हाथी चले अपनी चाल, कुत्ते भोक हजार असे आपल्याकडे म्हटले जाते. त्याचा नेमका अर्थ काय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुक्रवारच्या भाषणावरून आणि कृतीवरून दिसून आले. साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डी इथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी घरकुल योजनेतील ११ हजार लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधानांनी स्वत: दहा लाभार्थ्यांना चाव्या देऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला. नंदूरबार, नागपूर येथील लाभार्थ्यांशी यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मराठीत संवाद साधला. यावेळी गेले काही दिवस विरोधकांची तुफान टीकाबाजी सुरू असतानाही मोदींनी कोणाच्याही आरोपाला, टीकेला उत्तर न देता आपल्या कामाची जाहिरात केली. हाच ख-या अर्थाने त्यांनी निवडणुकीचा शंख फुंकल्याचे चित्र स्पष्ट करणारा दाखला आहे. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृती ही हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार या म्हणीप्रमाणे असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे जिथे जातील तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसत आहेत. कोणतेही व्यासपीठ ते मोदींविरोधात बोलण्यासाठी सोडत नाहीत. कोणत्या व्यासपीठावरून काय बोलायचे याचे भान न ठेवता परदेशात असो वा कुठेही गेले तरी फक्त मोदी सरकारवर टीका करणे हाच एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला दिसतो. त्या तुलनेत पंतप्रधान मोदी मात्र अत्यंत स्थिर मनाने आपल्या स्टाईलमध्ये जनतेशी संवाद साधत आहेत. या त्यांच्या कृतीतून काँग्रेसला अनुल्लेखाने मारायचे आणि संपवायचे असेच त्यांचे धोरण दिसते.आपण आपल्या विरोधकांवर टीका करून नाही तर केलेल्या विकासकामांवर मते मागायची हेच भाजपचे धोरण आगामी काळात दिसणार आहे हे आजच्या शिर्डीतील भाषणावरून दिसून आले. राहुल गांधी कितीही राफेल राफेल, मोदी मोदी, अंबानी अंबानी करून शंख करत असले तरी मोदींनी त्यांना गेलात उडत, आमच्याकडे अनेक मुद्दे आहेत, असे दाखवून देत विरोधकांना अनुल्लेखाने मारायचा निर्धार केलेला दिसतो. अर्थात पंतप्रधानांचेही धोरण योग्यच आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायला या काय निवडणुकीच्या प्रचारसभा आहेत का? विकासकामांच्या शुभारंभासाठी आणि उद्घाटनासाठी आलेलो असताना विरोधक आणि टीकाकारांकडे लक्ष देण्याचे कारणच काय हे त्यांनी दाखवून देऊन भुंकणा-या कुत्र्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शुक्रवारी शिर्डीतून त्यांनी महाराष्ट्रातील अनेकांशी संवाद साधत अनेकांच्या मनात घर केले. ठाणे, नंदूरबार, अमरावती, सोलापूर, नागपूर, लातूर, साता-यासह विविध जिल्ह्यांतील ११ हजार लाभार्थ्यांना यावेळी ई गृहप्रवेश देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी लाभार्थ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. घर मिळाल्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत? हे जाणून घेतले. घरकुल योजनेतून मिळवण्यासाठी लाच द्यावी लागली का? असा प्रश्न करून आपल्या सरकारचा कारभार किती स्वच्छ आहे हे जनतेकडून वदवून घेतले. घर महिलेच्या नावावर केल्यामुळे पुरुषांच्या मनात राग तर नाही ना? असे विचारून हे सरकार महिलांचा कसा सन्मान करते हे दाखवून दिले.असे अनेक प्रश्न पंतप्रधानांनी विचारले की, ज्यातून जनतेच्या हृदयात हात घातलाच पण विरोधकांच्या राजवटीत जो काळा कारभार होता तो आता नाही हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे आम्ही फक्त विकासकामांवर आता लढणार, तुम्ही टीका करा, तुमच्या टीकेला आम्ही काही उत्तर देणार नाही, तर जनताच देईल हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वागण्याला लाभार्थीनी चांगलाच प्रतिसाद दिला. लाभार्थ्यांनीही त्यांना मोठय़ा उत्साहाने उत्तरे दिली. तसेच, नवे घर मिळवून दिल्याबद्दल सरकारचे आभारही मानले. सरकारी योजना आणि सर्वसामान्यांतील मध्यस्थांची साखळी आम्ही तोडल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते सप्रमाण सिद्ध केले. त्यामुळे विरोधक आणि सत्तेत राहून टीका करणारे स्वकीय शत्रू या दोघांचीही तोंडे बंद करण्यात मोदींना चांगलेच यश आले. गुरुवारीच दस-याच्या मुहूर्तावर मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका केली. आपल्या अर्धा तासाच्या असंबद्ध बडबडीत मोदींवर टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. शिवसैनिक आणि शिवसेनेला वाटत होते की, आता शुक्रवारी शिर्डीतील भाषणात पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणार. सगळे टीव्ही लावून सकाळपासून बसले पण तोंडात मारल्यासारखी सर्वाची अवस्था झाली. याचे कारण पंतप्रधानांनी आपण केलेल्या विकासकामांचाच पाढा वाचून दाखवला. तो सप्रमाण सिद्ध करून जनतेचा किती विश्वास आहे हे दाखवून दिले.उद्धव ठाकरे यांच्या रटाळ भाषणाची हवाच काढून घेतली. याचा परिणाम कसलीही, कितीही, कोणाचीही सर्वेक्षणे येवोत, भाजपला लोक नाकारणार असे म्हणोत, त्यांचे संख्याबळ घटणार आणि सत्तेतून जाणार असे अंदाज बांधले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखे खूप काही आहे. विकासकामांच्या जोरावर ते २०१९ची निवडणूक जिंकू शकतात हे यातून स्पष्ट झालेले आहे. आज कितीही शिवसेनेने उडय़ा मारल्या आणि स्वबळाची भाषा केली असली तरी लोकसभेच्या निवडणुकीत मोदी आणि भाजपला बरोबर घेऊन जाण्याशिवाय पर्याय शिवसेनेपुढे असणार नाही. भाजप आज युतीसाठी मागे लागले आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्न सेना नेत्यांनंी मेळाव्यात केला असला तरी सेनेचे खासदार स्वबळावर लढण्याचे धाडस करण्याच्या मानसिकतेत नाहीत. मोदींच्या लाटेत निवडून आलेल्या अनेक शिवसेना खासदारांच्या मनात याचीच भीती आहे की जर स्वबळाची भाषा केली तर भाजपच्या मदतीशिवाय आपण निवडून येऊ शकणार नाही. त्यामुळेच त्यांचा आग्रह युतीचाच असल्याने लोकसभेला सेनेला भाजपबरोबरच जावे लागेल. त्यामुळे मोदींना हे सर्व माहिती असल्यामुळे दसरा मेळाव्याला कितीही भू भू झाले असले तरी त्यांनी त्याकडे बिलकूल लक्ष दिलेले नाही. हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार या न्यायाने त्यांनी ना राहुल गांधींना महत्त्व दिले, ना उद्धव ठाकरे यांची दखल घेतली. या दोघांना बेदखल करत त्यांनी आपला विकास पुरुष हा चेहरा पुढे केला.
शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८
हाथी चले अपनी चाल..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा