गुरुवार, २१ एप्रिल, २०१६

जय जीनेंद्र


  • आज महावीर जयंती आहे. संपूर्ण देशभर ही जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्मात ज्याप्रमाणे दशावतार आहेत तसेच जैस धर्मामध्ये अवतार झाले. त्यांना तीर्थंकर असे म्हणतात. जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थकार होऊन गेले. यातील पहिले २३ तीर्थंकर हे देव स्वरूपात राहिले तर चोविसावे तीर्थंकर महावीर होते. त्यांच्या जन्माचा हा दिवस. जैन धर्म हा महाविरांच्या शिकवणुकीनुसार चालतो. यामध्ये अहिंसेला फार महत्व आहे. जैन धर्म म्हणतो की जगा आणि जगु द्या. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला मनात थारा देऊ नका. कोणत्याही जीव हत्येला जैन धर्मात पाप मानले आहे. आज माणसांच्या आक्रमणामुळे सृष्टीतील अनेक जिवांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. हा पर्यावरणाचा असमतोल होतो आहे. अगदी वनराज जंगलचा राजा सिंहाचेही अस्तित्व कमी होत चालले आहे. किती छोटे छोटे जीव नष्ट झाले असतील. त्यामुळे प्रत्येक जिवाला जगण्याचा अधिकार हा असला पाहिजे. स्वत: जगा आणि दुसर्‍यांनाही शांततेने जगू द्या असा शांततेचा आणि अहिंसेचा संदेश या धर्माने जगाला दिलेला आहे. प्रत्येक जीव जर नष्ट होत गेला तर जगात फक्त मनुष्य हाच प्राणी शिल्लक राहिल. अन्य जिवांशिवाय माणसाचेही अस्तित्व किती काळ शिल्लक राहील हे सांगता येत नाही. यासाठी सर्वच प्राणीमात्रांवर प्रेम करा आणि सर्वांना जगू द्या.
  •    जैन धर्मात झालेल्या चोवीस तीर्थंकरांमध्ये ऋषभदेव हे सर्वात पहिले तीर्थंकर होते. त्यानंतर अजित, संभव,अभिनंदन, सुमती ,पद्मप्रभ, सुपार्श्व, चंद्रप्रभ, पुष्पदंत, शीतल, श्रेयांस, वासुपूज्य, विमल, अनंत, धर्म, शांती, कुंथू, अरह,
  • मल्ली, मुनिसुव्रत, नमीनाथ, नेमीनाथ, पाश्वनार्थ आणि सर्वात शेवटी मनुष्य रूपात आलेले ते वर्धमान महावीर होते. त्यांनी मनुष्य रूपात प्रकट होऊन मानवधर्माची शिकवण दिली.
  •     महावीरांनी स्थापन केलेल्या धर्मानुसार आणि शिकवणुकीनुसार म्हणजेच जैन धर्मानुसार जीव हा चैतन्यमय आहे. जीव अविनाशी आहे. जीव हा देव,मनुष्य, पक्षी,पशु असे विविध जन्म घेतो. तर अजीवांचेही काही धर्म आहेत असे त्यांनी म्हटले आहे. अजीवाचे धर्म, अधर्म,आकाश, पुदगल, काल, हे पाच प्रकार आहेत. अजीव हे चैतन्यविरहित आहे. जीव व पाच प्रकारचे अजिव मिळून सहा द्रव्ये तयार होतात. जैनांच्या मते कोणत्याही द्रव्याची तीन अंगे असतात. जैन दर्शनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दर्शनात धर्म व अधर्म हे अजीव पदार्थ मानलेले नाहीत.
  •     आपल्याकडे प्रत्येक धर्मात पाप पुण्याच्या म्हणजे चांगल्या वाईट गोष्टींचा उहापोह केलेला आहे. तसाच तो जैनधर्मातही केलेला आहे. त्याप्रमाणे पुण्य म्हणजे,जीवाशी संबंध असलेला व जीवाला स्वर्ग, ऐश्वर्य,अशी चांगले फळ मिळवून देणारा कर्म समुदाय. तर पाप म्हणजे पुण्याच्या विपरीत असा कर्मसमुदाय. त्याची ८२ कारणे आहेत. त्यांनाच ’आश्रव’ असे नाव आहे.
  •     जैन तत्वानुसार ज्ञान दोन प्रकारचे असते. परोक्ष व अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञान आत्मा कर्मबंधनातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते.परोक्ष ज्ञान म्हणजे मन किंवा इंद्रियाद्वारा वस्तूंचे प्राप्त होणारे ज्ञान. या विचारानुसार एखाद्या वस्तुसंबंधी किंवा विषयासंबंधी विचार करतांना ७ वेगवेगळ्या प्रकारे तो विचार मांडता येतो. हा सिद्धांत सप्तभंगी सिद्धांत म्हणून ओळखला जातो.
  •   आहिसा या परमो धर्म हा मुख्य नियम या धर्मात मानला जात आहे. जैन धर्मिय लोक हे निरुपद्रवी आणि शांत असतात. व्यापार आणि व्यवसायाचे माध्यमातून शक्य तेवढी जनसेवा करणे यात ते गुंतलेले असतात. सहनशीलता हा या धर्मीय लोकांचा फार मोठा गुण आहे. त्यामुळेच शांततेचे प्रतिक असलेला पांढरा रंग त्यांना अतिशय प्रिय आहे.
  •     जैन धर्मात पंचमहाव्रते सांगितली आहेत. ती म्हणजे  सत्य - सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे. अहिंसा - अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची हत्या करू नये. अस्तेय - अस्तेय म्हणजे चोरी करू नये. अपरिग्रह - अपरिग्रह म्हणजे द्रव्यसंग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा. ब्रह्मचर्य - मनामध्ये कामवासना बाळगू नये. भारताच्या अस्तितेसाठी आपण अहिंसा सत्य आणि अस्तेयाचा पुनरुच्चार सतत करतो तो यासाठीच.
  •  ऐतिहासिक दस्तऐवजानुसार सम्राट अशोकाच्या काळातच जैन धर्माचा प्रसार झाला. भगवान महाविरांनी जीव आणि अजिव सृष्टीतील अजिवांचे म्हणजे जल, अग्नी, वनस्पती यांचे अस्तित्व मानले पाहिजे असे सांगितले होते. ही सर्व अजिव तत्वे मनुष्याच्या शरिरात अंतर्भूत असतात. स्थावर आणि जंगम यातील जीव आणि अजिव यांचे अस्तित्व मानणाराच खर्‍या अर्थाने या सृष्टीचे रक्षण करू शकतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या शिकवणुकीचा विचार करणे आज काळाची गरज आहे.
  • जैन धर्मात मांसाहार वर्ज आहे. मांसाहारी लोक म्हणतात की, जर हे मांस खाल्ले नाही तर पृथ्वीवर या प्राण्यांची संख्या वाढेल. त्यामुळे मनुष्य जातीला धोका निर्माण होईल. परंतु असा विचार करताना हे लक्षात घेतले जात नाही की या विचारातून अनेक प्राण्यांच्या जाती नष्ट झालेल्या आहेत. प्राण्यांप्रमाणेच जंगलतोड, वृक्षतोडीला आणि डोंगर पर्वत खणून नष्ट करण्यालाही जैन धर्माचा विरोध आहे. कारण पर्यावरणाचे रक्षण करा असे सांगणारा हा धर्म आहे. व्यवस्थित पाऊस पडणे, भरपूर पाणीसाठी होणे हे सर्वांच्या हिताचे आहे. त्यासाठी वने, जमिनी, जंगलसंपत्ती, पर्वत यांचे अस्तित्व शिल्लक राहिले पाहिजे. आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न निर्माण झालेला असताना या तत्वज्ञानाचे पालन करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: