- आज हनुमान जयंती. निस्वार्थ सेवेसाठी आणि बुध्दिमत्तेच्या मोठ्या देणगीसाठी हनुमानाला आपण ओळखतो. हनुमान जयंती दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपतं आणि सर्वाना प्रसाद वाटला जातो.
- पण इथपर्यंतच ही जयंती संपत नाही. तर मारूतीच्या उपासनेमागे फार मोठा अर्थ आहे. फार मोठे शास्त्र आहे. मारुतीच्या पूजेमागील प्रथा किंवा रूढीमागील कारणं महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवारसह मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर आणि तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आढळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना म्हणून वाममुखी (डावीकडे तोंड असलेला) मारुती किंवा दासमारुती पूजेत ठेवतात. कारण मारुतीने रामाची अत्यंत निस्वार्थपणे भक्ती सेवा केली होती. चिरंजीव असलेल्या या देवतेला अकरावा रुद्र म्हणून ओळखले जाते.
- प्रत्येक देवतेचं विशिष्ट असं उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेअंतर्गत प्रत्येक कृती ठरावीक प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. उपासनेच्या वेळी मारुती पूजनाच्या पूर्वी स्वत:ला अनामिकेनं शेंदूर लावावा असं आपलं शास्त्र सांगतं. हनुमानाला रुईची फुलं आणि पानं-फुलं वाहावीत अशीही आपली जुनी परंपरा आहे.
- शास्त्रानुसार हनुमान जयंती या दिवशी हनुमानतत्त्व सर्वाधिक कार्यरत असतं. याचा जास्तीत जास्त लाभ करून घेण्यासाठी त्या दिवशी मारुतीचा ‘श्रीहनुमते नम:|्|’ हा जप करावा, असे सांगितले आहे. याच मारुतीची भक्ती समर्थ रामदासांनीही केली होती. बलोपासनेसाठी आणि शक्तीसाठी त्यांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदीरे उभारली होती. समर्थ स्थापित ११ मारुती हे अतिशय श्रद्धेचे स्थान आहे. त्याची यात्राही केली जाते. तत्कालीन परिस्थितीत सर्वांना शक्ती मिळण्यासाठी अशा उपासनेची गरज होती. यासाठी समर्थ रामदासस्वामींचा १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यावर साक्षात मारुती त्यांच्यासमोर प्रगट झाले होते. त्या दर्शनानंतर स्वामींनी मारुती स्तोत्र (भीमरूपीस्तोत्र) रचलं. या स्तोत्राला संकटनाशन स्तोत्र असेही म्हणतात. या स्तोत्रात रामदासस्वामींनी विविध नावांनी मारुतीच्या रूपाचं वर्णन आणि त्याची स्तुती केली आहे. हे स्तोत्रपठण करणार्याला धनधान्य, पशुधन आदींचा उत्तम लाभ होतो. या स्तोत्राच्या पठणाने रोग, व्याधी नष्ट होतात. तसंच मारुतीच्या दर्शनाने चिंता दूर होऊन आनंदप्राप्ती होते, अशी फलश्रुती या स्तोत्रात दिलेली आहे.
- मारुती किंवा हनुमान हा स्वामीनिष्ठ असा होता. त्यामुळे त्याची उपासना करणे आज गरजेचे आहे. आजकाल बोकाळलेला भ्रष्टाचार यामागे स्वामीनिष्ठा नसणे हे प्रमुख कारण आहे. भ्रष्टाचारात सरकारचे लुबडणारे, मालकाचे लुबाडणारे लोक हे सरकारचे शत्रू आहेत. अशा शत्रूंचा वावर सर्वत्र असेल तर देशाची प्रगती कशी काय होणार? यासाठी स्वामीनिष्ठ अशा हनुमानाचे तत्व सर्वत्र असणे गरजेचे आहे. हनुमानाचे स्वामी होते प्रभु रामचंद्र. त्यांच्याकडून त्याला काय हवे होते? काहीच नाही. फक्त आशीर्वाद हवा होता. हा आशीर्वाद काय तर तुझ्या पायाशी मला सतत राहता यावं हाच होता. राम या अक्षरांशिवाय त्याने काहीच घेतले नाही. लंकेवरच्या विजयानंतर जेव्हा राम लक्ष्मण सीता वानरसेनेसह अयोध्येत परत आले तेव्हा सर्वांचा सीता राम यांनी सत्कार केला. प्रत्येकाला भेटवस्तु देऊन गौरवले. हनुमानाची वेळ आली तेव्हा त्याच्याही गळ्यात साक्षात सीतेने मोत्यांची माळ घातली. ती मोत्यांची माळ हनुमानाच्यादृष्टीने शून्य होती. कारण जिथे राम नाही तिथे काही नाही हा त्याचा विश्वास होता. ज्यात राम आहे अशीच गोष्ट हनुमानाला हवी होती. यासाठी त्याने एकेक मोती तोडून आत राम आहे का हे पाहिले. अनमोल मोती हनुमानाने तोडल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले होते. पण ज्यात राम नाही त्याला कसलीही किंमत नाही हे त्यांने ठणकावून सांगितले. स्वत:ची छाती फाडून त्याने आपल्या हृदयमंदीरातील रामाचे दर्शन सीतामाईंना घडवले. ही स्वामीभक्ती होती म्हणून तर रामराज्य घडले.
- आज हरामचे राज्य झाले आहे. सगळी भ्रष्टाचार, अनागोंदी माजली आहे. दुष्काळ, नापिकी झाली आहे. अशा परिस्थितीत माणसाने सत्याने वागूनच, दुसर्यांचे न लुबाडता आणि स्वामीनिष्ठेने शक्य होईल तेवढे कष्ट केले पाहिजेत. ही प्रेरणा मिळण्यासाठी हनुमानाचे स्मरण असले पाहिजे. हनुमान हा उत्तम भक्त सेवक होता तसाच तो उत्तम मंत्री होता. सुग्रीवाचा मंत्री म्हणून त्याने केलेली कामगिरी आजही आदर्शव्रत आहे. परराष्ट्र धोरण सांभाळताना आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित करताना मंत्रि कसे असले पाहिजेत याचे उदाहरण हनुमान आहे. नाहीतर राजा म्हणजे पंतप्रधान एक बोलत असतात आणि त्यांचे मंत्री भलतेच बोलत असतात. यातून परराष्ट्र धोरण सुधारत नाही तर सर्वत्र छीथू होत असते. म्हणून रामराज्याची अपेक्षा करण्यापूर्वी उत्तम निष्ठावान सेवक, नागरिक,मंत्री निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी हनुमानाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे.
गुरुवार, २१ एप्रिल, २०१६
तरच रामराज्य येईल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा