लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला जोरदार झटके बसू लागले आहेत. महाआघाडी तयार करून, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आघाडीचे नेतृत्व करण्याचे काँग्रेसचे स्वप्न सध्या तरी पूर्णत्वास जाईल असे चित्र दिसत नाही. ही आघाडी करण्यासाठी काँग्रेसच्या दृष्टीने मायावती यांची बहुजन समाज पक्षाची ताकद फार महत्त्वाची होती. मात्र मायावतींनी काँग्रेसला कधीच जवळ न करण्याचा निर्णय बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आणि काँग्रेसच्या विरोधी ऐक्याला आणि महाआघाडीच्या स्वप्नांना सुरुंग लागला. गेल्या काही वर्षापासून काँग्रेस ही महात्मा गांधींच्या विचारापासून दूर गेलेली होती. ज्या काँग्रेसचा गांधीविचार हा आधार होता त्या विचारापासून दूर जाऊन काँग्रेस ही भ्रष्टाचाराचे आगार झाले होते. त्यामुळेच जनतेने खूप विचार करून काँग्रेसला २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर करण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीला मोदी लाटेमुळे यश मिळाले, असे म्हणण्यापेक्षा जनतेला काँग्रेसचा कंटाळा आला होता. काँग्रेसला नाकारायचे होते म्हणून मोदींना संधी मिळाली. याचे कारण काँग्रेस गांधी विचारापासून दूर गेलेली होती. हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नजरेतून सुटले नाही. त्यांनी २०१४ साली सत्तेवर आल्यावर सर्वात पहिल्या म्हणजे २०१४ च्या गांधी जयंतीलाच स्वच्छता अभियान, स्वच्छ भारतसारख्या योजना घोषित करून गांधी विचारांना जवळ केले होते. गांधी विचाराशिवाय या देशाला पर्याय नाही हे लक्षात घेऊन स्वच्छ भारत अभियानात महात्मा गांधींचा चष्माच दिसेल याची दक्षता घेतली होती. त्याला देशभरातून चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्याचवेळी काँग्रेस मात्र गांधी विचारापासून दूर जात एकेका राज्यातील सत्ता गमावत होती. अशा परिस्थितीत काँग्रेस आज खूपच खिळखिळी झालेली दिसते. आज काँग्र्रेसला कोणीही मनापासून जवळ करायला तयार नाही. काँग्रेसबरोबर जाणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे असे अनेक पक्षांना वाटत आहे.त्यामुळेच महाआघाडी करायचे म्हटले तरी त्याचे नेतृत्व काँग्रेसचे नसेल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसबरोबर आपण फरपटत जाणे योग्य नाही हे लक्षात आल्याने मायावतींनी काँग्रेसचा हात सोडला. हा काँग्रेसला फार मोठा झटका आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत मायावतींची साथ काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाची होती. विशेषत: मध्य प्रदेशातील बहुजन मतासाठी काँग्रेसला मायावतींची साथ महत्त्वाची ठरली असती. त्यामुळेच काँग्रेसने ‘चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी’ असे गाणे गुणगुणत मायावतींच्या हत्तीसाठी पायघडय़ा घातल्या होत्या. मात्र या पायघडय़ांवरून चालायला सुरुवात करण्यापूर्वीच या हत्तीने त्या मुळापासून उखडून टाकल्या आहेत. त्यामुळे मध्य प्रेदशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला फार मोठा धक्का दिलेला आहे. एप्रिल २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दृष्टीने उत्तर प्रदेशात मायावतींची ताकद महत्त्वाची होती. त्यांच्याशी युती करून काँग्रेसला उत्तर प्रदेशात मजबूत व्हायचे होते. पण त्या स्वप्नांचाही भंग झालेला आहे. आज महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस गेले सहा-सात महिने युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. डिनर डिप्लमसीसारखे प्रयोग करून काँग्रेसने आघाडीचे प्रयत्न सुरू केले.परंतु रात्रीच्या जेवणानंतर ‘रात गयी बात गयी’ असा प्रकार सगळय़ाच प्रादेशिक पक्षांकडून झाल्याचे दिसून आले. ही आघाडी काही होताना दिसत नाही. कारण काँग्रेसबरोबर गेल्याने आपण बुडणार अशी प्रत्येक पक्षाला भीती आहे. महाआघाडीची घोषणा झाल्यानंतर कर्नाटक निवडणुकीपूर्वी सोनिया गांधी आणि मायावती यांनी गळय़ात गळे घातलेले फोटोही सगळीकडे झळकले. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकात विरोधकांचे ख-या अर्थाने ऐक्य होऊन जागावाटपाबाबत समझोता झाला की विरोधक भाजपला जोरदार आव्हान देऊ शकतील, असे चित्र तयार झाले. पण हे मनोमिलन टिकू शकले नाहीत. महाआघाडी करण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नात काँग़्रेसबरोबर आज पक्का असा कोणताही मित्रपक्ष नाही. कर्नाटकात जनता दलाबरोबर त्यांनी निवडणुकीनंतर युती केलेली असली तरी ते संबंध खूप सलोख्याचे आहेत असे नाही. कर्नाटक सरकारला धमक्या देत पाठिंबा देण्याचे धोरण काँग़्रेसने आखले असल्यामुळे जनता दल हा लोकसभेपर्यंत काँग्रेसचा मित्र राहील असे दिसत नाही. उत्तर प्रदेशात मायावतींच्या बसपाशिवाय समाजवादी पार्टी हा एक मित्र काँग्रेसला जोडायचा आहे.पण समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दीड वर्षापूर्वी काँग्रेसबरोबर आघाडी केली आणि सगळय़ांचे अंदाज अखिलेश यादव पुन्हा सत्तेवर येतील, असे असताना काँग्रेसबरोबर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचेही पानिपत झाले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या आघाडीबाबत समाजवादी पार्टीही काँग्रेसला जवळ करील असे दिसत नाही. आज काँग्रेसला सोबत घेऊ शकेल, असा फक्त एकमेव पक्ष आहे. तो म्हणजे बिहारमधील लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल. लालूप्रसाद यादव हे भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकल्यामुळे आणि तुरुंगात असल्यामुळे त्यांना काँग्रेसची गरज म्हणजे बुडत्याला काडीचा आधार अशी अवस्था आहे. मात्र काँग्रेस पक्षाचीच शकले होऊन तयार झालेले जे पक्ष आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा पक्षही काँग्र्रेसबरोबर आघाडी करताना आपले उपद्रवमूल्य वारंवार दाखवत आहे. घटकेत मोदींची पाठराखण करत शरद पवार काँग्रेस विरोधी भूमिकाच घेताना दिसत आहेत.त्यामुळे काँग्रेसला महाआघाडी करताना खूप झटके खावे लागणार आहेत. निवडणूकपूर्व आघाडी करण्याचे इरादे हे स्वप्नच राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. काँग्रेसचा आणखी एक पडलेला तुकडा म्हणजे तृणमूल काँग्रेस. या पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी याही काँग्रेसला जवळ करतील असे दिसत नाही. त्यांना प. बंगालमध्ये काँग्रेसशी आघाडी करण्यात कसलाही रस नाही. त्याचप्रमाणे महाआघाडीचे नेतृत्व काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी करावे याला त्या पाठिंबा देण्याची शक्यताच दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस विचारापासून आणि गांधी विचारापासून भरकटलेली सध्याची काँग्रेस महाआघाडी करण्याबाबतही अपयशी ठरण्याचे चित्र आज दिसत आहे. मायावतींनी झटका दिला आहेच; परंतु आगामी निवडणुकीपर्यंत असे किती झटके बसतात आणि काँग्रेसला एकाकी कसे पाडले जाते हेच आता पाहावे लागणार हे नक्की
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा