टम घोटाळा असो वा काँग्रेसच्या काळातील कोणताही घोटाळा असो या गैरव्यवहारात काँग्रेस नेते आणि मंत्र्यांना कोणा ठेकेदारांकडून पैसे मिळाल्याच्या घटना घडल्या होत्या. राष्ट्रकुल घोटाळा झाला तेव्हा तत्कालीन मंत्री काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांच्याव टीशू पेपरपासून निकृष्ट काम करून पैसे कमावल्याचा आरोप झाला होता. आजवरची देशातील भ्रष्टाचाराची अशी परंपरा असताना ज्या नेत्यांवर आरोप होतात त्यांना पैसे मिळाल्याची उदाहरणे किंवा आरोप आहेत. असे असताना ही नेमकी उलटी गंगा कशी काय वाहिली हा प्रश्न कोणालाच का पडला नाही आणि राहुल गांधींना तो कोणी पत्रकाराने का विचारला नाही, हा एक बाळबोध प्रश्न मनाला सतावत आहे.नरेंद्र मोदींनी ३० हजार कोटी अनिल अंबानींना दिले असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. हे कंत्राट आपल्यालाच मिळावे म्हणून नरेंद्र मोदींना अंबानींनी नेमके काय दिले? नरेंद्र मोदींचा नेमका यात फायदा काय झाला? त्यांना किती टक्के मिळणार आहेत, अनिल अंबानी त्यांना काय देणार आहेत हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार आहे हे कसे म्हणता येईल? त्यामुळे राहुल गांधींची कुठे तरी भूमिका चुकते आहे काय, पत्रकार परिषदेत याबाबत कोणीही त्यांना काही कसे विचारत नाही, याबाबत सगळेच प्रश्न गुलदस्त्यात आहेत. एकूणच हा हवेत केलेला गोळीबार आहे, असेच म्हणावे लागेल. राफेल कराराशिवाय दुसरा कोणताही मुद्दा नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यासाठी हाच एकमेव मुद्दा असल्यामुळे राहुल गांधींनी आपला मोर्चा तिकडे वळवला आहे, हा त्यांच्या राजकारणाचा भाग असेलही, पण कोणत्याही युद्धात वार कसाही केला तरी चालतो पण त्याने शत्रू नामशेष व्हावा लागतो. पण तो वार हवेत करून उपयोग नसतो हे राहुल गांधींनी समजून घेतले पाहिजे.दिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर भरपूर टीका केली. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधान आहेत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या १० दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तीच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीच झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. हे सगळे त्यांचे बरोबर आहे, असेलही. फक्त ते त्यांनी पुराव्यानिशी आणि स्पष्टपणे मांडले असते तर त्यांचा मार्ग अधिक स्पष्ट झाला असता. पत्रकार परिषद आणि निवडणुकीतील भाषणे यात फरक असतो. निवडणुकीत भाषणांकडे कोणीच गांभीर्याने पाहत नसते कारण सगळेच आरोप-प्रत्यारोप करत असतात.अशा परिस्थितीत कोणी अच्छे दिन आनेवाले है, १५ लाख खात्यात जमा होतील, शेतकरी कर्जमुक्त होईल, आत्महत्या थांबतील, बेरोजगारी दूर होईल, रोजगार निर्मिती होईल अशी आश्वासने देत राहतो. ती कोणी गांभीर्याने घेतही नाही. नाहीतर आज ज्याप्रमाणे अच्छे दिन का आले नाहीत, असे प्रश्न विचारत आहेत त्यांच्याच आजीला गरिबी हटाओची घोषणा दिल्यानंतर अजून गरिबी का हटली नाही, असा सवाल मतदारांनी केला असता; परंतु निवडणुकीतील घोषणा नाही तर पत्रकार परिषद घेऊन जेव्हा अनिल अंबानींना ३० हजार कोटी मोदींनी दिले असा आरोप केला जातो तेव्हा यात नेमका भ्रष्टाचार काय झाला हे दाखवा असे विचारण्याचे काम पत्रकारांचे होते. ते त्यांनी केले नाही की त्यांनी तिथे फक्त माना हालवायला यायचे होते हेही स्पष्ट झाले पाहिजे. पण काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या, शिष्टाचाराच्या व्याख्येत हा उलटी गंगा वाहणारा व्यवहार नेमका भ्रष्टाचार कसा हा सवाल निर्माण होणारच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा