बुधवार, १३ एप्रिल, २०१६

समातेच्या राष्ट्राचा पाया


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ भारतरत्न असे संबोधून चालणार नाही तर त्यांची भूमिका एकूणच विश्‍वव्यापी होती. मानव कल्याणाची त्यांची भूमिका होती. नमुन्यासाठी केवळ त्यांनी भारताची बाजू मांडली असली तरी जगातील प्रत्येक घटकाला, सामान्य माणसाला, पिडीत, शोषीत आणि मागासलेल्यांसाठी त्यांची शिकवण ही मार्गदर्शक आहे. खरे तर जागतील पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या अभ्यासासाठी, अर्थशास्त्रातील त्यांच्या भूमिकेसाठी नोबेल मिळणे आवश्यक होते. अर्थात स्वातंत्र्यानंतर आणि भारतरत्न पुरस्काराला सुरूवात झाल्यानंतर चार दशकांनी या भारतातील महामानवाला भारतरत्न दिला गेला. जोपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती तोपर्यंत हा गौरव त्यांना मिळाला नाही तर बिगर कॉंग्रेस सरकारने तो दिला होता हे लक्षात घेतले पाहिजे.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानयोगी होते. त्यांच्या लेखनात व्यासंग होता. ते कोणत्याही विषयावर खोलवर जाऊन संशोधन करत असत. मुंबई विधिमंडळ, घटना परिषद, संसदेतले डॉ. आंबेडकर यांचे गाजलेल्या भाषणांचे इतिवृत्तान्त पाहायला मिळतात, त्यावरून ते किती अभ्यास करुन बोलत असत, आपले मुद्दे कसे मांडत होते हे आजच्या सर्वांना मार्गदर्शक असे आहे. किंबहुना कोणताही मुद्दा मांडताना तो कसा मांडला पाहिजे याचे उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भाषणे आहेत. आज आपल्याकडे घटना परिषदेतल्या भाषणांमधल्या इतिवृत्तान्तांचे १२ खंडांचे कागदपत्र उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी किती खोलवर अभ्यास केला असेल, कोणत्याही गोष्टीकडे किती सूक्ष्म नजरेतून पाहिले असेल हे लक्षात येते. त्याव्यतिरिक्त प्रासंगिक लेखन, पक्षसंघटना, जाहीरनामे, नियतकालिकांमधल्या म्हणजे मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत आदींमधील अग्रलेखांतून पत्रकार डॉक्टर आंबेडकर दिसतात. पत्रकार म्हणून असलेली त्यांची जबाबदारी तर ते अत्यंत वेगळेपणाने मांडतात. डोळे, बुद्धि, मन आणि विवेकावर आधारीत त्यांचे लेखन होते. महाडमधल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी जेधे-जवळकर हे सत्यशोधक कार्यकर्ते डॉ. आंबेडकरांना म्हणाले होते की, या सत्याग्रहात ब्राह्मणांना सोबत घेऊ नका.’  परंतु ही मागणी बाबासाहेबांनी फेटाळली होती.  त्यानंतर एक जुलै १९२७ च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अग्रलेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘ब्राह्मण्य ही एक वृत्ती आहे. ती वृत्ती सर्वच जातींमध्ये आहे. ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण मला हवेत. मात्र ब्राह्मण्यवृत्तीनं ग्रासलेल्या ब्राह्मणेतर व्यक्तींनाही मी जवळ करणार नाही’. यातून डॉ. आंबेडकर यांनी अतिशय व्यापक आणि वैचारिकदृष्ट्या परिपक्व असा संदेश देऊन ठेवलेला आहे. आज कारण नसताना जातीयवाद मांडला जात असताना आणि एका विशिष्ठ जातीवर विनाकारण टिका करण्याची प्रवृत्ती फोफावत असताना यातून डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांचे विचारच सर्वच समाजांना बाहेर काढू शकतात हे निश्‍चित आहे. आपल्या अफाट वाचनाचा उपयोग बाबासाहेबांनी आपले विचार, मतं व्यक्त करण्यासाठी पुरेपूर केला होता. त्यामुळे त्यांची वैचारीक बैठक तयार झाली होती. त्यामुळे त्यांचे लेखन हे अत्यंत प्रगल्भ असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेखन विविधअंगी आणि संशोधनात्क होते. तत्कालीन प्रश्‍न, विषयांचा त्यांनी आपल्या लेखनातून उहापोह केला होता. यामध्ये जातिप्रश्‍न, जातिनिर्मूलन अशा बाबतीतलं समाजशास्त्रीय लेखन त्यांनी केले. याशिवाय अर्थशास्त्रीय लेखन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेले दिसून येते. धर्म आणि धर्मग्रंथ हे माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करताना दिसत होते. त्यामुळे त्यांनी धर्मशास्त्रीय चिकित्सा व तत्कालीन राजकीय प्रश्‍नांची उकल आपल्या विविध ग्रंथांमधून केलेली आहे. आज हेच ग्रंथ भारताला पुढे घेऊन जाणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या समाजशास्त्रीय लेखनात महत्वपूर्ण असलेल्या ‘कास्ट इन इंडिया अँड देअर रेमिडीज्’ आणि ‘निहिलेशन ऑफ कास्ट’ हे दोन ग्रंथ म्हणजे केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला अभ्यासासाठी मिळालेले फार मोठे भांडार आहे. फार मोठा विचार त्यांनी त्यातून मांडला आहे. त्यांचा हा लेखनाचा विचार जगाच्या कल्याणाचा, विश्‍वबंधुत्वाचा विचार प्रकट करणारा असाच आहे.  शूद्र पूर्वी कोण होते किंवा ‘हू वेअर द शूद्राज्?’  आणि अनटचेबल अशा  पुस्तकांमधून जातिव्यवस्थेचा प्रश्‍न त्यांनी अत्यंत प्रखरपणे आणि स्पष्टपणे मांडला आहे. सामाजिक पक्षपात आणि शोषण यांचे चार आधार त्यांनी यातून दाखवून दिलेले आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी भेदभाव होता. यात लिंगभेद, गरीब-श्रीमंत भेद, जातींची श्रेणीबद्ध विषमता आणि धर्म भेद असे प्रकार होते. याचा उहापोह बाबासाहेबांनी आपल्या लेखनातून केलेला दिसून येतो.  जगामध्ये कोणतंही काम करण्याचं स्वातंत्र्य असलं, तरी ते भारतात ते नसल्यानं भारतीय समाजाचं मोठं नुकसान होतं, हे बाबासाहेबांनी अत्यंत स्पष्टपणे मांडले होते. हा विचार प्रकट होणे हीच विकासाची पहिली पायरी होती. सामाजिक समतोल, समताधिष्टीत राष्ट्राच्या निर्मितीचा हा पाया होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: