गुरुवार, २१ एप्रिल, २०१६

संघमुक्तीचे आव्हान


  •  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींच्या भाजपने कॉंग्रेसमुक्त भारत ही घोषणा दिली होती. अशी मुक्तीची चळवळ राबवली की आपल्यालाही यश मिळेल असा साक्षात्कार बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांना झाला असावा. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी संघमुक्त भारत करा असे आवाहन केले. आता देशात सत्ता भाजपची आहे की संघाची? म्हणजे संघ परिवारातील भाजप हा पक्ष असला तरी संघ सत्तेत नाही. कारण भाजपमध्येही फक्त भाजपवाले आणि संघयुक्त भाजपवाले असे दोन प्रकार आहेत. म्हणजे संघातून आलेले आणि पक्षांतर करून आलेले. त्यामुळे सत्तेत असलेला भाजप हा काही शंभर टक्के संघवादी नाही हे नितिशकुमारना कोणी सांगायचे. पण ते घोषणा देउन बसले खरे.
  •    भाजपला रोखण्यासाठी बिगर-भाजप पक्षांची आघाडी उभी करण्याचे आवाहन नितीशकुमार यांनी केले आहे. संघमुक्त भारत, असे ध्येयही त्यांनी या आघाडीसमोर ठेवले. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर काही दिवसांतच नितीशकुमार यांनी हे आवाहन केले. पुढील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी नितीशकुमार यांनी सुरू केली आहे. म्हणजे नितिशकुमार यांना आता पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत हे नक्की झाले. नितिशकुमारांची खरी स्पर्धा आहे ती नरेंद्र मोदींशी आहे. त्यांना भाजप बरोबर जायला आवडते पण नरेंद्र मोदींबरोबर नाही. या दुखण्यातून ही ईर्षा सुरू झाली आहे. 
  •   तसे नितीशकुमार हे अतिशय धूर्त राजकारणी आहेत. काळाबरोबर कोणती झूल अंगावर पांघरायची याची जाण त्यांना असते. लोहिया गटातून ते अलगद भाजपकडे गेले. तेथे मंत्रिपद मिळविले व पुढे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदही भूषविले. लालूप्रसाद यादव यांना रोखण्याची ताकद त्या वेळी नितीशकुमार यांच्याकडे नव्हती. ती त्यांनी भाजपकडून मिळविली. त्यानंतरही एनडीएकडून त्यांना नेतृत्व बहाल केले गेले असते तर नितीशकुमार भाजपच्याच तंबूत राहिले असते. म्हणजे खर्‍या अर्थाने स्वार्थाचे आणि सोयीचे राजकारण करणारे ते नेते आहेत. मात्र २०१४ च्या निवडणुकीत थोडी संघाने सूत्रे हाती घेतली व मोदींनी व्यवस्थित डाव टाकले. नितीशना अर्थातच ते पसंत पडले नाहीत. संघाबरोबर त्यांचे जुळणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांना अचानक भाजप व संघाच्या धर्मद्वेषाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी एनडीएबरोबर संबंध तोडले. मात्र, राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचे धाडस त्यांनी दाखविले नाही. कारण मोदींची लाट त्यांच्या लक्षात आली होती. हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची त्यांची तयारी नव्हती. 
  • त्यावेळी लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात आत्यंतिक जहरी टीका नितीशकुमार यांनी केली होती, पण त्याच लालूंबरोबर सोयरिक जमविण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. माध्यमांशी त्यांचे संबंध उत्तम असल्यामुळे अनेक ठिकाणी पाट लावले तरी त्यांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल कुणी शंका घेत नाही. त्यातच बिहारमध्ये भाजपची धूळधाण उडाली. त्याचाही फायदा नितीशकुमार यांना झाला. 
  • तसे पाहता गेल्या सहा महिन्यांत बिहारमध्ये नितीशकुमार यांनी चमकदार कामगिरी केलेली नाही. उलट लालूप्रसाद यादव यांची मुजोरी पुन्हा सुरू झाली आहे. तेथे यादवांचे राज्य सुरू झाल्याचे संकेत अनेक घटनांतून मिळत आहेत. भाजपबरोबर असताना नितीशकुमार यांनी चांगला कारभार केला होता. त्यामुळेच बिहारी जनतेने बिहारसाठी नितीश व देशासाठी मोदी असा क्रम ठेवून मतदान केले होते. 
  •  उद्या खरोखरच नितिशकुमार राष्ट्रीय नेते म्हणून पुढे आले तर बिहारमध्येही त्यांचे वजन वाढेल व लालूंना ताब्यात ठेवता येईल. बिहार निवडणूक होताच लालूंनीही त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली होती. त्याबद्दल ते अधिक काही हालचाली करण्यापूर्वीच नितीशकुमार यांनी स्वत:चे घोडे दामटले आहे. घोडे दामटण्यासाठी ही वेळही योग्य आहे. मोदी यांनी चार वर्षे आधीपासून पंतप्रधानपदाची तयारी सुरू केली होती.  राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उभी करण्यासाठी दोन-अडीच वर्षांचा कालावधी लागतोच. पुढील वर्षी पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत. हे सगळे पाहून नितिशकुमारांनी आपले घोडे दामटले आहे. आत्तापासून प्रचाराला सुरुवात केली तर भाजपच्या पीछेहाटीचे श्रेय नितीशकुमार यांना मिळू शकेल. त्यामुळे पंतप्रधानपदासाठीच्या त्यांच्या उमेदवारीला बळ मिळेल हे त्यांचे गणित आहे. पण ते चालले आहेत मोदींची नक्कल करत हे लक्षात घेतलेच पाहिजे.
  • आज बिगरभाजप आघाडी दिसण्यास सोपी दिसली तरी वस्तुत: तशी नाही. ही मोट बांधण्याची कुशलता नितीशकुमार यांच्याकडे आहे असे वाटत नाही. ते बोलण्यात हुशार असले तरी मोदींइतकेच आत्मकेंद्री आहेत. आघाडी चालविण्याची कुशलता असणारी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे वाजपेयी. केवळ प्रसार माध्यमांच्या भरवशांवर आघाडी उभी करता येत नाही, हे नितीशकुमारांनी लक्षात घेतले पाहिजे. वस्तुस्थिती आघाडीतील लालू प्रसाद यादव ही त्यांना झालेली डोकेदुखी आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी संघमुक्तीचा साप त्यांनी सोडला आहे. संघावर टीका करणे सोपे असते. पण संघाचे नेटवर्क अनेकांना घाम फोडते. आजपर्यंत तीन वेळा बिगरकॉंग्रेसी सरकार सत्तेवर आले. त्या तिन्ही वेळा संघाचा सहभाग महत्त्वाचा होता. पुढील निवडणूक संघविरोधात अन्य अशी झाली तर संघही इरेला पेटून काम करू शकतो हे नितिशकुमारांनी लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: