नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून नेताजींच्या कार्याला सलाम केला. या देशाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते फक्त काँग्रसने मिळवून दिले आहे, असा खोटा इतिहास वर्षानुवर्षे आमच्यावर बिंबवला गेला. त्याला कुठे तरी छेद देत पंतप्रधानांनी ज्या ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे, ते तितकेच वंदनीय आहेत, हे दाखवून दिले आहे.‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल’ असे जे बिंबवले, त्याला ही चपराक आहे की, आजवर अनेकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे, रक्त सांडले आहे, क्रांतीचा नारा दिलेला आहे, बंड केलेली आहेत, तीही तितकीच महत्त्वाची आहेत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. म्हणूनच सुभाषबाबूंच्या कार्याची दखल त्यांनी घेतली, जी आजवर कधी कोणी घेतलेली नव्हती. त्यामुळे आजवर एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व दुर्लक्षिले गेले होते. इंग्रज आपला शत्रू आहे त्यामुळेच, दुसरे महायुद्ध सुरू असताना, इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला ‘जय हिंद’चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. ही बाजूही लक्षात घेतली पाहिजे. महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता. रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. गांधीजींनी दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबू बंगालमध्ये असहकार आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रजी नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली.स्वातंत्र्यलढय़ात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली. गांधीजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. त्यानंतर सुभाषबाबू तुरुंगात असताना, गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली; परंतु सरदार भगतसिंग आदी क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी, ही मागणी गांधीजींनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती की, याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधीजींनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण, आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधीजींना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरावेळा कारावास भोगावा लागला.१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला सहाय्य करण्यासाठी, डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. १९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की, इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत या दिशेने पावले टाकण्यास सुरुवातही केली होती. गांधीजी या विचारसरणीशी सहमत नव्हते. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबूसहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरुंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. पठाणी वेशभूषेत, महंमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. ते पेशावरला पोहोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉकमधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली.त्यानंतर बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदी जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो या दोन्हींची स्थापना केली. याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी या नावाने ओळखले जाऊ लागले. नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकूमत-ए-आझाद-हिंदची स्थापना केली. ते स्वत: या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झांसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली. तुम मुझे खून दो, ‘मै तुम्हे आजादी दूँगा’ असा नारा दिला. त्या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. त्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले आणि इतिहास समोर ठेवला, ही चांगली बाब म्हणावी लागेल.