रविवार, १० एप्रिल, २०१६

झाला एवढा तमाशा खूप झाला

  •  
  • पाडव्याच्या दिवशी शनीप्रेमाने, शनीभक्तीने ओथंबून आणि देवाच्या कृपेसाठी व्याकूळ झालेल्या त्या तृप्ती देसाई यांनी शनीच्या दगडावर तेल ओतले. अभिषेक केलाच. कशी तुझी माझ्यावर कृपा नाही होत असे म्हणून थेट शनीलाच आव्हान दिले. माणसांनी हात टेकले होते त्यामुळे आता इथूनपुढे शनीलाच काय ते करावे लागणार. कारण माणसं हवालदिल झाली होती, अगतीक झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणणं त्यांच्या हाताबाहेर होतं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते त्या वेळी भावनांना आवर घालण्यातच
  • शहाणपण असते. शनिशिंगणापूरच्या विश्वस्त मंडळाने महिलांना शनी चौथर्‍यावर प्रवेश देण्याची घोषणा करून तेच शहाणपण दाखवले आहे. पण ते असहायतेतून, अगतिकपणे, नाईलाजाने आलेले शहाणपण आहे.
  •    भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी आंदोलन करून आणि न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही हे विश्वस्त महिलांना चौथर्‍यावर प्रवेश द्यायला तयार नव्हते. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी महिला येऊनही त्या भूमिकेत बदल होत नव्हता. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचाच वापर करून महिलांना प्रवेश नाकारता यावा यासाठी पुरुषांनाही प्रवेश नाकारण्याची भूमिका त्यांनी घेतली होती आणि त्यावर ते आजही ठाम होते. कावडधारी भाविकांनी सक्तीने चौथर्‍यावर प्रवेश मिळवून अभिषेक केल्यामुळे विश्वस्तांची अडचण झाली आणि त्यामुळे महिलांनाही प्रवेश देण्याची घोषणा त्यांना करावी लागली. 
  •   हे शहाणपण विश्‍वस्तानी आधीच दाखवले असते तर त्याचेही स्वागत करता आले असते, असे अनेकांना वाटते. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंबरोबरच त्या कावडधारी तरुणांचेही अभिनंदन केले जात आहे. ज्यांनी अनवधानाने का असेना, महिला प्रवेशाचा निर्णय घ्यायला शनी देवस्थानच्या विश्वस्तांना बाध्य केले आहे. त्यांचेही अभिनंदन होत आहे. पण हा मनापासूनच होकार नाही. हा तर धार्मिक बलात्कार आहे. एखाद्या मुलीचे सक्तीने तीच्या नापसंत मुलाशी लग्न लावून दिल्यानंतर घडणारा शरीरधर्म प्रेमाचा कसा असेल? तसाच हा प्रकार आहे. जिथे भक्ती नाही, श्रद्धा नाही तिथे कसली तृप्ती असणार आहे? हा तर देवावर केलेला बलात्कार आहे. बलात्कारातील शरीरसंबंधात ज्याप्रमाणे बलात्कार करणारा आणि बलात्कार झेलणारी दोघांमध्येही कोरडी भावना असते, प्रेम नसते त्याप्रमाणे हे आहे. देवावर श्रद्धा नाही आणि केवळ अहंकाराने त्याची पूजा करण्यासाठी उताविळपणा केला जात आहे. ज्याची आपल्यावर श्रद्धा नाही त्याला देव तरी कसे दर्शन देणार? पण एकूणच हा बळजबरीचा प्रकार आहे आणि हा बलात्कार होत असताना त्याला जनमान्यता दिली गेली हा अगतिकपणा या घटनेतून दिसून येतो.
  •    प्रत्येकाला आपल्या धार्मिक भावना वैयक्तिक पातळीवर जपण्याचा अधिकार आहे. तो घटनेनेच बहाल केला आहे. त्यामुळे आपल्या धर्माचे पालन करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर आपण काय नियम पाळायचे आणि आपली भक्ती कशी व्यक्त करायची, याबाबत कोणी सक्ती करू शकत नाही. पण सार्वजनिक ठिकाणी रूढी- परंपरांच्या नावाखाली कोणाला लिंगभेद करता येणार नाही हे न्यायालयाने अधोरेखित करून दिले होते. खरे तर हे सांगायला न्यायालयाचीही गरज पडायला नको होती. ज्या वेळी भूमाता ब्रिगेडने महिलांना चौथर्‍यावर प्रवेश देण्याची मागणी केली त्याच वेळी विश्वस्तांनी ती मान्य करणे अपेक्षित होते. किंबहुना ते त्यांचे कर्तव्य होते. पण समाजाची रूढिप्रियता लक्षात घेऊन त्यांनी नकाराधिकार आपल्याकडे घेतला आणि आपला हट्ट कायम ठेवला. 
  •    न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तर पुरुषांनाही प्रवेश नाकारण्याची नवी प्रथा ते पाडू पाहत होते. पण जी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ते बाळगून होते त्याच मानसिकतेतून कावडधारी पुरुषांनी त्यांचे म्हणणे धुडकावून लावले. कावडीतून आणलेल्या पाण्याने चौथर्‍यावर चढून शनीला अभिषेक करण्याची रूढी आणि परंपरा पाळता यावी हीच त्या तरुणांची भावना होती. त्यामुळे तिथे जे काही घडले ते परंपरावादी आणि समानतावादी यांच्यातील द्वंद्व नव्हते तर रूढीला प्रमाण मानणार्‍यांचीच आपापसातील कुरघोडी होती हे लक्षात घ्यायला हवे. त्या कुरघोडीतून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित व्हायला मदत झाली याचे समाधान अनेकजण मानतील. पण पुरूषांना बंदी केल्यावर पुरूषांनी परंपरेप्रमाणे कावडीने पाणी आणले, पण तृप्ती देसाई मात्र आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला गेल्या. याच न्यायाने त्या उद्या पंढरीच्या वारीत घुसून काहीही करू शकतील. शेकडो मैल चालून आलेल्या महिला पुरूष वारकर्‍यांना बाजूला सारून हेलिकॉप्टरमधून येउन विठ्ठलाच्या मंदिरात घुसतील. तेव्हा त्यांना कोणीच आडवू शकणार नाही. आम्ही शेकडो मैल चालून आलो आहोत म्हणून लाखो वारकरीही त्यांना अडवणार नाहीत. कारण ही परंपरा कोणा पुरूषाने सुरू केली आहे म्हणून त्या थेट न्यायालयात जातील.
  • म्हणजे आता शनीच्या चौथर्‍यावर चढून महिलांना पूजा करण्याची व्यवस्था झाली म्हणजे महिलांचे जीवनच आता बदलून जाणार आहे, असा समज कोणी करून घेउ नये. आम्ही आवाज उठवू शकतो, परिस्थिती बदलू शकतो, हा संदेश शनिशिंगणापूरच्या या घटनेने समस्त स्त्री वर्गापर्यंत पोहोचणार आहे. आता धर्म आणि कथित राष्ट्रवादावरून चर्चेचे राजकारणाचे मुद्दे शिक्षण, व्यवसायाच्या संधी आणि त्यातून शाश्वत विकासाकडे वळायला हवेत. त्यासाठी या राज्यातल्या सुशिक्षितांनीच पुढाकार घेतला पाहिजे. झाला एवढा तमाशा खूप झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: